अलिबाग “कालचे”, “आजचे” व “उद्याचे”
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग “कालचे”, “आजचे” व “उद्याचे”
लेखक – बळवंत वालेकर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग शहर रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असून ते निसर्ग रमणीय ठिकाण आहे. पश्चिम किनारपट्टीचे अधिराजे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण आहे. या शहराचे पुराणकालीन नाव श्रीबाग आहे .
पूर्वी अल्ली” नामक मुसलमानाच्या येथे नारळी – पोफळीच्या बागा होत्या म्हणून या शहराचे -अल्लीची बाग -अलिबाग हे नाव रूढ झाले . हे शहर इ. स. १६९८मध्ये कान्होजी राजांनी वसविले. तत्पूर्वी ते हिराकोट तलावाच्या – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उत्तरेस रामनाथ येथे होते.सुप्रसिद्ध आंग्रेवाडा आंग्रे समाधी , घोड्यांची पाग ,आंग्रेकालीन कोषागार (विद्यमान जिल्हा तुरुंग), छत्रीबाग या ऐतिहासिक वास्तु येथे आहेत.
अंतर्गत बंडाळीमुळे सरखेलांचे राज्य खिळखिळे झाले. या चा फायदा ब्रिटिशांनी उचलला. इ. स. १८३९ मध्ये कुलाबा संस्थान खालसा करून तेथे ब्रिटिश एजन्सीचा कारभार चालू केला. अलिबाग हे ब्रिटिश एजन्सीचे मुख्यालय झाल्यानंतर तेथे अनेक इमारती बांधून शहराचा चेहरा -मोहरा बदलला. आणि सन १८४० मध्ये ब्रिटिशांनी “अलिबाग” हे तालुका मुख्यालय जाहीर केले. रत्नागिरी व ठाणे (अविभक्त) हे जिल्हे विस्ताराने मोठे असल्यामुळे प्रशासकीयद्रुष्ट्या अडचणीचे होते. म्हणून ठाणे जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग व रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग एकत्रित करुन नवीन जिल्हा तयार केला. या नूतन जिल्ह्यात सरखेल कान्होजी राजांची राजधानी
“कुलाबा किल्ला ” असल्यामुळे ब्रिटिश सरकारने या जिल्ह्यास कुलाबा जिल्हा असे नाव देऊन मुख्यलय अलिबाग येथे थाटले.
स्वच्छ व विस्तृत सागरकिनारा शिवाय मुंबई जलमार्गे २५ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे ब्रिटिशांना हे ठिकाण फारच भावले. आणि १८६९ साली (नूतन) कुलाबा जिल्ह्याची व अलिबाग या मुख्यालयाची अधिकृत घोषणा केली गेली. आणि जिल्हाधिकारी म्हणून अल्फ्रेड डिसुझा यांची नियुक्ती झाली. त्यानंतर पनवेल , उरण , कर्जत , खालापूर , सुधागड , मुरुड , श्रीवर्धन , म्हसळा हे तालुके टप्प्या टप्प्याने नूतन जिल्ह्यास जोडले गेले . त्यामुळे जिल्ह्याचा महसूल वाढला व दर्जाही सुधारला. अलिबाग हे जिल्हा मुख्यालय गैरसोईचे आहे या सबबीखाली अन्य तालुक्यांतून प्रखर विरोध झाला.पण ब्रिटिश शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. हा विरोध स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही चालू होता. अनेक घडामोडी झाल्या आणि दि. एक जानेवारी १९८० रोजी जिल्ह्याचे नामकरण रायगड केले पण मुख्यालय अलिबाग हेच राहिले.
मुंबईचे उपनगर अलिबाग बनणार?
अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे .R.C. F. च्या राष्ट्रीय खत प्रकल्पामुळे त्याचे महत्त्व वाढले. वडखळ ते थळ ( अलिबाग) रेल्वे मार्ग दृष्टीपथात आहे . आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे ते जगाच्या नकाशावर आले. गेट वे आॕफ इंडिया – मांडवा कॕटामारन सुविधेमुळे मुंबईशी जवळीकता वाढली .रेवस -करंजा पुलाचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे अलिबाग हे मुंबईचे (तिसरी / चौथी)उपनगर बनण्याची शक्यता वाढली आहे . म्हणूनच उद्योगपती / भांडवलदार यांचा मोर्चा अलिबागकडे वळला आहे.
या परिसरात इमारतींचे बांधकाम शीघ्रगतीने सुरू आहे खरेदी – विक्रीचे व्यवहार जोरात आहेत . . परिणामे जमिनीच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत . अकुशल कामगारही दैनिक १००० ते १५० ० रुपये कमावतो . म्हणून भविष्यकाळात अलिबागची वाढ वर्णनातीत आहे .पण भूमिपुत्र कोठे असेल हा चिंतनीय विषय ठरेल .



