‘जगायचे ना तुला’ ?.. मग बिळातच बरा !; शर्मीला देशमुख
मंगळवारीय बालकवी स्पर्धेचे परीक्षण
‘जगायचे ना तुला’ ?.. मग बिळातच बरा !; शर्मीला देशमुख
मंगळवारीय बालकवी स्पर्धेचे परीक्षण
निसर्गा तुझी सृष्टी
किती नवल करावे
निर्मिलेस तू किती
गणित कसे मांडावे
जितके तुला जाणावे
कोडे वाढतच जावे
का शिकवलेस बरे ..?
अस्तित्वासाठी भांडावे..
अकल्पित ,अनाकलनीय ,अतर्क्य, आवाक्याबाहेर असणारी ही सृष्टी. विविध प्राणी, पक्षी वनस्पती यांनी सजलेली, बहरलेली अशी ही सुंदर वसुंधरा. प्रत्येक निर्मिती मागे योजना आणि नियोजन करणारा निसर्ग, अतीव सूक्ष्म जीवांपासून अवाढव्य प्राण्यांपर्यंत कसे बरे केले असेल निसर्गाने निर्मितीचे नियोजन..? प्राणी म्हटले तर विविधता आलीच, जलचर , भूचर , उभयचर , निशाचर तसेच अधिवासाचा विचार केला तर पाण्यात, हवेत, झाडावर, जमिनीवर , जमिनीखाली, वनस्पतींवर ,मानवी शरीरावर, शरीरात ..अरे बापरे ! नको विचार करायला.
या निसर्गाचे गुढ जेवढे समजण्याचा प्रयत्न करावा तेवढे वाढत जाणारे. खरं म्हणजे निसर्गाने अन्नसाखळी बनवली कोणी उपाशी राहू नये आणि कोणाची संख्या बळावून निसर्गाचा समतोल ही ढळू नये .हे झाले निसर्गाचे पण निसर्गाने बनवलेल्या मानव प्राण्याचे काय ? बुद्धिमत्तेने श्रेष्ठ म्हणून मानव प्राणी सर्वश्रेष्ठत्वाचा ताज घेऊन बसला आणि वसुंधरेवर जणू आपलेच हुकूमशाही राज्य चालवू लागला. सर्व प्राणी वनस्पती जणू मानवाची मालमत्ताच बनली.
आता म्हणाल निसर्ग, प्राणी ,वनस्पती वरून अचानक मानवी वृत्ती प्रवृत्ती याकडे कुठे ?अहो , मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेमध्ये नाही का “बिळातच बरा” हा विषय आपल्या राहुल दादांनी दिला .त्याबद्दल बोलतेय. बिळातच बरा म्हणजे जे प्राणी बिळात राहतात उदाहरणार्थ विंचू , मुंगूस, गोम ,मुंग्या, ससे , उंदीर , घुशी , गांडूळ ,खेकडे ,साप (कोब्रा ) टेरेडो वंशाचे प्राणी (लाकडाला बीळ करून राहतात )तसेच तीळ ,गोफर, ग्राउंड होग किंवा वुडचक , ध्रुवीय अस्वल, मोल ,मिरकाटस ,कांगारू असे एक ना अनेक. कीटक आणि सूक्ष्मजीवांचा तर विचार करायलाच नको .म्हणजे बिळातच बरा हा विषय अनेक अर्थाने घेता येतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि प्रवृत्ती तितक्या कल्पना म्हणावयास हरकत नाही. आज बिळातच बरा या कल्पनेचे विजेते प्राणी म्हणजे साप, ससा , उंदीर , मुंगळा हे ठरले म्हणावयास हरकत नाही.
निसर्गनिर्मित जीव व अधिवास हा ठरलेला आहे. आता हे बिळात राहणारे जीव शक्यतो रात्री अप रात्री बाहेर पडून आपले पोट भरण्याचा प्रयत्न करतात. आता जीवन जगायचे तर संकटांचा सामना तर करावा लागणारच ना ? आजच एक बातमी ऐकली मालकानेच आपल्या पाळीव कुत्र्याला फाशी दिली.. इतका क्रूर का तू मानवा? आमच्या शिलेदार ताई दादांनाही बाल कल्पनेतून तेच सांगावयाचे आहे, बालमन तसे संवेदनशीलच असते. नागोबा , ससोबा, उंदीर मामा तुम्ही बिळातच राहा. कारण बाहेर आलात तर तुमच्या जीविताला धोका आहे आणि तुम्ही बाहेर आलात की नासाडीच करत राहता त्यापेक्षा तुम्ही बिळातच बरे.
तसे पाहता समूहातील शिलेदारांनी लेखन केले आणि विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला .पण बऱ्याच शिलेदारांनी का कुणास ठाऊक स्वतःच्या कल्पनांसोबत न्याय केला नाही आणि समूहात पुन्हा शुकशुकाट जाणवला .असो, मनातील कल्पना बिळातच बऱ्या म्हणण्यापेक्षा त्यांना बाहेर पडू द्या आणि बाह्य विश्वात त्यांचे भरण पोषण करून त्यांना बहरू द्या अशी माफक अपेक्षा. राहुल दादांनी मला बालकाव्य स्पर्धेच्या निमित्ताने परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल शतशः ऋण व्यक्त करून थांबते.. धन्यवाद !
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक /संकलक /परिक्षक
मराठीचे शिलेदार समूह



