“स्त्री जन्म हीच खरी एक शोकांतिका आहे”; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“स्त्री जन्म हीच खरी एक शोकांतिका आहे”; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
अरे..!!! आज पुन्हा तू दारू पिऊनच आलास? कसं समजावू रे तुला मी ? आपल्या सुखी संसाराला तुझ्या व्यसनाच्या रूपानं जी वाळवी लागली आहे ती पोखरते आहे. संसाराला आणि सोबत आपल्या नात्याला सुद्धा…! तुझे हे व्यसन, अवेळी घरी येणं, मला मारहाण करणं, वाईट बोलणं, माझ्या आई-वडिलांचा उद्धार…किती..किती रे सहन करू मी ? पुष्कळदा वाटते ‘हे मन मारून जगणं यापेक्षा मरण कितीतरी पट चांगलं’. पण तुझा अंश माझ्या पोटात वाढतोय याची जरा तरी जाणीव आहे का तुला?
अरे, माझ्या आंधळ्या प्रेमाने घात केला माझ्या जीवनाचा. तुझा विदूषकी चेहरा माझ्या जरा सुद्धा लक्षात आला नाही. वाहत गेली मी तुझ्या प्रेमात..सारं काही सोडलं मी तुझ्यासाठी. घरदार,आई वडील, समाज,कुटुंब. मी नाही मानत जात-पात साऱ्यांच्याच रक्ताचा रंग लाल असतो यावर विश्वास ठेवून तुझ्या माझ्यातली दरी सुद्धा मी प्रेमापोटी पुरली. स्वतःला पुरोगामी ठरवत तुझ्यासाठी सर्वस्व अर्पण केले. आता मी जगते तुला जाणीव तरी आहे का मन मारूनच ना?
अरे माझ्या ज्या मनानं तुला आपलं मानलं होतं तेच मन मारून जगते आहे मी एकटीच. खूप वाईटही वाटतं मला.. काय कमी होतं माझ्याकडे.? तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं होतं, तुझ्याकडे काम करून करून माझ्या हाताला फोड आली. मला त्याचं वाईट वाटत नाही वाईट वाटतं माझ्या नशिबाचं…तुला ना माझी, ना माझ्या प्रेमाची…ना माझ्या त्यागाची, कसलीच जाणीव नाही.मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगावसं वाटतं मला. पण बहुतांशी ते माझ्या नशिबात नाहीच. तुला वाटत असेल तुझ्या जाचानं मी मरण जवळ करेल पण अजिबात नाही. मला जगायचं आहे…मी ऐकलं होतं स्त्री जन्म हीच खरी एक शोकांतिका आहे आणि मी तेच अनुभवतेही आहे.
मराठी सारस्वत दादा ताई..मन मारूनच ना? म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे न जगता परिस्थितीनुरूप जगणे इच्छा, आकांक्षा भावनांना दाबून ठेवून परिस्थितीला सरळ सरळ शरण जाणं. आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘मन मारूनच ना?’ हा विषय दिला. काव्य प्रपंचासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने विविधांगी विचार केला, सर्वांनी छान रचनांनी सर्वच समूह जणू सजवले.तसं पाहता हा विषय अतिशय मोठा आहे. काव्यरचनेसाठी व्यासंग जितका महत्त्वाचा आहे, तितकच अनुभव विश्व सुद्धा संपन्न असणं गरजेचं आहे. परीक्षणार्थ रचना वाचताना मला या दोन्ही गोष्टींची पुरेपूर जाणीव झाली. बहुतांशी तुम्ही विषयाला न्याय देण्यात यशस्वीही झालात. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन व पुढील साहित्य प्रवासास अनंत कोटी शुभेच्छाही…!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



