मौनाची भाषा बोलणारी ‘पापणी’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
मौनाची भाषा बोलणारी ‘पापणी’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
प्राण्यांच्या व माणसांच्या चेहऱ्यावरील डोळ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व डोळा झाकण्याची क्षमता असलेल्या त्वचेच्या थराला पापणी असे म्हणतात. पापण्या आपल्या डोळ्यांचं धूर, कचरा, तीव्र सूर्यप्रकाश यापासून रक्षण करतात त्याचप्रमाणं सौंदर्य खुलवतात. पापणी मौनातून बोलते असं बोललं तर वावगं ठरू नये. आपल्या आयुष्यात, नात्यांमध्ये आणि भावना व्यक्त करताना पापणीचं मौन खूप काही सांगून जातं. हे मौन सूचक, अर्थवाही आणि मनाला भिडणारं भाष्य असतं. आपण अनेक वेळा अनुभवतो – कुणी प्रेमानं पाहिलं की, पापण्या थरथरतात…प्रिय व्यक्तीला पाहिलं कि त्या खाली झुकतात.आवडत्या व्यक्तीला निरोप देताना पापणकाठ तुडुंब भरतात. मनातील भावना त्या सहजी बोलतात, मौनाच्या भाषेतच.
पापणी जेव्हा काही सांगते, तेव्हा ती व्यक्तीच्या अंतःकरणातलं खरं चित्र दाखवते. हसताना डोळे ओलावले, तर पापणी एक प्रकारचा संयम राखते; दुःखात डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, तर पापणी त्यांना थोपवते, झाकते. तिचं हे काम म्हणजे जणू भावनांना रोखताना एक पडदा ओढणं. आईचं मुलाला पाहणं, एखाद्या प्रेयसीचं लाजून डोळे झाकणं, वडिलांचा न बोलता डोळ्यानी दिलेला आधार… या सगळ्यात पापणीचं मौन हे बोलकं असतं.पापणी आपल्या अंतर्मनाशीही संवाद साधते.जेव्हा आपण एकटे असतो, आठवणींच्या लड्या उलगडत असतो, तेव्हा नकळत डोळे मिटतात, पापण्या ओलसर होतात… आणि त्या बंद डोळ्यांतून आपल्याच भावनां ल्यायलेले अश्रू वाहतात.
जीवन हे सुखदुःखानं भरलेलं आहे. एखादी आई किंवा पत्नी सीमेवर निघालेल्या पतीला, मुलाला आनंदानं निरोप देते. चेहरा प्रयासानं हसरा ठेवताना डोळ्यांचे डोह पापण्याआड अश्रूंनी तुडुंब भरलेले असतात. वृध्दाश्रमात भेट दिली, तर वयोवृध्दांचा निरोप घेताना पापणकाठ ओलावतात. हा अनुभव मी खूपदा घेतला आहे. लेकीच्या लग्नात निरोपाच्या क्षणी पित्याचे डोळे पाझरतात. इतका वेळ साथ दिलेल्या पापण्याना न जुमानता अश्रू वाहतातच.
एकंदरीत आपल्या डोळ्याबरोबर पापण्या असतातच प्रत्येक क्षणाच्या साक्षीदार. पापण्या आणि भावना यांचं नातं अतिशय सूक्ष्म, तरी खोल आहे. जणू डोळ्यांची कवाडं उघडली की आपण जग पाहतो, पण तीच कवाडं मिटली की अंतर्जगत अनुभवतो. पापण्या मिटल्या कि आपण अंतर्मनाशी संवाद साधतो, शांती अनुभवतो. पापणी आपल्या आनंद, दु:ख, विरह, शोक, दुरावा या भावभावना मौनातून उलगडते. आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी राहुल सरांनी दिलेला विषय वैचारिक आहे. शिलेदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



