कर्तव्यदक्ष अधिकारी आणि अनोखा निरोप समारंभ
श्रीमती सिमादेवी निंबाजी बेडसे
कर्तव्यदक्ष अधिकारी आणि अनोखा निरोप समारंभ
आनंदीय निरोप काय असतो? हे प्रत्यक्ष अनुभवलेल्या दिवशी म्हणजेच दिनांक 8 डिसंबर 2024 रोजी चाळीसगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष,सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मनावर राज्य करणारे, त्यांच्या हृदयस्थानी विराजमान झालेले गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर साहेबांना पदोन्नतीच्या निमित्ताने निरोप देण्यात आला. अनोखा निरोप समारंभ अशामुळे की, या भव्य दिव्य कार्यक्रमास पूर्ण तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी, पदाधिकारी हजर होते. खरं तर त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळीच मनोगत व्यक्त करायचे होते. पण वक्तेच इतके होते की, आम्हा कर्मचाऱ्यांना बोलण्यास वावचं मिळाला नाही.
साहेब जेव्हा सन 2020 मधे चाळीसगाव पंचायत समितीत हजर झालेत, त्यानंतर आमच्या तालुक्याचा चेहरा-मोहराच बदलला. अतिशय मनमिळाऊ, हसरे व्यक्तिमत्त्व, प्रामाणिक, आपल्या कामाशी इमानदार व चोखंदळ कामाची हातोटी यामुळे आम्हा अधिकाऱ्यांनाही खुप काही शिकायला मिळाले. अगदी कुटुंब प्रमुख या नात्याने साहेबांनी ग्रामपंचायतीचे कव्हरिंग लेटर कसे असावे यापासून ते ग्रामसेवकाचे ऑफिस, पर्सनॅलिटी, त्याच्या कामाची पद्धत, ऑफिस ड्रेसकोड इ. सर्व गोष्टी आम्हाला शिकवल्यात.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संयम, ज्ञान, एखादा व्यक्ती कितीही रागात येवो त्याच्याशी बोलताना डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवूनच शांततेत बोलून प्रश्न सोडवणे. तक्रारदार किंवा मार्गदर्शनसाठी येणार्या विषयाचा सखोल अभ्यास असणे महत्वाचे असते.
कामाशी असलेली इमानदारी व आपले काम वेळेत चोख बजावणे हे सर्व आम्ही आपणाकडून शिकलोत. अगदी त्यांच्या कारकिर्दीत पंचायत राज कमिटी PRC दौरा हा तर सर्व अधिकाऱ्यांना खुपच टेन्शनचा विषय असतो. पण, त्यातही साहेबांनी त्यांच्या ज्ञान कौशल्याने हाताळून यशस्वीपणे हा दौरा पार पाडला. अलिकडेच विधान सभा सार्वत्रिक निवडणुकांचा संवेदनशील विषय अगदी नियमात राहून (प्रसिद्धी पत्रक,आचारसंहिता,निकाल इ. ) आमच्याकडून वारंवार मिटिंगा घेऊन सर्व कामकाज यशस्वीपणे पार पाडून घेतले.कोणत्याच अधिकाऱ्याला कुठलाही दबाव आला नाही. म्हणूनच तर साहेब सर्वांच्या हृदयात विराजमान झालेत.
एकदा ‘मराठीचे शिलेदार’ समूहात चित्र चारोळी होती “भाकरीचा पूर्णचंद्र” चित्र होते. गरीब झोपडीतले मुले त्यांना दोन वेळची भाकर मिळणे कठीण होते. त्यावर काव्य चारोळी करायची होती. अगदी योगायोगाने त्याच वेळी आमच्या वाळेकर साहेबांनी एका गावी असे कुटुंब दत्तक घेतले. एक असह्य कुटुंब कोरोना महामारीमुळे हाताला काम नाही, खायला घरात धान्याचा कण नाही. तर चूल कशी पेटणार आणि भाकरी कशी मिळणार, पोटी दोन मुले,एक मुलगी आणि तिघेही अपंग, बोलता येते, चालता येत नाही. वरती बघता येत नाही.
आकाशातला चंद्र पाहिला नाही,तर तव्यावरचा भाकरीचा पूर्णचंद्र ही नशिबी नाही. तशात वयाने मोठे पण वाढ फक्त 3 ते 4 वर्षाच्या मुलांएवढी. घर आहे पण, झोपडीवजा तेही वारा आला तर पडून जाणारे अशा परिस्थितीत ते कुटुंब हतबल झालेले आणि म्हणतात ना.. कुणीतरी मनुष्य रूपाने देवासारखे मदत करावी तशी आमच्या वाळेकर साहेबांनी शासकीय स्तरावर त्यांना दत्तक घेतले. त्या कुटुंबाला पूर्णपणे आर्थिक सहाय्य केले. योजनेच्या माध्यमातून ग्रामसेवक बंधुनी 5% दिव्यांग निधीतून लगेच मदत केली. अशी साहेबांची कार्यकुशलता! तिच आम्हा सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देऊन आज त्यांना आम्ही निरोप दिला. सर! तुमचा यशस्वी कार्यकाळ सदैव आम्हाला प्रेरणादायी व स्मरणात राहील. आपणास पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा..!!
श्रीमती सिमादेवी निंबाजी बेडसे
ग्रामपंचायत अधिकारी, चाळीसगाव



