बदलता रंग प्रेमाचा, चिंताजनक’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
‘बदलता रंग प्रेमाचा, चिंताजनक’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
प्रेम ही एक दैवी देणगी आहे. जगात प्रेम आहे म्हणून या जगात जगण्याचे संजीवक आहे. प्रेमाला अनेक पदर आहेत. प्रेमाचे अनेक पैलू आहेत. अंतरंगातून एखाद्या विषयी वाटणारी ओढ, असोशी म्हणजेच प्रेम. प्रेम म्हणजे वात्सल्य, प्रेम म्हणजे ममता प्रेम म्हणजे ओढ, प्रेम म्हणजे त्याग, समर्पण. नवमास आपल्या गर्भात वाढवून जन्म दिलेल्या आपल्या लेकरा बद्दल मातेला वाटणारी माया म्हणजे प्रेम. प्रेमात वात्सल्य, त्याग, समर्पण असते. पती पत्नीतील प्रेम, आईवडीलांविषयी मुलांना वाटणारी आपुलकी सुध्दा प्रेमच. मग ते प्रियकर प्रेयसी असले तरी त्यांच्या तील प्रेम हे कधी हीररांझा, लैला मजनू, यांच्या रूपातून दिसते, प्रकटते. अगदी रामायणात प्रभू श्रीरामांसह
वनवासात जायला सिद्ध झालेली जानकी, ही प्रेमाचे प्रतीक आहे. तर चौदा वर्षे आपल्या पतीची म्हणजे लक्ष्मणाची वाट पहात राहिलेली उर्मिला. तिचं प्रेम… त्यागमय प्रेम हे फार उच्च कोटीत गणलं जातं.
आपले जवान रात्रंदिवस सीमेवर तैनात असतात. उन्ह पावसाची तमा न बाळगता ते केवळ मातृभूमी वरील प्रेमापोटी कार्यरत असतात. देव आणि भक्त यातील भक्तीयुक्त प्रेम. संत मीराबाईनं तर आपलं सारं जीवन प्रभु चरणी वाहिलं. त्या उत्कट प्रेमामुळं
गिरिधारीनं तिला तिच्या पतीनं दिलेल्या विषाचं अमृत केलं.
भीती मनी कशी दाटली
पाहून बदलता रंग प्रेमाचा
निर्भया हकनाक बळी गेली
पण सध्याच्या काळात स्वार्थाचा वारा या प्रेमाला लागलेला दिसतो. त्यागा
ऐवजी भोगवादाकडं माणूस
झुकला आहे.प्रेमापेक्षा पैशाला झुकतं माप देण्याकडं कल वाढला आहे. घटस्फोटाचं वाढतं प्रमाण काय दर्शवतं?तसंच एकतर्फी प्रेम, त्यातून होणाऱ्या तरुणींच्या हत्या, वासनांधपणातून किती निर्भया, कोवळ्या कळ्या कुस्करल्या जात आहेत. त्यांचे बळी जात आहेत. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण. त्यामुळं नैतिक मूल्यं ढासळत आहेत. त्यातून” लिव्ह इन रिलेशनशिप” सारखी विकृती बोकाळत आहे. विवाह संस्थांचं पावित्र्य दुर्लक्षित केलं जात आहे. आईवडिलांविषयी, वृध्दांविषयी आपुलकी वाटत नाही. वाढते वृध्दाश्रम हेच सांगत आहेत. प्रेमाचा हा बदलता रंग आत्ममग्न, स्वार्थात बुडालेल्या मानसिकतेतून आला आहे. नात्यांतील दुरावा वाढत आहे. पुन्हा एकदा विश्वबंधुत्वासाठी, विश्वाच्या प्रेमापोटी भगवंतांकडं पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचं अनुकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. हा प्रेमाचा बदलता रंग चिंताजनक आहे. आदरणीय राहुल सर नेहमीच वेगवेगळ्या विषयां वर लेखन करण्यास आपल्याला प्रोत्साहन देतात. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेचा विषय ‘प्रेमाचा बदलता रंग’ असाच वैचारिक आहे. शिलेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



