“दुःखाचे काटे खुपतांना सुख देणारा ‘भास आनंदाचा’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्य परीक्षण
“दुःखाचे काटे खुपतांना सुख देणारा ‘भास आनंदाचा’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्य परीक्षण
बाळा तू आलास..? खूप वाट पाहत होते रे तुझी..अगदी डोळ्यात प्राण आणून, तुझ्या बाबांच्या शेवटच्या क्षणी. त्यांचाही दुर्दम्य विश्वास होता तुझ्यावर, की तुला किमान एकदा तरी डोळे भरून पाहावं..आणि मला वाटत होतं. आयुष्यभर ज्यांनी तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्यांना अग्नीडागही तूच द्यावा. बहुतेक नसेल तुझ्या नशिबी, हे सुख. चल उशिरा का होईना आलास तू, माझ्या राजा . अरे….मी आई आहे, माझ्या ममतेचा झरा कसा बरा आटेल ? अरे मला माहित आहे, की परदेशी उडून गेलेली पाखरं बहुतांशी परत येत नाही. पण, तुझ्या बाबतीत मी जरा निर्धास्त होती. किती म्हणून काय विचारतोस ??बारा वर्षे झाली तुला जाऊन. खूप मोठा काळ तो. एखाद्या वाटेकडे असं टक लावून बघणं कठीण असतं रे.. आता तर ते डोळेही कंटाळा करायला लागलेले.
चल असू दे तरीही…शेवटी तुला वाटलं ना, एकदा तरी आपण आपल्या आईला भेटावं ,झालं तुला डोळे भरून पाहावं आणि हा देह मग ज्याचा आहे त्याने न्यावा खुशाल.. काय म्हणतोस? अळूच्या वड्या कर ! अरे कसं विसरेल… आधीच करून ठेवल्या आहेत मी तुझ्यासाठी. कुणी कुणी पाणी देईल का मला. काय?काय ? हे भयानक स्वप्न….असं कसं शक्य आहे ? माझ्या राजा… या स्वप्नांनी मला पुन्हा एकदा फसवलं रे..!
“भास आनंदाचा झाला, पण क्षणभंगूर ठरला,
पुन्हा अश्रूंची धार, तीच नित्य नियमाला…”
देवा ! कारे असे करतोस ? भास आनंदाचा…. होतो ना कधी कधी तुम्हालाही ? पण ते वास्तव नसतं, क्षणात विझणार असतं. विरजनाचं काम करणारं असतं. ‘भास आनंदाचा’ अर्थात खराखुरा नसलेला आनंद, खरा वाटायला लागणे. आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘भास आनंदाचा’ हा विषय दिला आणि सर्वच कविता समूहात जणू आनंदाला उधान आलं. परीक्षणाच्या निमित्ताने अवलोकनार्थ रचना वाचतांना कुणी अनुभूतींच्या अद्भुत स्पर्शाचा; तर कुणी दुःखाचे काटे खुपतांना सुख देणारा भास आनंदाचा रेखाटला. “कुणाला भास आनंदाचा मृगजळ वाटला तर, कुणास उदास मनास सुखावणारा”. कुणाला निराशेत मार्ग दाखवणारा तर, कुणाला प्रत्येक वस्तूत सहचर्याचा, प्रियकराचा भास झाला. कुणास मग हा भास आनंदाचा, जगण्याची प्रेरणा देऊन गेला, तर कुणासाठी तो वेदनेचा पुतळा ठरला. आज एकापेक्षा एक रचना सुंदर होत्या. तेव्हा तुम्हा सर्व कवी कवयित्रींचे मनापासून अभिनंदन.
पण थोडे काही.. कविता म्हणजे अंतर्मनातून आलेली हाक. तेव्हा शब्द साधे सोपे असावेत..हृदयातील भावनेचा ओलावा घेऊन समोरच्याला भिडणारे असावेत. शब्दांवर हुकमत गाजवत भावनांना शब्दांच्या चिमटीत पकडा.एखाद्या कल्पनेचा अर्थ गहिरेपणाने समजून घेण्याचा प्रयत्न करा…व कवितेला भरकटू देऊ नका. मग बघा काव्यविश्वात रमून अंतरात्माही संतुष्ट कसा होतो ते..वाचत राहा..लिहीत राहा… अधून मधून लिहता त्यात सातत्य ठेवल्यास लेखणीत खंड पडणार नाही. स्पर्धा आहे म्हणून लिहू नका तर ‘मराठी साहित्यात काव्यकल्पनेला भरारीचे पंख लावण्यासाठी नियमित लिहा.. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह



