अशीही खंत
स्वाती मराडे-आटोळे. इंदापूर, पुणे
अशीही खंत
‘मॅडम किती वर्ष राहिली सेवा तुमची?’
‘फक्त दीड वर्ष.’
‘तरीही तुम्ही एवढी धावपळ करायला लावणाऱ्या निवड श्रेणी प्रशिक्षणाला आलात?’
आश्चर्याने मी विचारले.
‘होय..’ असे म्हणत त्या हसल्या. ‘कशाला ताण घेताय? एकतर पावसाचं वातावरण. त्यात येण्याजाण्याचं अंतर जास्त. प्रशिक्षणाची वेळही खूप आहे आणि तुम्हाला तर याचा काही फायदाही होईल असे वाटत नाही.’ ‘खरंय तुमचं.. पण दीड वर्षानंतर मला कोण प्रशिक्षणाला बोलवेल का? हेच क्षण आहेत जे सेवेत असल्यामुळे लाभत आहेत. तेच मी टिपून घेतेय असे समजा. त्यामुळेच लांब असले तरी मला ते घ्यावसं वाटतंय. पहा ना आपली पण नव्यानेच ओळख झाली. त्यानिमित्ताने एक नवीन मैत्रीण मिळाली.. हो की नाही? सगळ्याजणी एकमेकींचे वेगवेगळे अनुभव सांगत आहेत. विचारांची देवाणघेवाण होत आहे. शिकणं तर जन्मभर सुरूच असतं. प्रशिक्षणात काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळेलच. शिवाय सेल्फी काढणं, फोटो काढणं हेसुद्धा मी मनापासून एन्जॉय करतेय. दीड वर्षानंतर हे सगळे क्षण मी मिस करणार आहे.’
ओहह..निवृत्तीनंतरची सतावणारी खंत होती तर ही. खरंय. अशीही खंत असू शकते. नोकरीत असताना लागलेली नियमितपणाची सवय सहजासहजी बंद करणे खरोखरच सोपे नाही. याची जाणीव झाली. सेवानिवृत्ती हा आयुष्यातील एक सुखद क्षण असला तरी त्यानंतर येणारं रितेपणही सतावतं मनाला. नोकरी करत असताना दररोज अनेकविध अनुभव येत असतात. त्यात शिक्षणक्षेत्रात असेल तर अनुभवांची रेलचेलच असते. निरागस लहान मुलांमध्ये दिवस कसा भुर्रकन निघून जातो. दिवस, आठवडा, महिना आणि वर्षही. खरेच किती फुलपंखी दिवस असतात. अन् सेवानिवृत्तीनंतर हातावरून ते फुलपाखरासम अलगद उडून जाणार आहेत याची मनास आधीच चुटपूट लागते. त्यामुळे जे क्षण सध्या हातात आहेत ते समरसून जगायचे व सुरेख आठवणी सोबत घ्यायच्या एवढंच तर आपल्या हातात.
स्वाती मराडे-आटोळे.
इंदापूर, पुणे
=========



