यशाची गुरुकिल्ली
अरुणा आगदीगे सुवर्णकार ता.नायगाव, जिल्हा नांदेड

यशाची गुरुकिल्ली
सर्वप्रथम यश संपादन करण्यासाठी योग्य त्या मार्गाने जावे लागते. त्यासाठी आपल्याजवळ दृढ आत्मविश्वास पाहिजे. ‘आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे’, असेच म्हटले पाहिजे. माझा मार्ग बरोबर आहे आणि मी तो मार्गक्रमण करणारच अशी दांडगी आत्मश्रद्धा ज्याची आहे त्याचा पराभव करण्यास कोणीच समर्थ नाही. हत्तीसारखी प्रचंड शक्ती असेल, पण सिंहाच्या बच्चासारखाही आत्मविश्वास नसेल, तर त्या सामर्थ्याचा काहीच उपयोग नाही. एकंदरीत श्रद्धाहीन म्हणजेच आत्मविश्वास रहित सामर्थ्य हे पूर्णपणे वांझ आहे असे म्हणता येईल. एखादा मनुष्य कोणत्याही कुळात जन्मला असला, तरी प्रचंड महत्वकांक्षेने आणि अचल श्रद्धेने तो महाकुलावंताच्या बरोबरीला येऊ शकतो.
‘खरे सामर्थ्य हे स्नायूंमध्ये नसून स्नायूंच्या मागे असलेल्या इच्छाशक्तीमध्ये आहे’. स्वयंपूर्ण परमेश्वराने सर्वश्रेष्ठ मानवाला पूर्णच स्वरूपात उत्पन्न केले आहे. आपणच आपल्यातला दिनपणा व दुबळेपणा उत्पन्न करीत असतो. जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, तर सर्वप्रथम यशाच्याच विचारांची दृढ कास धरावी लागेल. आपल्या श्रद्धेच्याद्वारे आपल्याला सर्व शक्तिमान परमेश्वराचे दर्शन होते. यश तरी मिळेल किंवा देह तरी पडेल एवढी श्रद्धा परिपूर्ण असेल तरच यश हाती लागते.
जगातील व जीवनातील सर्व चमत्काराची जननी श्रद्धाच आहे. श्रद्धेचे सामर्थ्य फार मोठे असते. श्रद्धेमुळेच आपण कोणतेही यश मिळवू शकतो, तसेच देवही मिळवू शकतो. कोणतेही यश मिळवायचे असेल तर नुसती श्रद्धा असून चालणार आहे का? तर त्यासोबतच कष्ट, प्रयत्नही करावे लागतात. अखंड कर्म करीत रहावे जर कर्म केले नाही व आळसात वेळ घालविला तर त्यामुळे दुर्गती प्राप्त होते. जे रात्रंदिवस आरामात राहतात व झोपा काढतात ते कम नशिबी ठरतात. या कर्मभूमीमध्ये कर्म हा कायदा आहे व कर्म न करणे हा गुन्हा आहे. कर्म हेच जीवन आहे.
कर्म करणारा परमेश्वर व प्रयत्न करणारा परमेश्वर स्वयंमेव बनतो. नेहमी कर्मवीरांचीच ईश्वर तुल्य पूजा होत असते. योग्य अशा कर्तव्याची निवड करून तन-मन-धनाने ते कर्तव्य पूर्ण करावे. तरच आपल्या श्रद्धेचे व कष्टाचे चीज होते व आपले आयुष्य यशस्वी होते. सोबतच आपण ध्येयासाठी वेडे व्हावे लागते जसे ध्येय समोर धरले तसेच श्रेय मिळते. उच्च ध्येय ठेवल्यास उच्चता व नीच ध्येय ठेवल्यास निचता प्राप्त होते. कष्ट करताना अपयश आले तर खचून जाऊ नये. अपयश हे पाप नव्हे तर क्षुद्र ध्येय हेच घोर पाप आहे. योग्य ध्येयप्राप्तीसाठी अखंड प्रयत्न हे करावेच लागतात. पण हे करत असताना अनेक संकटांना तोंड दयावे लागते.
जीवनात संकटे आल्याशिवाय आपल्याला भौतिक किंवा आत्मिक संपत्तीची प्राप्ती होत नाही. संकटे आली तरच स्वतःमधील तेजोबलाचा उदय होत असतो व आपली खरी चेतना बाहेर येते. अज्ञानाची निराशावादाची कवच फोडण्या इतका पुरेसा संकटाचा तडाखा बसल्याशिवाय मनुष्यातले खरे चैतन्य बाहेर येत नाही. उत्तम पैलू पाडून घेतल्याशिवाय हिऱ्याचे खरे हिरेपण व मूल्य कळत नाही. सोने भट्टीत घातल्याशिवाय त्याचा निश्चित नंबर ठरत नाही. त्याचप्रमाणे संकटे या उन्नतीच्या सुवर्णसंधी आहेत. चित्ताची एकाग्रता ही फार मोठी चमत्कार निर्माण करणारी दिव्यशक्ती आहे. एकाग्रतेमुळेच खरा दिव्य आत्मानंद ही प्राप्त होतो. व्यवहारामध्ये किंवा परमार्थामध्ये सफलता प्राप्तीचे महान रहस्य चिताची एकाग्रता हेच आहे. एकाग्रतेमुळेच मनुष्याला दिव्यशक्ती बरोबर दिव्यदृष्टी ही प्राप्त होते व हाती घेतलेल्या कामातील सर्व रहस्य चटकन ध्यानात येते.
कोमल हृदयाच्या माणसांनी स्वतःचे शब्द सुद्धा कोमलच वापरावे. सत्य असले तरी अप्रिय मुळीच बोलू नये. ज्या घरात कठोर कटू भाषण असते त्या घराचा लवकरच नाश होतो. ज्या घरात मृदुभाषण प्रेमळ व्यवहार असेल लहान, थोर प्रसन्न सुखी व आनंदी असतील त्या घरात लक्ष्मी नांदत नसली तरी हटकून चालून येते व तेथेच पूर्णपणे स्थिर होते. आणि घराचा दिवसेंदिवस उत्कर्ष व उद्धार होतो. ज्याला नित्य सुयश उदंड ईश्वरीय सामर्थ्य समृद्धी शांती, सुख व स्वर्ग यांची इच्छा असेल त्यांनी चालू क्षणापासून सुमधुर भाषण उत्तम भोजन सत्कार सन्मान अहर्निश प्रसन्न व संतोष राहावे. स्त्री व श्री यात मुळीच भेद करू नये. सुगंधाने जसा दुर्गंध नाहीसा होतो तसा सु स्वभावाने स्वभाव हटकून नाहीसा होतो. अतिपरिचयामुळे घरात कोणीही कोणाची अवज्ञा करू नये कुत्सित बोलू नये. क्रोध समयी मौन धारण करावे किंवा मोकळ्या हवेत फिरून यावे. मनुष्य क्रोधाने द्विपाद पशु बनतो.
अरुणा आगदीगे सुवर्णकार
ता.नायगाव, जिल्हा नांदेड
========



