शारीरिक मिलाफापल्याडचा आत्मिक सहवास’; फक्त तुझ्याचसाठी
पुस्तक परीक्षण
‘शारीरिक मिलाफापल्याडचा आत्मिक सहवास’; फक्त तुझ्याचसाठी
पुस्तक परीक्षण
प्रेयसीच्या श्वासाशी ईमान राखणारा उत्कट भावबंध म्हणजे “फक्त तुझ्याचसाठी”: विद्रोही कवी साहेबराव मोरे
संजय गायकवाड यांचा ‘फक्त तुझ्याचसाठी ‘हा चारोळी संग्रह वाचनात आला.गायकवायड हे अभिनेते म्हणूनही. परिचित आहेत.मनाच्या गाभाऱ्यात रुंजी घालणाऱ्या प्रेयसी बद्दल च्या अलवार भावानांची स्पंदन टीपण्याचा हा प्रेमप्रपंच आहे . ‘प्रेम म्हणजे प्रेम असत,तुमचं आमचं सेम असतं ‘असं मंगेश पाडगावकर यांनी सांगितले आहे, तरीही प्रेमाचा दुरावा- ओलावा,घटा -छटा,रूसवे फुगवे, मळमळ- तळमळ,यात भिन्नता असतेच असते. कवीच्या विरही वेदनेची सल,मनाच्या गाभाऱ्यात होत असलेली घालमेल चारोळी संग्रहात शब्दबद्ध होऊन प्रकटली आहे.
“तुझा स्पर्श हवा
तुझा हर्ष हवा
तुझा श्वास मला
माझ्या श्वासात हवा”
प्रियसीचा श्वास होऊन विहरणारा हा कवी आहे
प्रेमिकेच्या विरहात आठवांचे काहूर दाटून आल्यानं बैचैन होणारा प्रियकर अनेक चारोळीत भेटतो.सहवास लाभावा म्हणून अधीर प्रियकर ‘सहवास ‘मधुन व्यक्त होतो
“क्षणा क्षणात फक्त
तूच माझ्या मनात
हवाय तुझा सहवास
मला प्रत्येक क्षणात “
आज काव्यलेखनात अनेक काव्य प्रकार नव्याने रुजताहेत. हायकू,षष्ठाक्षरी, अष्टाक्षरी, चारोळी. अल्प शब्द सामर्थ्याने सहज, सुंदर रंजक मनोरे उभे करण्यात गायकवाड यशस्वी झाले आहेत.रंजकता,प्रणयता, प्रांजळता यांचा मनोहर संगम या अनुषंगाने ‘फक्त तुझ्याचसाठी ” ची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. स्रित्वात पुरुषाचा अंश असतो, पुरुषांमध्ये स्रित्वाचा घटक असतो या अर्थी प्रेयसीला वजा करून आयुष्याच गणित सोडवणं अशक्यप्राय.
“माझा प्रत्येक क्षण तू
माझ्या मनाची ओढ तू
माझ्या जीवनाचा रंग तू
जगण्याचा अर्थ तू”
या ‘तू’ चारोळीत हेच दृगोचर झाले आहे. भेट, साद, नजर मिळू दे,मिलन,,मन,बंधन,तुझाच मी, एकजीव, तुला जपावं, स्पंदन अशा चारोळ्या प्रेमी के हाथोमे प्रेमलकीर होती है/ याची अनुभूती देऊन जातात.प्रेम एक धारणा, चेतना, मैत्रीचा , स्नेहाचा, आपुलकीचा अनुबंध.प्रेम म्हणजे निरागस,निरालस, निर्व्याज मनोमिलनाची सुखद अनुभुती. शारीरिक मिलाफापल्याडचा आत्मिक सहवास, यांची समर्पकता हा संग्रह वाचताना प्रत्ययास येते वासूदेव म्हणजे प्रेमाचं प्रतीक राधाकृष्णाच्या प्रेमात निर्मळ, निरपेक्ष, निर्मोही प्रांजळता आहे, यास्तव ग्वाही दिली जाते.
संजय गायकवाड यांचा हा चोरोळी संग्रह कृष्णाच्या प्रेमाची, मित्र,सखा, तारणहार या परमोच्च आनंदाची महती अंकीत करणारा आहे पहिला संग्रह असल्याने साहित्यिक अंगाने अधिक परीश्रम,वाचन,करणे गरजेचे आहे ,अनूभवाने ते साध्य होईल , निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवनाचा येथेच्छ आनंद लुटणारा हा हरभनमौला कवी आहे .
त्यांच्या प्रतिभेची व शाब्दिक सौंदर्यांची प्रशंसा अनिवार्य ठरते.
“फक्त तुझ्याचसाठी”या संग्रहाला सविता पाटील यांची कवीच्या उत्कट भावनांचा परामर्ष घेणारी आशयघन प्रस्तावना लाभली आहे. वैशाली अंड्रसकर व स्वाती मराडे या कवयित्रीद्वयांनी ‘माणूस हा जीवनभर प्रेमप्यासा असतो, त्या साठी केला हा अट्टाहास ‘या उक्तीप्रमाणे
प्रिय सखीच्या श्वास होण्याचा दुर्दम्य आशावाद जोपासणाऱ्या कविमित्रास मोरपंखी शुभेच्छावर्षाव केला आहे. वाचक, रसिक,व खासकरून प्रेमियुगलांसाठी हा चारोळी संग्रह पसंतीचा कौल घेणारा ठरणार आहे,यात तीळमात्र शंका नाही. एकूणात, प्रेयसीच्या श्वासाशी ईमान राखणारा उत्कट भावबंध म्हणजे “फक्त तुझ्याचसाठी” हा चारोळी संग्रह दखलपात्र आहे .कवी मित्र संजय गायकवाड यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा!!!
समीक्षक _विद्रोही कवी साहेबराव मोरे,चाळीसगाव
मो ९४०४८६०१
फक्त तुझ्याचसाठी -चोरोळी संग्रह
कवी-संजय गायकवाड
प्रकाशन -मराठीचे शिलेदार, नागपूर
किंमत -१६०₹



