“समुद्रपूजनाच्या साक्षीने, बहीण भावाचे नातं जपणारी नारळी पौर्णिमा”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे परीक्षण
“समुद्रपूजनाच्या साक्षीने, बहीण भावाचे नातं जपणारी नारळी पौर्णिमा”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे परीक्षण
आकाशात ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे प्रकाशित झालेला असतो आणि सूर्याच्या विरुद्ध दिशेला असल्याने तो रात्री आकाशात पूर्ण चंद्र म्हणून दिसतो तो दिवस म्हणजे ‘पौर्णिमा’. चैत्र महिन्यात पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती, वैशाखात बुद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ महिन्यात वटसावित्री तर आषाढातली गुरुपौर्णिमा. श्रावणातली नारळी पौर्णिमा, भाद्रपदातली प्रौष्टपदी तर अश्विनमध्ये कोजागिरी आणि कार्तिकमध्ये त्रिपुरारी. मार्गशीर्ष मध्ये दत्तजयंती, पौषमध्ये शाकांबरी तर माघमध्ये माघी आणि शेवटी फाल्गुनमध्ये हुताशनी.
संपूर्ण वर्षात हा पौर्णिमारुपी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो, तेव्हाच तर महाकवी कालिदास म्हणतात तसे “उत्सव प्रिय खलु मनुष्य”. वर्षभर आपण साजरा करत असलेले विविध सण उत्सव म्हणजे ऐक्याचे साधक, प्रेमाचे पोषक , प्रसन्नतेचे प्रेरक, धर्माचे संरक्षक आणि भावनांचे संवर्धक आहेत. असाच उत्सव जो आज आपण मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत तो नारळी पौर्णिमेचा अर्थात रक्षाबंधनाचा…! नारळी पौर्णिमा अर्थात, नारळ + पौर्णिमा… ‘नारळ म्हणजे चारित्र्य पूजनाची प्रेरणा देणारं, बाह्य सौंदर्याच्या अभावामुळे कमीपणा न मानता स्वतःचे अंतरसौंदर्य फुलवणारं हे फळ’. तर पौर्णिमा म्हणजे शांत शीतल प्रकाश देणारा प्रकाशाचा खरा सण.
नारळी पौर्णिमा हा समुद्रदेवतेच्या पूजनाचा दिवस भारताच्या समुद्र किनारपट्टीवर मच्छीमार समूह हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ‘पावसाळा समाप्तीचा व मासेमारी प्रारंभ करण्याचा मुहूर्त’. या दिवशी ते समुद्राला नारळ अर्पण करतात व देवाकडे स्वरक्षण आणि समृद्ध हंगामाचे साकडे घालतात. याला नाच गाण्याची साथ आणि संगीतही असतेच. याच दिवशी बहिण व भावाच्या प्रेमाचा सण अर्थात रक्षाबंधन ही साजरा केला जातो तेव्हाच तर…
‘सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा..,
मनी आनंद मावेना कोळ्यांचे दुनियेचा….’
तर काही ठिकाणी…
‘सोन्याचा नारळ वाहीन मी तुला…
हे देवा तारू येऊ दे बंदराला….,
या गीतांची रेलचल असते…’
हा उत्सव म्हणजे “सागर सर्व तीर्थांनी” या वचनाचे महत्त्व समजून देणारा आनंद मेळाच. हे खऱ्या अर्थाने सागर पूजन सर्व नद्यांची शक्ती जरी मिळाली, तरी सागर बिघडत नाही, उन्मत्त बनत नाही, स्वतःच्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही. चार पैसे मिळतात उन्मत्त बनून स्वकुळाची, समाजाची, राष्ट्राची, धर्माची किंवा संस्कृतीची मर्यादा झुगारून देण्यास उद्युक्त होणाऱ्या मानवाला सागराची ही नम्रता ज्या वेळेस समजून येईल, त्यावेळेस मानव खऱ्या अर्थाने मानव बनेल असे मला वाटते.
मराठीवर प्रेम करणारे सर्व बंधू-भगिनींनो.. आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ परीक्षणाची माझ्यावर जबाबदारी दिली. ऊसाच्या शेताच्या आजूबाजूला जर एरंड लावलेले असेल तर, त्या एरंडला पाणी देण्याची गरज नसते. माझ्या बाबतीतही असंच काही..! तसं पाहता मी विज्ञाननिष्ठ….तरी असता केवळ आणि केवळ माझी सहचारिणी सौ. सवूच्या सानिध्यात राहत असल्यामुळे तिच्या प्रतिभा शक्तीचा काही अंश म्हणजे मी आज जे काही लिहिलं आहे ते….!! आणि याची दुसरी बाजू म्हणजे ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांचा माझ्यावर असलेला दुर्दम्य विश्वास. मी प्रयत्न केला आहे निश्चितच तुमच्या सर्वांच्या सूचनांचं मी मनापासून स्वागत करेल. ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेत आवर्जून भाग घेणाऱ्या सर्व कवी, कवयित्री यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन…!!
श्री.प्रशांत ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली, केंद्रशासित प्रदेश
परीक्षक/लेखक/ सहप्रशासक
©मराठीचे शिलेदार समूह



