असावे घर’टे’ (ते) आपले छान.!
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहिल्या नगर
असावे घर’टे’ (ते) आपले छान.!
एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासह जिथे राहते ते ठिकाण म्हणजे घर..आणि याच घराला घरपण यावं यासाठी तिथे प्रेम जिव्हाळा यांची गरज असते. घरात राहणारी माणसं ही काही कोणी परकी नसतात, त्यांच्यात एक प्रकारचे ‘ना…तं’ असतं..! आई,वडील, मुलगा, सून पण ही नाती केवळ नात्यापुरती नसावी. त्यांच्यात परस्पर माया, ममता, काळजी, चिंता असेल तरच तिथे आपुलकी निर्माण होते. ‘एक सुरक्षित असं आरामदायी आश्रयस्थान’ म्हणजे घर. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या जडणघडणीसाठी देखील घरच महत्वाचे असते. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी ‘निवारा’ ही एक गरज हे घरच पूर्ण करीत असते. आणि म्हणूनच ते आपल्याला प्रिय असायला हवे. दिवसभर काबाडकष्ट करून थकला जीव जेव्हा घरी येतो, तेव्हा त्याला विश्रांती आणि समाधान मिळण्याचं तेच एक महत्त्वाचं स्थान असतं. म्हणूनच कवी म्हणतात..
राजास जी महाली सौख्य कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या…!
म्हणजेच काय तर घर लहान असो वा मोठ्ठ, झोपडी असो वा महाल तिथे सुख शांती मिळत असते. ऊन वारा पाऊस यापासून तिथे शरीराचे संरक्षण ही होतं. मंदिरात जसे पावित्र्य असते तिथे गेल्यावर मनाला एक आत्मिक समाधान, शांती लाभते. आपल्या इच्छा आकांक्षाची पूर्ती होण्याचे एक ठिकाण म्हणजे देवाचे मंदिर,तसे आपले घर हे आपल्यासाठी मंदिर आहे.
मोठ्या माणसांची जशी आपल्या घराविषयीची संकल्पना, स्वप्न असतात तसे ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ असे लहान मुलांना वाटते. थोडक्यात काय? तर ते गोड, सुंदर असावं तसे पाहता घरी ही एक जादुई संकल्पना असते. कारण, तिथल्या सारखी माया उब इतरत्र कुठेही मिळणार नाही. जशी आपल्याला घराची गरज असते तशी घराला देखील आपली गरज असते. मग ते खेड्यामधले घर कौलारू असो व आकाशाला गवसणी घालणारे’ मजल्यावर मजले असणारे फ्लॅट असतात. मांगल्याच्या अंगणात पावित्र्याची रांगोळी जिथे रेखाटली जाते, त्याच घराला घरपण असते.
स्त्रियांच्या बाबतीत तर घर हा अगदीच जिव्हाळ्याचा विषय असतो. मग ती गृहिणी असो किंवा नोकरी करणारी स्त्री. आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ ती या घराशी जोडलेली असते जशी ‘घार उडते आकाशी’… तशी स्त्री जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ देत तिची नाळ तिच्या घराशी जोडलेली असते. आपले घर आणि घरटे ते ही आपल्या घरासारखे छान असावे, म्हणून तरच सुगरण जेव्हा घरट विणायला लागते काडी काडी जमवून कलाकुसरीने घरटं विणते. तेव्हा भल्याभल्यांना ते साकारण्याची तिची कला आजही अवगत झालेली नाही. म्हणूनच बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे. ‘खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला’
‘देख पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला’. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या संकल्पना, स्वप्न ही जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येकाला असे वाटते की, असावे घरटे ते आपुले छान!
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्या नगर



