‘पाऊस माझा’ मनाच्या गाभाऱ्यात जपलेला; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
‘पाऊस माझा’ मनाच्या गाभाऱ्यात जपलेला; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
पाऊस माझा रुणझुणतो
मन अवघे गोकुळ होते
राधा हरीच्या रंगी रंगते
उन्हाळ्यात तीव्र उन्हाचे चटके सहन करून थकलेली धरती आणि मानव जातीसह सर्व पशुपक्षी आभाळाकडं नजर लावून बसलेले असतानाच कुठंतरी पावसाचा पडलेला एखादा थेंब त्यांच्या आनंदाचं कवाड उघडं करून देतो आणि त्यांच्या आशा पल्लवित करतो. त्याच पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाच्या भरवशावर शेतकरी आपलं सर्वस्व पणाला लावायला सुरुवात करतो, म्हणायला गेलं तर, ‘पाऊस हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच आहे’. खरंतर पावसाविना हा निसर्गच अपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. आता पाऊस म्हटल्यानंतर त्याची वेगवेगळी रुपंही आलीच. मनाला प्रसन्न करणारा आल्हाददायक पाऊस, धो-धो पडणारा, वाऱ्या वादळासह, विजांच्या कडकडाटासह पडणारा, श्रावणातला उत्साही पाऊसतर कधी भर उन्हात पडणारा बोचरा पाऊस अशी अनेक रूपं घेऊन पाऊस कोसळत असतो.
लहानपणी ‘येरे येरे पावसा’, म्हणत पावसाशी माझीओळख झाली. चिंब भिजवणारा हा मित्र मला तेंव्हापासून आवडायला लागला. मनातल्या किती गोष्टी मी सांगत राहायचे तेव्हा या पावसाला! तोही ऐकायचा माझं… भिजवायचा मला… कधी माझ्या आसवांना सोबत करायचा, तर कधी माझ्या ओठांवर हास्याची फुलं ठेवून जायचा! पापणीवर आसू बनून थरथरत राहायचा कधी, तर कधी झिम्माड बरसत, मला जोजवत शांतवत राहायचा! रोज माझं भिजून जाणं आणि रोज त्याचं, त्याच आवेगानं बरसत राहणं! त्याच आवेगानं पाऊस मला आजही भेटतो!
आजही झाडाच्या पानापानांतून पावसाचे मोती जडवले जातात. मीही मग अवघा पाऊस कवेत घेते. चिंब भिजते. हा माझा पाऊस मी मनाच्या कुपीत जपून ठेवला आहे. आजच्या आपल्या त्रिवेणी काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘पाऊस माझा’ विषय समर्पक आहे.त्यांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल राहुल सरांचे मनापासून आभार. शिलेदारांनी पण भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



