आठवणीतला पाऊस
सुमारे तीस, पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी पोस्टींग कुही तालुक्यातील ‘फेगड’ या गावी होती. पावसाचे चार महीने ओढे, नाले तुडूंब भरून वाहायचे. एका गावाहून दुसऱ्या गावी जायचं तर पायी जाण्याशिवाय मार्ग नव्हता. असाच एकदा पाऊस धो धो कोसळत होता. अॉगस्ट महिना असेल कदाचित. ओढे, नाले भरून वाहात होते. मी गावाकडे होती. माझे मिस्टर माझ्या मुलीला (तेव्हा ती तीन वर्षाची होती) घेऊन माझ्याकडे यायला निघाले. तीन वाजताची बस उशीराच सुटली. ती रात्री दहा वाजता. गोठणगावला येऊन थांबली. इकडे ओढे भरून वाहत असल्यामुळे बस गावात यायची नाही. गोठणगाव वरून दिड ते दोन किमी. अंतर होते.
माझे मिस्टर आणि एक गावातील महिला दोघे गावाकडे यायला निघाले. मुलगी बाबांच्या खांद्यावर होती. चालता चालता अंधारात रस्ता चुकले. पुढे पुढे जात असतांना अचानक पुढे पाय टाकणार तो विज चमकली आणि वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र दृष्टीस पडले. पुढे गेलेला पाय परत मागे घेतला. बापरे… ! थोडक्यात निभावले होते. दोघेही थोडा वेळ थांबले आणि इकडे तिकडे बघू लागले. दूरवर दिवे दिसले. काट्याकुट्यातून वाट काढत गावात पोहोचले. ते जीवनापूर गाव होते. तिथे ओळखीच्या लोकांकडे रात्र काढून सकाळी घरी पोहोचले. पायात कितीतरी काटे मोडलेले होते. प्रसंग ऐकून माझ्या अंगावर सारखे काटे येत होते. थोडक्यात काळ आला होता पण वेळ नव्हती आली. विजेने अगदी वेळेवर सावध केलं. नाहीतर……..!
सविता धमगाये, नागपूर
========



