‘मला घेऊन जा’ भावरंगात रंगलेली आर्त हाक: वृंदा करमरकर
सोमवारीय 'त्रिवेणी काव्य' स्पर्धेचे परीक्षण
‘मला घेऊन जा’ भावरंगात रंगलेली आर्त हाक: वृंदा करमरकर
सोमवारीय ‘त्रिवेणी काव्य’ स्पर्धेचे परीक्षण
“मला घेऊन जा” या चार शब्दांत किती भावना दडल्या आहेत! ही हाक आहे मनाच्या आतल्या ओढीची, कुणाच्यातरी मायेच्या कुशीत विसावण्याची. निसर्गाकडे पाहताना माणूस म्हणतो. “मला घेऊन जा, हिरव्या पानांच्या सळसळीमध्ये, त्या शीतल वाऱ्याच्या झुळुकीत, जिथे मनाला खरी शांती मिळते. मला घेऊन जा, जिथे पक्ष्यांचा किलबिलाट आहे,अथांग सागर वर नभाची विशाल शाल आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात माणूस थकला आहे. शहरातील कोलाहल, प्रदूषण, यंत्रामागे धावणे, अनंत अडचणी, प्रश्न यांच्या जाळ्यात अडकला आहे. त्यासाठी मनाला समाधान, शांती मिळवण्यासाठी निसर्गाच्याच कुशीत पुन्हा परतण्याची आस आहे त्याला. कधी प्रेयसी आपल्या सख्याला म्हणते, मला तुझ्यासह जगायचे आहे. “मला घेऊन जा त्या प्रेमाच्या घरट्यात, जिथे तू आणि मी, एवढंच माझं जग असेल.” तर सासरी जाचाला कंटाळलेली मुलगी आईबापाला म्हणते “आई, बाबा, मला घेऊन जा त्या बालपणीच्या अंगणात, जिथे मी पुन्हा निर्धास्तपणे जगू शकते. भवसागर पार करताना आलेल्या दु:खांनी हतबल झालेला भक्त देवाला म्हणतो, मला घेऊन जा तुझ्याकडे.अक्षय तुझ्या पायाशी राहण्यासाठी. जिथे ना वेदना, ना भीती, फक्त शांती आहे.” “मला घेऊन जा” ही केवळ विनंती नाही, ती आहे प्रेम, शांतता आणि मुक्तीची गहिरी प्रार्थना, जी प्रत्येकाच्या अंतःकरणात उमटते.
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या तुरुंगात होते. तिथे त्यांना मातृभूमीला भेटण्याची ओढ लागली. तेंव्हा त्यांनी चारी बाजूंना पसरलेल्या विशाल सागराला विनवणी केली,मला घेऊन जा सागरा मातृभूमीकडे. तिच्या कुशीत मी विसावणार आहे. रावणाने सीताहरण केले. तिला बंदिवासात ठेवले. तेंव्हा सीतामाईने मनातच प्रभू रामरायांना साद घातली असेल, “मला घेऊन जा या दुष्टाच्या तावडीतून सोडवून तुमच्यापाशी” एखाद्या स्त्रीचा पती सीमेवर तैनात असेल तर ती विरहिणी त्याला म्हणत असेल मला घेऊन जा तुझ्याजवळ.
“मला घेऊन जा” या चार शब्दांत माणसाचं संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. ही हाक म्हणजे केवळ वरवरची विनंती नाही, तर मनाच्या खोल गर्तेतून आलेली आर्त पुकार आहे. प्रत्येक जीवाला कधीतरी असं वाटतं कोणीतरी आपल्याला या दु:खातून, गोंधळातून, धावपळी तून बाहेर काढावं, शांततेच्या ठिकाणी घेऊन जावं, जिथं आत्म्याला विश्रांती मिळेल. ही हाक म्हणजे मायेचा शोध आहे .अनेक भावनांचे रंग ल्यायलेली ही हाक आहे. “ आजच्या त्रिवेणी काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला विषय वैचारिक आहे. त्यावर अनेक पैलूंतून लिहिता येऊ शकेल.
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



