एक स्मृतिगंध ‘बी.एड.च्या त्या आठवणी’
शिवाजी नामपल्ले (शिक्षक )
एक स्मृतिगंध ‘बी.एड.च्या त्या आठवणी’
मराठवाड्यातील सर्वदृष्टया संपन्न असलेल्या लोहा तालुक्यातील मुरंबी याच माझ्या गावात जि.प.च्या शाळेत चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. बी.एस्सी ला 68% मिळाले. मनात निश्चय केला, मला गुरुजी व्हायचं. सर्व विद्यापीठात फार्म भरणे सुरू झाले होते. पेमेंट सीटवर नांदेडला नंबर लागला होता. मला फार आनंद झाला होता. परंतु, पैसे जास्त लागतील असे म्हणताच, वडील म्हणाले, ‘आपल्याकडे तर एवढे पैसे नाहीत’. मी खूप रडवेला झालो. काय करावे काही कळत नव्हतं. मनाशी हूरहूर वाटत होती . आपल्या नशीबात बी.एड. नाही वाटतं. विचार चक्रात फिरत होतो. काही कालावधीतच कोल्हापूर विद्यापीठाचे पत्र आले . ते पत्र वाचून आनंदीत झालो.आपल बी.एड निश्चित होतयं. अस मला मनोमनी वाटलं.
एके दिवशी तिकडूनच लेटर आलं या तारखेला उपस्थित रहा. थोडी पैशाची जमवाजमव केली. कोल्हापूरच्या दिशेने निघत असताना आई,वडीलांचे दर्शन घेतले. शेजारी पाजा-यांच्या पाया पडलो.एका डोळ्यांत सुख होते तर, दुसऱ्या डोळ्यांत दुःख होते. माझ्यासाठी सर्व काही नवीन होते. कोल्हापूर विद्यापीठाच्या प्रांगणात आलो. चहा पाणी नाष्टा केला. बरोबर 11 वाजता बी.एड रांगेत दाखल झालो.मनात कोणते गाव मिळतयं अस वाटतं होतं . माझा नंबर आला तेथील साहेबांनी तुला कोणते गाव पाहिजे म्हणाले , काही गावाची नावे वाचून दाखवली मी बेधडक गारगोटी गाव द्या म्हणालो. मला तर काहीच तेथील माहिती नव्हते. गारगोटीला जाऊन अॕडमिशन घेतले. परत गावाकडे आलो. हं हं म्हणता काॕलेज सुरु झाले. सर्व मित्र व मैत्रीनी सगळे नवीन होते. काॕलेजच्या वसतीगृहात प्रवेश निश्चित केला .रडू येत होते . रात्री तर तोंडावर पांघरूण घेऊन हमसून -हमसून रडत होतो.तेथील भाग कोकण असल्यामुळे सारखाच पाऊस असायचा.
भल्या पहाटे जाग यायची. अंघोळीला थंडगार पाणी राहायचे ,कशी तरी अंघोळ करायची तर कधी नाही . मेस लावली होती. खास अस झणझणीत जेवण नसायचं . आचार्य जावडेकर शिक्षणशास्र महाविद्यालय गारगोटी हे काॕलेज. प्रत्येकजण अध्यापक आपआपले ज्ञान देत होते. नंतर आमचे वेगवेगळ्या विषयाचे गट केले ,त्यात सूक्ष्म पाठ कसा घ्यायचा त्याचे प्रशिक्षण देत होते. हळूहळू मित्राच्या गाठी भेटी सहवास लाभत गेला .मन रमत गेलं .हाॕस्टेल मध्ये पहिल्यांदा लातूरचा मित्र ‘सुमंत्र लोंखडे’ची ओळख झाली. काही नांदेडचे मित्र भालेराव ,मनोज डोंगळीकर ,खास मित्र मनिष परिहार ,जगदंबे , हे आपल्या जिल्ह्यातले त्यामुळे चांगली मैत्री झाली. भरपूर या कालावधीत मित्र ,मैत्रीण भेटत गेल्या. सहलीचा आनंद लुटता आला. परीक्षा जवळ आली होती. अभ्यासात रात्र दिवस मग्न होतो. चांगले पेपर सोडवले चांगल्या मार्कानी पास झालो. सन 2000 ला पास. आज सेवेची 24 वर्षे पूर्ण झाली. मी खूप समाधानी आहे. पंरतु बी.एड च्या ‘त्या’ आठवणी आजही ‘स्मृतिगंधागत’ मनात कायमचं घर करून आहे.
शिवाजी नामपल्ले (शिक्षक )
अहमदपूर जि.लातूर



