आईचे हळवे मन..!!
वसुधा नाईक,पुणे
आईचे हळवे मन..!!
आई…
आ-आत्मा
ई-ईश्वर..
ईश्वराचा आत्मा जिथे निवास करतो ती आई.
नऊ महिने उदरात वाढवते ती आई.
अनेक यातनातून मूलं जन्माला घालते ती आई.
लहानपणात जपते ती आई.
सुसंस्कार लावते ती आई.
स्वतः कष्ट करून मुलांना सुखी करते ती आई.
जेवणापासून शाळेत जाईपर्यंत सारे शिकवते ती आई.
आजारपणात उशाशी बसून काळजी घेते ती आई.
चुकल्यावर हातात छडी घेवून शिस्त लावते ती आई.
काय आणि किती आठवणी हो आईच्या. आई ह्रदयातले मखर त्या मखरात तिचे अढळ स्थान ते कोणीही हिरावू शकत नाही. मुलगा काय किंवा मुलगी काय यांच्या संस्काराचा उत्तम पाया ही माऊलीच तर आहे. सुख दुःखात साथ देणारी माय आपण कितीही मोठे होऊ दे,पण घरी आल्यावर डोक्यावरून तिचा फिरणारा हात,तो स्पर्श काय कसा गेला आजचा दिवस?हा तिचा प्रश्न…क्षणात दिवसभराचा शिण घालवतो.
आईचे मन हळवे कसे?? मुलगी सासरला गेली आहे. तिला काही त्रास तर होत नसेल ना! या विचाराने मन पोखरून जाते. पण मुलीच्या संसारात कधीही ढवळाढवळ करायची नसते. कारण ज्याच्या हाती आपण सोपवले आहे तो सक्षम आहे हेच बघून आपण मुलीचा हात त्याच्यात दिलेला असतो. हा पण ज्या वेळी मुलीला आपली गरज आहे त्यावेळी मात्र तिच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभ राहिल पाहिजे. मुलीला मुलं होतात. ती आपली नातवंड खेळवण्यासाठी जीव खूप धडपडतो. पण कितीही केलं तरी ती जावयाची मुलं असतात. आपल्या घरी थोडा वेळ येतील आणि जातील. पण अशावेळी आजीचं नातं खूप वेगळं असतं. म्हणतात ना दुधावरची साय खूप छान असते. तशी ही मुला मुलींची मुलं हे खूप प्रिय असतात.
आईचे हळवे मन नातवंडांकडे खूप ओढ घ्यायला लागते. भेटायला कोणी आलं नाही तर मन अस्वस्थ होते. मग पर्स उचलायची, खाऊ घ्यायचा आणि आपण तिच्या घरी जाऊन मुलांना भेटून यायचे. असे हे आपले हळवे मन. मुलगा परदेशी शिकायला आहे. आता तिथे नोकरीलाही लागलेला आहे. अशावेळी त्याची रोज आठवण येते. आता तर काय लग्न करून परत तिथेच स्थायिक झाला मुलगा.. यावेळी घरामध्ये काही अडचण आली, आजारपणं आली तर अशावेळी आवर्जून आठवण येते. कारण आता या हाताला बाकीची काम करायची सवय राहिलेली नसते. काम करण्याची क्षमता कमी झालेली असते. मग काय कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. मग एकांतात या मुलांच्या आठवणी काढत हळूवार डोळ्यातून पाणी गालावर ओघळत असते.
आई-वडिलांना काय हवे असते हो वेगळं! फक्त तुम्ही त्यांची रोज चौकशी करा. जेवलात का हे विचारा. बरे आहात ना हे विचारा. नातवंडांबरोबर खेळू द्यात. मग बघा हेच वृद्ध तुम्हालाही आवडतील आणि वृद्धांना तुम्ही आवडाल. ते तुमचे परके नसून, आपले आहेत हाच विचार मनात ठेवावा. आईचे हळवे मन जपलेत तर, पुढे तुमचे मन जपणारे अनेक लोक समाजात मिळतील. कुटुंबात मिळतील. तुमची मुलं तुम्हाला छान सांभाळतील. हे सर्व अनुभवाचे बोल आहेत. जसे आपण वागतो, तसे आपल्याकडे वाढून ठेवलेले असते. ही म्हण खोटी नाही खरी आहे. “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते”
वसुधा नाईक,पुणे
=============



