‘बाली इंडोनिशिया ट्रिप’; भाग १
वसुधा वैभव नाईक, पुणे
‘बाली इंडोनिशिया ट्रिप’; भाग १
पासपोर्ट काढून सहा वर्ष झाले. अमेरिका दोन वेळा फिरून आले. आता दुसरा देश बघण्याची संधी मिळाली.नवा देश नवा वेश, नवे लोक, नवा मित्रपरिवार परत अनुभवायला मिळणार आनंदाने खुश होते. शिवाय या ट्रिपला फॅमिली मेंबर होते.भाग्यश्री ट्रॅव्हलकडून तिकीट कन्फर्म झाले.मग उत्साहाचा झरा वाहू लागला. घरात एवढे कपडे असताना देखील नवीन कपड्यांची खरेदी झाली. कपडे कोणते न्यायचे याची चर्चा सुरू झाली. टॉप, वन पीस, फ्रॉक,काय न्यायचे, ज्वेलरी काय घालायची, शुज कसे न्यायचे अशी अनेक चर्चा झाली. खरेदी झाली.
‘बाली इंडोनेशिया’ सारखा हिरवागार देश बघायला मिळणार होता. निसर्ग सौंदर्याने नटलेला देश. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडी, निळाशार समुद्र, सौंदर्याची खाण असलेला देश पहायला मिळतो म्हणून खूप खुश होतो.
दि. 30.03.2025 रोजी दुपारी दोन वाजता पुणे शहर सोडले. नांदेड सिटी, भारती विद्यापीठ, आणि पद्मावती येथून तीन गाड्या निघाल्या. फूड मॉलला सर्व एकत्र येऊन त्यातून मुंबईसाठी रवाना झालो. घरातून नेलेले मेथीचे ठेपले व शेंगदाण्याची चटणी, फळं, खाकरे असा थोडासा खाऊ बरोबर होताच. कारण सिंगापूर येथे 8 तास हॉल्ट होता. सायंकाळी सहाच्या दरम्यान मुंबईला पोहोचलो. आमचे सिंगापूर एअरलाइन्सचे फ्लाईट रात्री 11.40 ला होते. मध्ये बराच वेळ रिकामा होता. ईमिंग्रेशन झाले.मस्त फोटो सेशन झाले व्हिडिओ झाले. एअरपोर्टवरची पावभाजी खाल्ली. पावभाजी तीच पण पैसे मात्र दाम दुप्पट, तिप्पट होते. पण त्यातही एक मजा होती.
ठीक 10.30 ला विमानात सोडायला सुरुवात केली. सिंगापूर एअर लाईन्स हे विमान डबल डेकरसारखे होते.
एकदाचे विमानात बसलो. हुश्श झाले.प्रवास सुरु झाला. सिंगापूरला साधारण 5.30 तासात पोहोचलो. परत ईमिंग्रेशन झाले. केवढे अवाढव्य विमानतळ आहे हे. जवळ जवळ पाच टर्मिनल असलेले हे विमानतळ होते. एका टर्मिनल वरून दुसऱ्या टर्मिनल वर जाण्यासाठी गाडी होती. सजावट तर अप्रतिम आहे. विविध व्हेरायटी असलेली विविध दुकान आहेत. फुड मॉल आहे. बसण्याची सुंदर सुविधा आहे. प्रत्येक खुर्ची जवळ वरती फोन चार्जिंगची सोय आहे.
या एअरपोर्टची भव्यता आणि दिव्यता पाहूनच मन सुखावते. या ठिकाणी भरपूर फोटोसेशन झाले व्हिडिओ काढले. जगातल नंबर एक हे विमानतळ मनाला भावून गेले. आणि या विमानतळावर आपण उभे आहोत हे स्वप्नवत वाटतं होते. आणि बरोबर सर्व फॅमिली मेंबर होते. सर्वजण एकमेकांची काळजी घेत होते. प्रवास सुखकर होत होता. भारतीय प्रमाणवेळानुसार इथली वेळ अडीच तास पुढे आहे. सिंगापूर प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीनला जाण्यासाठी विमान तयार होते.आम्ही सर्व त्या विमानात बसलो.प्रवास परत चालू झाला. साधारण साडेतीन चार तासांमध्ये बालीला पोहोचलो.
इमिग्रेशन झाले. बालीतील प्रवास सुरू झाला. सर्वांचे स्वागत चाफ्याच्या फुलांचा हार घालून केले गेले. मस्त सुवास दरवळला. आस्ताफा गाईड आम्हाला घेण्यासाठी आला होता. हे व्यक्तिमत्व खूप प्रेमळ होते. बोलके होते. आम्हा सर्वांना त्यांनी आपलेसे करून घेतले. तसेच अडाम ड्रायव्हर होता. हसरे व्यक्तिमत्व होते. दोघांनी आमचे स्वागत उत्तमरीत्या केले. आम्हाला देण्यासाठी पॉश गाडी होती.सर्व गाडीत बसलो,इंडियन हॉटेलमध्ये जेवण केले. नंतर आमच्या निवास स्थानी ‘रिसाटा रिसॉर्टला ‘ पोहोचलो. हॉटेल पॉश होते. रूम्स मस्त होत्या. हिरवाईने नटलेले हॉटेल, स्विमिंग टॅंक मनाला खूपच भावला. स्वप्नवत सारे होते. (क्रमशः…)
वसुधा वैभव नाईक, पुणे



