काश्मीरचे शेतकरी करणार हायटेक शेती
अमृता खाकुर्डीकर जिल्हा प्रतिनिधी, पुणे

काश्मीरचे शेतकरी करणार हायटेक शेती
काश्मीर कृषी विभागाचा मातीविरहित शेती प्रकल्प कार्यान्वीत
पुण्याच्या हिंदुस्तान अॅग्री बिझनेस कंपनीचा मुख्य सहभाग
अमृता खाकुर्डीकर
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे (दि. २८) येथील हिंदुस्तान अॅग्री बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जम्मू आणि काश्मीरमध्ये कृषी विभागात अत्याधुनिक (Ultra Hi-Tech) रोपवाटिका प्रकल्प यशस्वीरीत्या ऊभारला आहे. जम्मू आणि काश्मीर अॅग्री इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लि. यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला असून नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मा. ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारीत या आत्याधुनिक रोविटिका प्रकल्पाबद्दल गौरवोद्गार काढले. हा प्रकल्प केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वोत्तम ठरेल असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
काश्मीर राज्य सरकारने आता अशाच प्रकारे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ च्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.या माध्यमातून विविध प्रकारची दर्जेदार रोपे उपलब्ध झाल्याने शेती फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित वाढेल असा विश्वास या क्षेत्रातील तज्ञांनी या संदर्भात व्यक्त केला. या अभिनव प्रकल्पाची जम्मू आणि काश्मीर कृषी विद्यापीठ तसेच कृषिमंत्री श्री जावेद अहमद दार यांनी मनःपूर्वक प्रशंसा केली.
हा प्रकल्प केवळ सहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आल्याने याक्षेत्रात हा कौतुकाचा विषय ठरला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचा विकास आराखडा, रचना आणि कार्यवाही पुण्याच्या हिंदुस्तान अॅग्री बिझनेस प्रा. लि. या कंपनीने केली असून अति उच्च तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करून काश्मीरी शेतक-यांना आत्याधुनिक शेतीकडे वळवले असल्याने पुणेकरांच्या दृष्टीनेही हा अभिमानाचा विषय आहे.
या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना हिंदुस्तान अॅग्री बिझनेसचे श्री. गणेश कुलकर्णी यांनी सांगितले की, दरवर्षी सुमारे ५० लाख उत्तम दर्जाची रोपे अगदी वाजवी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रकल्पातील हरितगृहात ‘मल्टी-वॉल पॉलीकार्बोनेट कव्हरिंगचा’ खास वापर करण्यात आला आहे. २० वर्षांहून अधिक काळ टिकणा-या या विशिष्ट कव्हरिंगमुळे अल्ट्राव्हायोलेट किरणे थेट रोपांपर्यंत आत प्रवेश करूच शकत नाहीत. याशिवाय तापमान नियंत्रणासाठी ‘थर्मल इन्सुलेशन’ ची उच्च सुविधा देण्यात आली आहे.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी संपूर्णपणे स्वयंचलित ‘हवामान नियंत्रण प्रणाली’ यात बसविण्यात आली आहे. उच्च क्षमतेचे एक्झॉस्ट फॅन्स आणि कूलिंग पॅड युक्त अशा या प्रणालीमुळे बाहेरील तापमान खात्रीशीरपणे नियंत्रित राखता येईल आणि आर्द्रता (ह्युमिडिटी) ६५ टक्क्यांपर्यंत नियंत्रित होईल.
ही सर्व प्रणाली मोबाईल अॅपद्वारे दूरस्थपणे संनियंत्रित करता येत असल्याने खूपच सोयीची असून काश्मीर व जम्मूच्या हवामानाचा विचार करून प्रकल्पाचे सर्व डिझाईन करण्यात आले आहे. स्वयंचलित बीजारोपण यंत्र तसेच स्वयंचलित ‘बूम सिंचन प्रणाली’ बसविण्यात आले असल्याने तासाला रोपांचे साधारण १००० ट्रे भरले जातात. पाणीही समप्रमाणात दिले जाते. यामुळे मजुरी खर्च कमी होतो. बियाणाची नासाडी टळते. हे पाणी देण्याचे कामही मोबाईल अॅपद्वारे केल्यामुळे शेतक-यांचे कष्ट आणि वेळ वाचणार आहे.
या हायटेक शेतीत सर्वच तंत्र दर्जेदार राखले असून स्वयंचलित ‘फर्टिगेशन’ च्या वापराने पाणी, पोषकद्रव्ये, EC आणि pH नियंत्रित ठेवून रोपांना एकाचवेळी पुरवता येतात. त्यात ‘मायक्रोन्यूट्रिएंट्स’ चा योग्य तो समावेश केला असल्याने रोपांना पुरेशा प्रमाणात पोषक द्रव्ये मिळून त्यांची वाढ सुदृढपणे होते. मुख्यतः तापमान नियंत्रणासाठी प्रकाशाच्या गरजेनुसार ‘स्वयंचलित थर्मल स्क्रीन प्रणाली’ त्वरीत कार्यान्वीत होते. तापमान वाढले किंवा तीव्र सूर्यप्रकाश असला तर शेड आपोआप बंद होते. बाहेर प्रकाश कमी असेल तरी रोपांना आवश्यक तितका प्रकाश मिळतो. हरितगृहातील जागेचा जास्ती जास्त कार्यक्षम वापर होण्यासाठी हलवता येतील अशा बेंच व्ववस्थेमुळे २० टक्के अधिकच्या जागेत रोपांची लागवड करता येते, ज्यायोगे शेतक-यांना अधिकचे उत्पादन मिळते.
आजवर २५ वर्षांच्या दीर्घ मौलीक अनुभवातून ‘हिंदुस्तान अॅग्री बिझनेस प्रा. लि. कंपनी’ने काश्मीर सारख्या भारताच्या नंदनवनात हायटेक शेतीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा प्रतीकूल स्थितीतही यशस्वीरित्या गाठला आहे. अशाच ठाम आत्मविश्वाने भारतासह परदेशातही हरितगृह प्रकल्प उभारण्यात ही कंपनी अग्रस्थानी असून विविध देशातून अशा मातीविरहीत विषमुक्त शेती प्रयोगाचे प्रकल्प ऊभारणीस मागणी वाढत आहे.



