‘पाण्याची बचत हीच,काळाची खरी गरज….’; विष्णू संकपाळ
‘पाण्याची बचत हीच,काळाची खरी गरज….’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
पड रं पाण्या, पड रं पाण्या
कर पाणी पाणी
शिवार माझं लय तान्हिलं चातकावाणी…!
सुप्रसिद्ध गायक ‘प्रल्हाद शिंदे’ यांनी गायीलेले पावसाच्या विनवणीचे हे गीत हलकेच ओठावर आले. समस्त पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि फक्त एक चतुर्थांश भूभाग आहे. तरीही पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची कमी, ग्रीष्म ऋतु चालू होण्यापूर्वीच कांही ठिकाणी जाणवते. तीन चतुर्थांश भाग हा सागरी जल अर्थात खार्या पाण्याचा असल्याने पिण्यायोग्य नाही. उरलेल्या एक चतुर्थांश भागातून, डोंगर, जंगले, नापिक जमीन, मानवी वसाहती, रस्ते, कारखाने शेती वगळता त्यातून उरलेल्या भागात जलसाठे व वाहत्या नद्या उपयुक्त जलस्त्रोत आहे. प्रचंड वाढती लोकसंख्या, घटती जंगले, जमिनीची अवास्तव धूप, प्रदूषण, मानवी अतिक्रमणे इत्यादी कारणामुळे नैसर्गिक जलस्त्रोत दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
कुठे कुठे “धरण उशाला तरी कोरड घशाला” अशी दयनीय अवस्था झाली आहे आणि याचे पर्यावसान लोटाभर पाण्यासाठी तळपत्या उन्हात अंगाची लाही लाही होत असताना रानभर फिरण्यात होत आहे. ही वणवण बदलायची असल्यास आज प्रत्येकाने एक झाड लावणे नितांत गरजेचे आहे. “रेन वाॅटर हार्वेस्टिंग ” सारखे प्रयोग राबवणे आवश्यक आहे. “थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे आज पाण्याची बचत ही भावी काळाची खरी गरज आहे.
काल शुक्रवारीय हायकू स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुलदादांनी, कोरड्या विहिरीत पाण्यासाठी उतरलेल्या स्त्रीचे दिलेले चित्र. पाण्याच्या दुर्भिक्षतेचे विदारक दर्शन घडवणारे आहे यात शंका नाही. मात्र या चित्राचे सत्यशोधन केल्यास अशी माहिती मिळते की,सदर चित्रात दिसणारी “गौरी नायक” नावाची स्त्री ही कर्नाटक राज्यातील एका गावातील असून, वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी तिने रोज सहा तास प्रचंड मेहनत करून सहा महिन्यात साठ फूट खोल दोन विहिरी खोदल्या. की जेणेकरून स्वतःच्या शेतातील पिकाला पाणी देता येईल. हे चित्र एका कणखर मानसिकतेचे प्रतिक आहे. पाषाणावरही प्रहार करण्याची जिद्द जिथे आहे तिथे कोणत्याही संकटावर मात करता येते. हेच यातून दिसून येते.
जिद्द उरात
जल स्त्रोताचा शोध
प्रेरक बोध
परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणार्या या चित्रातून तशाच वेचक, वेधक हायकू रचना अपेक्षित होत्या. ज्यातून नेमका क्षण आणि प्रसंगाचे यथार्थ चित्रण व परिणामकारक कलाटणीने परिपूर्ण हायकू रचना साकारल्याची प्रचिती मिळणे आवश्यक असते. अनेक हायकूकारांनी उत्तम हायकू लिहिले आहेत. मात्र अजूनही काही जण, भरीच्या एकाक्षरी वापरातच अडकल्याचे जाणवते ते टाळणे आवश्यक आहे. आज मला परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहूल दादांचे मनःपूर्वक आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



