शब्द
‘शब्द’ हा मनातून येतो. शब्द हा आपल्या विचाराचा पुत्र आहे. शब्दाने आघात होतो, घात होतो, प्रेम होते,भावना अनावर होतात. राग येतो, द्वेष निर्माण होतो. सर्व काही या शब्दांमुळेच होते. म्हणून प्रत्येकाने आपला शब्द हा जपून वापरावा. ‘शब्द बोलताना आपल्या शब्दाला धार अजिबात नको’. ज्या शब्दांना धार असते ते शब्द आपण इतरांसाठी वापरले तर लोकांची मन दुखावली जातात. मन जोडायला खूप वेळ लागतो. पण मन तोडायला एक क्षण पुरेसा होतो. तर आधार असलेले शब्द आपण जीवनामध्ये वापरले पाहिजेत. आधार असलेले शब्द समोरच्याचे मन जिंकतात.
आपली वाणी गोड हवी. गोड वाणीने आपण इतरांना जिंकू शकतो. जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात ते सुद्धा आपल्याबद्दल थोडा चांगला विचार करू शकतात. हे अनुभवाचे बोल आहेत. यासाठी आपल्या शब्दात नम्रता हवी, गोडवा हवा. आपल्या मनातून येणारा प्रत्येक शब्द हा चांगला हवा. वाईट शब्दांची उत्तपी आपल्या डोक्यामध्ये नकोच नको. आपल्या मनातून गेलेला प्रत्येक चांगला शब्द इतरांची मने जिंकतातच पण, त्यांचे विचार आपल्याबद्दल निश्चितच चांगले होतात. समोरचा माणूस आपल्यावर कितीही रागावला तरी, आपण त्यांच्याबद्दलचा राग दाखवायचा नाही. जर असे केले तर निश्चितच समोरच्या माणसाचा रागाचा पारा कमी होतो.
यासाठी मनुष्याने शांत राहून कृती करावी. विचार करून बोलावे. विचारा अंती घेतलेला निर्णय आणि विचारा अंती आपल्या मुखातून निघालेला शब्द हा अंतिम असतो. मग हा शब्द कसा वापरायचा, हे सर्वस्वी प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे. “शब्दानेच शिकवले आहे माणुसकी जपायला, शब्दानेच शिकवले आहे प्रेम करायला”. शब्दानेच शिकवले आहे राग, द्वेष करायला. मानवा या जीवनात आलो आहे तर, मानवासारखे राहूया एकमेकांवर प्रेम करूया, प्रेमाची भाषा बोलूया, प्रेमाचे शब्द वापरूया, एकमेकांशी आदराने बोलूया शुभं भवतू…..!!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
===========



