समस्या वयात येणाऱ्या मुलांच्या..!!!
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे

समस्या वयात येणाऱ्या मुलांच्या..!!!
काल माझ्याकडे आठवीत जाणारी मुलगी आली होती. ती नक्कीच सातवीची परीक्षा देत आहे. ही मुलगी माझ्याकडे पहिली ते चौथीच्या वर्गात शिकत होती. त्यामुळे सर्व संस्कार तिच्यावर माझे झालेले आहेत. तिच्या वर्गातल्या जवळजवळ दहा मुले तरी माझ्याकडे कायम येत असतात. त्यांचे पालक त्यांना घेऊन येतात आणि बाई यांना मार्गदर्शन करा असे नेहमी सांगत असतात. सांगायचा मुद्दा हा की, काल सुद्धा या मुलीला तिची आई घेऊन आली. जवळ जवळ पाच वाजता तिने माझ्याकडे आईने तिला सोडलं आणि ही मुलगी माझ्याकडे साडेआठ पर्यंत होती. विशेष म्हणजे तिची आई आमच्या बिल्डिंग खाली बसून होती.
मी बाहेर गेले होते. मला जसे हिने पाहिले तसे ती मला खालीच बिलगली आणि रडायला लागली. मी तिला घेऊन घरी वर आले. आणि अक्षरशः ती पूर्ण माझ्या कोलमडली. तुटून पडली. मला आवळून रडायला लागली.. तिला शांत केले. माझेही डोळे वाहत होते. तिला शांत केले. म्हटले तुला जे सांगायचे ते सर्व मनातले सांग. ती शांत झाली, पण छताकडे एकटक बघत राहिली. तिला पुन्हा विचारले बोल काहीतरी… आई वाट पाहतेय खाली.ती बोलली बाई आपण दोघीच हव्यात एका रूम मधे जाऊ. मी तिला बेडरूममध्ये नेले. मी जरा तिला बोलते केले. प्रश्न विचारले.. तुला कोण त्रास देतंय, आईबाबा बोलतात का?, आजी रागावते का?, शिक्षक बोलतात का?, पेपर कसे चाललेत?, का कोणी आपल्या वर्गातला मुलगा त्रास देतो… की आणखी काय हे सांग.. आणि तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे म्हणून आईने तुला इकडे आणले.. आता मन साफ कर. बोल बेटा …
पहिले तिने आईबाबा बोलतात म्हणून सांगितले. तिला परत विचारले, ‘आई बाबा बोलतात असे तू काय केलेस.’? ते दोघेही शांत आहेत माहित आहे. तिने सांगितले मला आजीकडे ठेवणार आहेत. तिकडच्या शाळेत घालणार आहेत. परत असे का करणार कोणी मुलगा त्रास देतो का असे विचारले. ती नाही बोलली. हळूहळू तिला बोलते केले. ती रडत होतो. बोलत होती. मलाही रडू येत होते. हळूच तिला समजावत, धीर देत, पाठीवरून हात फिरवत होते. ती आता खूप शांत झाली.तिच्या मनातले ती बोलू लागली.
एक त्यांच्या जवळचा मुलगा 9 वी मधला तिला लाईक करतो. ती पण त्याला. आणि दोघे 6 महिन्यापासून मित्र आहेत. हे आई बाबांना समजले आणि मला दोघेही बोलले.. पण बाई तो खूप चांगला आहे. त्याची आई, बहीण आमच्या घरी येतात. त्यांच्या घरी माहित आहे. पण माझ्या आईबाबांना ते नकोय… एवढे बोलून ती परत माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. मी माझा पवित्रा जरा बदलला. तिला बोलले राणी कोण आहे तो? कोणत्या शाळेत आहे. त्याचे आईबाबा काय करतात.. या प्रश्नांची उत्तरे तिने दिली. आता माझा रोल काय करावा… जरा विचार केला आणि तिला सांगितले, समजावले… राणी तुमचे हे वय नाही या गोष्टीचे.. 8 वी, 9 वी, 10 वी ही वर्ष जीवनातील फार महत्वाची आहेत.
आत्ता तुम्ही फक्त अभ्यास करा. उत्तम मार्कांने पास व्हा. (तशी ही मुलगी 90% च्या पुढची आहे.) तिला समजावले. त्यालापण सांगायला लावले. पुढचे संभाव्य धोके समजावून सांगितले. त्याने एकट्याने तुला एकटीला बोलवले तर जावू नकोस, त्याला तुझ्या तनुला स्पर्श करू देऊ नकोस… तिला खूप उदाहरणे दिली. सध्या जगात काय चाललेय समजून सांगितले. Good touch, Bad touch… मी 3 री,4 थी च्या वर्गात घेत असे. त्याची पुनरावृत्ती तिला परत करून दाखवली. तिला पटवून दिले. कोणालाही आपल्या शरीराला हात लावू द्यायचा नाही. आणि त्या मुलाबरोबर तू राहिली तर तोटे किती होतील कसे होतील हे सर्व शब्दात मांडणी करून सांगितले. आईबाबा वाईट नाही तुझ्या भवितव्याचा विचार करून बोलतात हे मनावर बिंबवले.तिलाही त्या गोष्टी समजल्या. पण ती जे नंतर बोलली ते मला खूप भावले…
बाई, मी असे काहीच केले नाही, करणार नाही, कोणाला माझी आणि मलाच माझी लाज वाटेल असे वागणार नाही. आजही मी खूप अभ्यास केलाय. मार्क छानच घेणार. पण जो मुलगा वाया चालला होता त्याला मी सुधारत आहे. त्याच्या सवयी ज्या वाईट आहेत त्या मी बदलतेय. त्यात मला यश येतेय. मी 50% त्याला बदलले आहे. त्याचे आई, बाबा,बहीण मला आवडतात मी त्यांना आवडते. त्यानी पण अट घातलीय दोघांनी शिका, नोकरीला लागा मग आपण बघू…!!
मी पण तिला हेच सांगितले. शिक्षण महत्व, त्याचे खोलवर होणारे चांगले, वाईट परिणाम. जीवन आधार म्हणजे शिक्षण होय. अनेक गोष्टी तिला समजावल्या तिला त्या समजल्या ती आता विचारात पडली… मी काय करू? तिने मला वचन दिले. “बाई मी त्याला वाईट मार्गपासून दूर करीनच पण शिक्षणही पूर्ण करणार”. खूप छान मार्क मिळवणार. तुम्हांला, आई बाबांना माझा अभिमान वाटेल असेच काम करणार.. मला 10 वी नंतर पोलीसात भरती व्हायच आहे. मला तेंव्हा मार्गदर्शन करा. मी जीवनभर तुम्हांला विसरू शकत नाही. माझ्या आईपेक्षा तुम्ही मला समजून घेतलं. पुढेही ती माझे मार्गदर्शन घेते बोलली. आणि मन रिते केले. आनंदी झाली.
मी तिला बोलले, “अगं, इतके छान बोलायला कुठून शिकलीस..”? तिने माझ्याकडे हात केला. बोलली, बाई चार वर्ष तुमच्या मायेखाली वाढले. सर्व तुमच्यामुळे शिकत आहे. मी कायम लक्षात ठेवीन तुम्हांला. विसरणार नाही कधी माझ्या बाईंना..!! आता फक्त एकच सांगते बाई.. मी त्या मुलाला तुम्हांला भेटायला पण आणते. मला जसे सांगितले तसे तुम्ही त्याला पण सांगा. नक्कीच आम्ही दोघे तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. खूप शिकू, मोठे होऊ, नोकरी चांगली करू. घरची परिस्थिती बदलू. तुमचे नाव, आईबाबाचे नाव अभिमानाने रोशन करू…! तिला जरा जवळ घेतले आणि आईजवळ सोडून आले. आईने तिच्यादेखत जे सांगायचे ते सांगितले मी त्यांना शब्द दिला आत्ता असे करणार नाही ती… आई बोलली म्हणूनच बाई तिला तुमच्याकडे आणले. ती सारखे तुमचे नाव घेत होती.. आणि त्या दोघी गेल्या.
हे सर्व सांगण्या मागे एक कारण, पालकांनो आपल्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या वयात येताना त्यांना समजून घ्या. त्यांना बोलते करा. मारू नका. त्यांची काळजी घ्या. त्यांना अपशब्द बोलू नका. त्यांच्या हालचालीकडे लक्ष द्या. त्याचे म्हणणे ऐकून घ्या. योग्य मार्गदर्शन करा. मग आपले मूल आपले ऐकतेच हा माझा अनुभव आहे.
‘आपला मुलगा
आपला राजा,
त्याचे म्हणणे ऐका
नका देऊ सजा….’
‘आपली मुलगी
दिवा दोन्ही घरचा,
सांभाळा तिला
ती आधार कुटुंबाचा…’
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे
==========



