लोकभ्रम
संगिता रामटेके/भोवते साकोली, जि.भंडारा.
लोकभ्रम
अजूनही ती घटना आठवली की अंगावर शहारे येतात. शमनातून आठवणीतून न पुसणारी, न मिटणारी घटना. ज्यामध्ये एक हसतंखेळतं बालपण अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात हरवून गेले. चालतांना नाचतच चालायची, बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा हवेत ताल धरत चालायची, आपल्यातच धुंद असायची. वाटायचे तिचं तिचं एक वेगळे जग होते. तिसऱ्या वर्गात शिकत होती, जरा एकलकोंडी होती. परंतु अभ्यासात हुशार होती. स्वभावही शांत होता आणि सालस होती. नंतर पुढल्या वर्षी माझी शाळा बदलली आणि आमच्या सहकारी मॅडम यांनी मला सांगितले की, मॅडम आपली कृतिका नाही राहिली. मला धक्काच बसला मी म्हणाले कसं काय?तर त्या म्हणाल्या, कृतिकाला जवळपास महिनाभर ताप होता. तिला गावाजवळच्या दवाखान्यात नेलं. ताप कमी होत नव्हता म्हणून तालुक्यातील दवाखान्यात नेलं. तिथल्या डाॅक्टरांनी सांगितले की, कृतिकाच्या शरिरात रक्ताची कमतरता आहे. नंतर रक्त चढवले. पण एका रात्रीमध्येच रक्त आणखी कमी झाले. त्यानंतर डॉक्टरांनी नागपूरला नेण्यासाठी सांगितले.
कृतिकाला नागपूरला नेलं. कितीतरी रक्त चाचण्या केल्या. काही समजले नाही, म्हणून डाॅक्टरांनी ‘बोन मॅरो’ तपासणी करायची ठरवले. परंतु, माझ्या मुलीला योग्य ट्रिटमेंट देत नाही आणि आम्हाला बोनमॅरो चेक करायचा नाही म्हणून तिला घरी आणले. तिच्या खाटेभोवती देवादिकांचे फोटो ठेवले. ती नुसतं पाणी पीत होती. तिला उठता बसता येत नव्हते, तरी घरी हवन केले. जबरदस्तीने पुजेला बसवले. तेव्हा सर्व विद्यार्थी तिथे होते आणि सांगत होते की ती खूप थरथरत होती, आचके देत होती तिचं शरीर हलणं थांबत नव्हतं. परंतु तिला राख पाणी लावून देण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही आणि सकाळी तिची प्राणज्योत मालवली. दवाखान्यामधून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला. तिला नागपूरला दवाखान्यात ठेवलं असतं आणि योग्य उपचार केले असते तर ती आज जिवंत असती. आपले देव तिला स्वस्थ करतील ही अंधश्रद्धाच तिचा जीव घेऊन बसली.
खरंच लोकांनी देव, बाबा यांना अवास्तव महत्त्व दिले आहे. अजूनही सुशिक्षित लोकांना पोटदुखी, ताप आणि मोठ्या आजारांसाठी सुद्धा गंडेदोरे बांधताना,राख घेतांना बघितलं आहे. त्याचे दुष्परिणामही सांगितले आहेत, परंतु आपल्या गावखेड्यातच नाही तर शहरात सुद्धा भोंदूगिरी सर्रासपणे सुरू आहे. त्यांचा विज्ञानापेक्षा बुवाबाजीवर जास्त विश्वास आहे. माणूस आता चंद्रावर पोहचला परंतु अजूनही आपण पुरातन युगातच जगतो की, अश्मयुगात जगतो काही कळत नाही.
आम्ही शिक्षक लोक विज्ञानाचे पुरस्कर्ते, परंतु अजूनही किती तरी समुहात हा मेसेज दहा लोकांना पाठवल्यास तुमचं अमुक पध्दतीने भलं होईल असे संदेश शिक्षकांद्वारे सुध्दा पाठवले जातात. म्हणजे लोक अजूनही त्याच तंत्र मंत्राच्या भ्रमातून बाहेर पडले नाही. यज्ञ, हवन, बळी, नवससायास हे सगळं मनोकांक्षा पूर्ण करण्यासाठी करतात. खरंच होतात काय मनोकामना पूर्ण? आपल्या सकारात्मक ऊर्जेमुळे काही गोष्टी साध्य झाल्या तर त्याला नाव एखाद्या बुवा, बाबांचा दिले जाते. म्हणजे थोडक्यात भारतातील सडका सुधारल्या माणसे तेवढी सुधारायची राहिलीत. लोकभ्रम सुटता सुटेना आणि अंधश्रध्दा काही मिटेना..असं झालंय आपलं.
“सरली नाही घटिका मानवा
नको जाऊस अंधश्रद्धेला बळी,
अंधश्रद्धेने खपली इथे
कित्येक बाल वृद्ध अवेळी….”
संगिता रामटेके/भोवते
साकोली, जि.भंडारा.
=======



