अंडाकृती खा-या पाण्याचे लोणार सरोवर
स्वाती मराडे पुणे
अंडाकृती खा-या पाण्याचे लोणार सरोवर
जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातले लोणार सरोवर. याची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून १५० कि.मी. अंतरावर हे सरोवर आह ते बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे व याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखी प्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे मानले जात होते. पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तिथे आदळल्याने ते निर्माण झाले असे सिद्ध झाले. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्यासाठी रोहित पक्षी येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.
हे सरोवर वरच्या बाजूला १.२ किलोमीटर व्यासाचे आहे व १३७ मी खोल आहे. संपूर्ण मिळून लोणार सरोवर १.८ किलोमीटर रुंद आहे. समुद्रसपाटीपासून उंची ४८० मी. आहे
तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची जुनी मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे सरोवरात आहेत. तर काही आणखी मंदिरे आजूबाजूच्या परिसरात आहेत. आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.
येथे असणारी सासू सुनेची विहीर वैशिष्ट्यपूर्ण आहे. सासु-सूनेच्या या विहिरीतील देवीच्या मंदिराकडील पाणी हे गोड आहे, म्हणजेच ते सुनेचे पाणी होय. तर विरुद्ध बाजूचे पाणी हे खारे म्हणजेच ते सासूचे पाणी होय. त्यामुळे तिला सासु-सूनेच्या विहिर असे संबोधले जाते. भारतातील परंपरेत तीर्थचे विविध प्रकार सांगितले आहे. जलतीर्थ व मोक्षतीर्थ असे दुहेरी सासू-सुनेचे विहिरीचे पौराणिक महत्त्व सांगितल्या जाते. त्यामुळे ही विहीर पर्यटकांसाठी आकर्षण केंद्रबिंदू आहे.
लोणार सरोवराच्या पाण्यात बीटा-कॅरोटीन भाज्यांमध्ये आढळणारे रंगद्रव्य आढळते. त्यामुळे काहीवेळा याचे पाणी गुलाबी रंगाचे दिसते. बीटा कॅरोटीनचे प्रमाण वर्षाच्या वेळेनुसार आणि सरोवराला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रमाणानुसार बदलते. उन्हाळ्यात जेव्हा तलाव अधिक उबदार असतो आणि अधिक सूर्यप्रकाश प्राप्त करतो, तेव्हा पाणी सामान्यतः उजळ गुलाबी रंगाचे असते. हिवाळ्यात, जेव्हा तलाव थंड असतो आणि कमी सूर्यप्रकाश मिळतो, तेव्हा पाणी सामान्यतः गडद गुलाबी रंगाचे असते. ही एक नैसर्गिक घटना असून मानव किंवा प्राण्यांना हानीकारक नाही.
सौ.स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



