काळ आला होता पण….!!
कुसुमलता दिलीप वाकडे
काळ आला होता पण….!!
1990 ची गोष्ट, तेव्हा आम्ही पती-पत्नी दोघेही चंद्रपूर जिल्ह्य़ातील भद्रावती येथे नोकरीवर होतो. हे आयुध निर्माणी येथे ‘सहाय्यक सचिव’, राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर मी जिल्हा परिषदेच्या आयुध निर्माणी शाळेत सहाय्यक शिक्षिका होते. माझे पती भावंडात मोठे असल्यामुळे नोकरीला लागताच त्यांनी आपल्या तीन बहिणी व एका भावाला आपल्याकडे शिक्षणाला आणले; तर सासू -सासरे वर्धेला राहत होते. माझे लग्न झाल्यानंतर पाच वर्षांनी मोठ्या नणंदेचे लग्न जुळले. चंद्रपूर जवळील सिनाळा येथील मुलगा होता.भद्रावती ते सिनाळा हे अंतर 35 कि.मी.अंतरावर होते.भद्रावतीला लग्न सुखरूप पार पडले.दुसर्या दिवशी मुलाकडे सायंकाळी स्वागत समारंभ असल्यामुळे वधुपक्षाकडील आम्ही 20-25 पाहुणे मंडळी सिनाळा येथे गेलोत.स्वागताचा कार्यक्रम आटोपून आम्ही दोघे पती-पत्नी स्कुटरनी सिनाळा येथून रात्री 10 च्या सुमारास भद्रावतीला घरी येण्यास निघालो.त्यावेळेस 33 वर्षांपूर्वी दुर्गापूर-सिनाळा मार्गावर जागोजागी खड्डे होते तसेच रस्त्यावरील लाईट कमी प्रमाणात होते.
माझे पती स्कुटर चालवत होते व मी मोठ्या मुलीला नेहाला, जी तेव्हा फक्त 6 महिन्याची होती.तिला घेऊन मागे बसले होते. रस्ता अनोळखी, मिस्टरांना खड्डयाचा अंदाज नसल्यामुळे स्कुटर खड्डयातून उसळली व माझ्या हातून मुलगी खाली पडली. ती स्कुटरच्या मागील चाकात येणारच, तेवढ्यात ‘मी जोरात ओरडले’.यांनी करकचून ब्रेक मारला. स्कुटरचे चाक मुलीच्या पोटाला जाऊन भिडले होते.मोठा अनर्थ टळला मुलगी रडायला लागली होती.चंद्रपूरजवळ असल्यामुळे रात्रीला दवाखाने सुरूच होते एका खाजगी दवाखान्यात गेलोत.डाॅक्टरानी नेहाला तपासले.काही झाले नव्हते,टी.टी.चे इंजेक्शन दिले आणि आम्ही घरी भद्रावतीला परतलो.
तसाच दुसरा प्रंसग लहान मुलगी श्रृतिकाच्या बाबतीत घडला.तेव्हा ती दीड वर्षाची होती. मधल्या नंणदेचे सकाळी काॅलेज तर लहान नंणदेची दुपारची शाळा व मला सुध्दा 10 वाजता शाळेकरीता घरची कामे आटोपून निघावे लागत असायचे. पतीचा डब्बा, सर्वाकरीता स्वंयपाक, मुलीची तयारी, शाळेची तयारी भरपूर घाई व्हायची. झाडू आवर-सावर नंणद सांभाळून घ्यायच्या.त्या दिवशी लहान मुलगी श्रृतिका हिला आंघोळ करुन बेडवर ठेवले व दुसर्या खोलीत टाॅवेल आणण्यास गेले येऊन बघते तर काय….? मुलगी पलंगावर नाही…!!
तेव्हा आम्ही आयुध निर्माणी वसाहत भद्रावती येथील वरच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. खालच्या क्वार्टरपासुन आमचे क्वार्टर 25 फुटावर दुसर्या मजल्यावर होते.त्या रुमच्या खिडकीला लागून बेड लावला होता.खिडकीच्या राॅडला तिच्या दोन्ही हाताची बोटे दिसलीत. मला घडलेला प्रकार लक्षात यायला वेळ लागला नाही. परंतु मी जर ओरडले असते किंवा आवाज जरी काढला असता तर, तिने खिडकीच्या राॅडला पकडून ठेवलेला हात सोडला असता.मी जराही आवाज न करता अलगद तिचे हात पकडून श्रृतिकाला आत घेतले.कारण शरीर लहान असल्यामुळे मुलीचे संपूर्ण शरीर बाहेरच्या बाजूस गेले होते. तो क्षण आठवला की, आजही अंगावर काटा येतो. अशाप्रकारे दोन्ही मुलीच्या बाबतीत वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागले. म्हणून म्हणतात ना, ” काळ आला होता,पण वेळ आली नव्हती”.हे दोन्ही क्षण माझ्या मनपटलावर कायमचे कोरले आहेत.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
=========



