स्थलांतर
आज इथं तर उदया तिथं, नशीब आमचं फुटके
करतो एकच विचार, खायला मिळतील का कुटके ?
लोकशाही कुठं नांदते,नाही रे आमास्नी कळत
कुटक्यासाठी घाम गाळणं, नाही आजही टळत
स्थलांतर करून थकलो जरी, नाही थांबता रे येतं
रक्ताचं पाणी केल्यावरचं पिकतात तुमची शेतं
कष्ट आमच्या हाती,मनावर नाही रे घाम गाळणं
जगण्यासाठी संघर्ष आमचा, नाही जमलं रे टाळणं
पदोपदी रे जातीवरून, दुजाभाव केला जातोय
बेगडी मुखवटा घालून मुजोर, समतेचा पोवाडा गातोय
दाखवायचे नि खायचे दात भिन्न,लबाड कोल्हे सारे
फुकट मिळालेलं घबाड फार नि अकलेचे तोडतात तारे
स्थिर जीवन नाही नशिबी, पाचवीला गरिबी पुंजलेली
पोटासाठी कसरत कधीबी, भविष्याची बारा वाजलेली
घर नाही,दार नाही, नाही कायमचा आम्हां ठिकाणा
स्थलांतर करतो गावोगावी झीजती पायातल्या वहाणा
उन्हात चांदणं पडण्याची वाटतात आम्हां दिवस्वप्नं
कधी संपेल सांगा आमचं पोटासाठी सदाचं खपणं?
कधी संपेल सांगा आमचं पोटासाठी सदाचं खपणं?
संग्राम कुमठेकर
जि.लातूर
=======



