नवं नातं
कोणतीही नवीन नाती विश्वासाने निर्माण होतात. ज्या वेळेला आपला किंवा समोरच्या माणसांचा विश्वास एकमेकांवर बसतो त्याच वेळेला माणसाचे नवीन नाते निर्माण होते. या नात्याच्या विविध पायऱ्या आहेत म्हटलं तरी चालेल. जसे आई – मुले. बहीण – भाऊ. मित्र – मैत्रिणी. प्रियकर – प्रेयसी. प्रेमी – प्रेमिका. निखळ मैत्री. अशी खूप सारी नाती सांगता येतील आपल्याला. या व्हाट्सअपच्या, फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक नवीन मित्र मैत्रिणी मिळतात.
त्यातीलच काही चांगले असतात. त्यांच्याशी आपली छान मैत्री होते. तर काही उगाचच मैत्री करायला पुढे हात केलेला असतो. त्यात भावना असतात. प्रेमाचा लवलेश मात्र अजिबात दिसत नाही. चला छान दिसते म्हणून मैत्री करु ह्याला अर्थ प्राप्त नाही. मग यातूनच पुढे काही अशा अघटीत घटना घडतात, की त्या समाजासमोर आणताना सुद्धा लाज वाटते. मग त्यात फसवेगिरी खूप असते. उदाहरण द्यायचे झाले तर…; कोणाला आर्थिक अडचण असते, कोणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनू इच्छितो, कोणी नुसता बोलण्याचा आनंद घेतो. पण या सर्वांचा काहीही उपयोग होत नाही. माणसाची फसवणूक होते. आणि भोळी माणसं याला निश्चितच बळी पडतात. तर या सोशल मीडियापासून सावधानतेने राहिलं पाहिजे.
यातही काही अनेक छान लोकं मिळून जातात. उत्तम मैत्री होऊ शकते. नवीन नाती निर्माण होतात. आपल्यापेक्षा जर लहान मुलं असतील तर ती खरंच आपल्याला ताई, माई,आई अशा नावाने बोलतात. त्यांच्यातील ती नवीन नाती निर्माण करण्याची भावना स्पष्ट होते. कुणी निखळ मैत्रीसाठी हात पुढे करतो. खरोखरच ज्याला एखादी मैत्रीण किंवा मित्र हवा असतो. जो आतापर्यंत जीवनामध्ये लाभलेला नसतो. अशावेळी मित्र असायला काहीच हरकत नाही निखळ मैत्री करण्यासाठी. पण ही मैत्री करताना सुद्धा सावधानता बाळगावी हे मात्र निश्चित आहे. या मैत्रीमुळे आपण कुठेही फसायला नको. आपण खूप नाव कमवलेले असते, तर नाव घालवायला नको. नाव कमवायला अनेक वर्ष लागतात पण नाव घालवायला एक क्षण पुरेसा होतो.
मैत्री करावी चांगल्या लोकांशी. मैत्री करावी प्रामाणिकपणाशी. मैत्री करावी आंतरिक भावनांशी, मैत्री करावी संकट समय उपयोगी येणाऱ्या मित्राशी. मैत्री करावी आपल्या मनातील खरंच आपण समोरच्याला सांगू शकतो का? अशाच व्यक्तीशी. अशाप्रकारे आपली बहिण, भाऊ, आई, मुलगा खरी नाती असतील, तरीसुद्धा ही सोशल मीडियावर होणारी नाती सुद्धा तेवढीच खोलवर नाती निर्माण होवू शकतात. पण नात्यातील पारदर्शकता फार महत्त्वाची आहे. या नात्यात पैशाची मागणी नको. या नात्यात उगाच बंधनात अडकणे नको. वेळेला उपयोगात येणारी नाती हवीत. या नात्यात पुन्हा बरेच गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड सुद्धा तयार होतात. त्याला माझे काहीच म्हणाले नाही. पण आपला संसार आहे हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे. मर्यादा महत्त्वाच्या आहेत. आपले संस्कार आहेत. परंपरा आहेत. हे विसरून चालत नाही.
जर तुम्ही तरुण-तरुणी आहात, तर या सोशल मीडियावर स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे. नवं नातं तयार करताना विश्वासाने करावे. विश्वासघात कोणाचाही करू नये. कोणाच्याही भावनांची कदर करायला हवी. भावनांमध्ये गुंतवून त्याचा विश्वासघात करायचा नाही. हे लक्षात ठेवून नवीन नाते निर्माण करावे. नवीन नाती बनवताना खूप काही अडचणी येतात. आपण टीव्हीवर बघतो. पेपरमध्ये वाचतो. आजकाल फसवणुकीचे प्रकार खूप चाललेले आहेत. तरी आता आपण फसायचे की नाही हे आपण वैयक्तिक ठरवावे. असे परखड मत माझे आहे. “प्रेम विरांनो प्रेम करा”, पण कोणाचाही विश्वासघात करू नका. नाते टिकवून ठेवा. समोरच्या माणसाने विश्वास ठेवला आहे तर त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा – पुणे
=============



