आयुष्याचा चक्रव्यूह भेदण्यासाठी कोण मदत करणार?; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
आयुष्याचा चक्रव्यूह भेदण्यासाठी कोण मदत करणार?; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
दौलत……एक सामान्य शेतकरी. कोरोनामुळे काम धंदा नव्हता, लेकरंबाळं घरात उपाशी होते.बायको आजारी होती, शेतीमध्येही त्यावर्षी काही पिकलं नव्हतं.प्रत्येक पावलावर अडचणींचा सामना करायची जणू त्याला सवयच झाली होती. त्या काळात एका सावकाराकडून दहा हजार रुपये कर्ज घेतले व्याजासह रक्कम एवढी झाली की, त्याच्याकडे असलेला एक छोटासा जमिनीचा तुकडा कायमस्वरूपीचा गमवावा लागला. माझ्या या ग्रामीण महाराष्ट्रात दौलत सारखे कित्येक शेतकरी अशा चक्रव्यूहात अलगद अडकतात. ना कधी त्यांची सुटका होत,ना कधी त्यांची कुणी दखल घेत. कोण मदत करेल त्यांना या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी??
ती….तिची पण गत काहीशी अशीच..अल्लड वयात प्रेमात पडली, हळूहळू त्याच्या जाळ्यात अलगद फसत गेली. त्याचं मागणं वाढू लागले आणि तिलाही त्याचं आकर्षण वाटत गेले. दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्यात… तिला दिवस गेले आणि तो परांगदा झाला.. कसा भेदेल ती एवढा मोठा चक्रव्यूह?? तो….तसा तो खूप समंजस… पण काय झालं काही कळलंच नाही. सुरुवातीला आकर्षण नंतर हळूहळू सवय..एवढा गुंतला त्यात की त्याची सकाळच आता मद्याने होते.आता तर त्याला मद्यासोबत अफू, गांजाही जवळचा वाटायला लागला. व्यसनाच्या चक्रव्यूहात अडकलेलं हे अठरा एकोणवीस वर्षाचं पोर…कसा भेदेल हा जीवनरुपी चक्रव्यूह??
मला वाटतं अभिमन्यूचं तरी बरं होतं… की त्याला चक्रव्यूहात प्रवेश तरी माहीत होता..आज माझ्याभोवती असे कित्येक अभिमन्यू आहेत ते कोणत्या ना कोणत्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत तेही कायमचेच. कुणी आजारपणाच्या चक्रव्यूहात अडकले तर कुणी नीट.. जेईई च्या परीक्षेच्या..कुणी पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यात तर कुणी खोट्या प्रेमाच्या…कुणी आर्थिक संकटांच्या तर कुणी मानसिक गुलामगिरीच्या…कुणी भाऊबंदकीच्या जाळ्यात तर कुणी हक्काचा वाटा न मिळाल्याच्या…कुणी कुटील कारस्थानांच्या तर कुणी फुकट मिरवणाऱ्या स्वाभिमानाच्या…कुणी ऑनलाईन रमी सारख्या गेमच्या तर कुणी व्हाट्सअप वर येणाऱ्या खोट्या व्हिडिओ कॉल्सच्या….
सोपं नाही हे जीवन…अशी चक्रव्यूह भेदनं प्रत्येकालाच जमतं असं नाही… होतात मग अभिमन्यू…कोणी फाशी घेतो,कुणी विष पितो कुणी पाण्यात उडी घेतो तर कुणी रेल्वे खाली जीव देतो.. सृजनहो…. आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “चक्रव्यूह” हा विषय दिला.नेहमीप्रमाणे सर्व कवी कवयित्रींनी विषयाचा चक्रव्यूह अचूकपणे भेदण्याचा प्रयत्न केला यात बहुतांशी यशस्वी ही झालेत. सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील साहित्यप्रवासास अनंत कोटी शुभेच्छा.
जाता जाता एक सांगू इच्छिते मराठीचे शिलेदार समूह म्हणजे माय मराठीच्या संवर्धनार्थ निस्वार्थपणे काम करणारं एक संघटन..पूर्ण आठवडा विविध स्पर्धांच्या मागे नवकवी कवयित्रींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व त्यांचा उत्साह वाढवणे हाच हेतू असतो. तरी असता पुष्कळदा कवी कवयित्री लहान लहान सूचनांकडे दुर्लक्ष करून सन्मानपत्राकडे पाठ फिरवतात. पुष्कळदा आपण फोटो न पाठवल्यामुळे आम्हास नैराश्यही येते. तेव्हा हीच विनंती की कृपया एक आदर्श वाचक बनून खरे भाषाप्रेमी असल्याचा अभिमान बाळगा.धन्यवाद.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



