वारकरी आम्ही
श्री क्षेत्र आळंदी व देहूच्या वारीची परंपरा ही 800 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमधून तसंच अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करत ही परंपरा आजही जपत आहेत. तसेच आपल्या भागातील गोर गरीबासाठी सद्गुरू उज्वलानंद महाराजांनी पंढरपूर, आळंदी, देहू जाऊन दर्शन घेता येत नाही म्हणून श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान हे सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या ध्यान साधनानेने पवित्र पावन झालेली असे हे तिर्थ क्षेत्र येथे गेल्या चाळीस वर्षां पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, विठ्ठल रूक्मिणी, श्री स्वामी समर्थ, प्रभू राम,लक्ष्मण सीता, महादेव,हनुमान मंदीराची स्थापना केली. आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी आणि महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. वारकरी संप्रदायामध्ये लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेद नाही. वारकर्यांच्या मुखात केवळ विठ्ठलनामाचा गजर असतो.
एकादशीच्या दिवशी नित्यनेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी अथार्त नित्यनियम म्हणजे वारी. जो नियमित वारी करतो त्याला वारकरी असे म्हणतात. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात तर वारकरी धर्मालाच भागवत धर्म असेही म्हटले गेले आहे.
पंढरीत जाऊन चंद्रभागा नदीत स्नान करुन विठोबाचे दर्शन ही एकच इच्छा वारकऱ्याची मनात असते. तसेच याच भक्तीपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे. एकादशीला चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे याने प्राप्त होणारे आध्यात्मिक सुखाचे वर्णन शब्दात मांडणे अवघडच आहे. वारीबद्दल उत्सुकता इतकं की जागतिक स्तरावरही याचा अभ्यास सुरू आहे. जागतिक पातळीवरील वारीचा हा अनुभव घेण्यासाठी अनेक अभ्यासक, संशोधकही सहभागी होतात.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव



