आगरी व कोळी समाजातील फरक
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी, उमरेड रोड,नागपूर
आगरी व कोळी समाजातील फरक
बर्याच लोकांना वाटतं की, आगरी व कोळी म्हणजे एकच आहेत. ते वेगवेगळे आहेत की, एकसमान असा सर्वाना प्रश्न पडतो. काहीना हे सारखे वाटतात. कारण त्यांच्या राहणीमानात आणि परंपरेत सारखेपणा आहे. आगरी व कोळी समाज हा मुंबई व कोकण किनारपट्टीवर आढळतो. कोकणपट्टीवर असणाऱ्या या आगरी समाजाने भातशेती फुलवली व त्याचबरोबर मिठागरे चालवून आपले आर्थिक जीवन सांभाळले. दुसरीकडे बघितले तर प्राचीन काळापासून कोळी समाज समुद्राशी जोडलेला आहे. मासेमारी हा त्यांचा व्यवसाय म्हणून त्यांना ‘समुद्राचे राजे’ असेही म्हणतात.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर भागात मोठया प्रमाणात आढळणारा समाज आपल्या जीवनशैली ओळखून दोन्ही समाज आपले पारंपरिक सण मोठया उत्साहात साजरे करतात. आगरी लोक नवरात्री, गणपती आणि होळी मोठया उत्साहाने साजरी करतात. कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा अत्यंत महत्वाचा सण आहे. त्या दिवशी कोळी समाज नौकेला नारळ अर्पण करून समुद्राला धन्यवाद देतात. पुढील मासेमारीसाठी शुभेच्छा मागतात. दोघेही एकवीरा देवीला कुलस्वामी मानतात पण त्यांच्या इतर देवता व श्रद्धा वेगवेगळया आहेत. आगरी समाज भवानीदेवी, जोखाई माता, म्हसोबा आणि भैरोबा यांची पुजा करतात. कोळी समाज जोखाई देवी यांना मानतो. आगरी समाज जमिनीशी तर कोळी समाज समुद्राशी जुडलेला आहे. आगरी समाज जास्त महत्व ग्रामदेवतांना देतात; तर कोळी समाजाला समुद्ररक्षक देवता जास्त महत्वाच्या असतात.
आगरी समाजाची भाषा मराठीतून थोडी वेगळीच, गुजराती व हिंदी मिश्रीत असते. तर कोळी समाजाची भाषा खेडवळ मराठीत असते. पारंपरिक पोशाखाकडे बघितले तर आगरी पुरूष धोतर आणि साधा शर्ट तर स्त्रिया नववारी साडी घालतात. कोळी समाजात पुरूष आंठया नावाचा पारंपरिक कपडा घालतात, तर स्त्रियांची साडी नेसण्याची पध्दत वेगळी असते जी मासेमारी करताना हालचाली करीता सोयीस्कर व अनुकूल असते. खाण्यापिण्याच्या बाबतीत आगरी समाज भात, नारळाची चटणी, चिकन, बकऱ्याचे मटन, कोळी समाजातील जेवणात मासे, झिंगे, इतर समुद्रीपदार्थ, सुकट, चटण्या जेवणात असतात. आधुनिक काळात दोन्ही समाज आता मोठया प्रमाणात प्रगती करीत आहेत. आगरी समाजातील लोक आता रियल इस्टेट, जमीन, शेती व्यवसायानी पुढे गेलेत. कोळी समाजातील लोक पर्यटन, मासेमारी आधुनिक व्यवसायात समृध्द आहेत.
कोळी समाज हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक समृद्ध आणि संघर्षशील समाज आहे. गिरगाव, वसोबा, मालाड ,पालघर, ठाणे या भागात आढळतो. त्यांच्या इतिहासात त्यांनी अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय आव्हानाचा सामना केला आहे. कोलीय वंशाशी त्याचा संभाव्य संबंध ब्राम्हणी वर्णव्यवस्थेपूर्वी व नंतरची स्थिती स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान आणि सद्यस्थितील सामाजिक व राजकीय सहभाग हे सर्व त्याच्या समृद्ध वारशाचे प्रतिक आहेत. आजच्या घडीला कोळी समाजाने शिक्षण आणि राजकारण त्याच्या संघर्षमय इतिहासातून भावी पिढीने प्रेरणा घेण्यासारखे आहेत. आगरी समाज मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, नाशिक, वसई,अलिबाग या भागात यांची मोठी वस्ती आहे. या समाजात गळाभर सोन, अंगठ्या, अंगावर असतात. यांना मुंबईचे भूमीपुत्रच समजले जाते. आगरी समाजात हळदी कार्यक्रम व डाळ वजळी हा पारंपरिक कार्यक्रम पाहण्यासारखा असतो. आगर म्हणजे मीठ पिकविण्याची जागा त्यांचे वंशज रावणाच्या दरबारात गायक, वादक होते. हे दोन्ही समाज शहराकडे स्थानांतरीत होऊन आपली संस्कृती भाषा जपत पुढे जात यशस्वी वाटचाल करीत आहेत.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी, उमरेड रोड,नागपूर
======



