घरजावई; संगिता रामटेके/भोवते
संगिता रामटेके/भोवते
घरजावई; संगिता रामटेके/भोवते
‘लग्न’ शब्द जरी अडीच अक्षरांचा असला तरी, तो दोन जीवांना आयुष्यभरासाठी घट्ट बांधून ठेवणारा पवित्र धागा आहे. लग्नानंतर सगळ्यात जास्त परिवर्तन घडून येतो तो मुलींच्या आयुष्यात. तिच्याच का? असे म्हटले तर उत्तर एकच मिळते. ते म्हणजे पुरूष प्रधान भारतीय संस्कृती.
“आलिया दारात अजब वरात………” असे फक्त गाणी आणि चित्रपटात घडू शकते. कारण भारतीय संस्कृतीत “जा लाडके, दिल्या घरी तू सुखी रहा” हेच ब्रिद आहे म्हणजे मुलगीच मुलाच्या घरी सून म्हणून जाणार..यापेक्षा थोडं जरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न केला तर समाजात त्यांना वेगळे ठरवले जाते.
हो, हे खरंय. जर एखाद्या मुलाने घरजावई बनून सासरी राहण्याचा निर्णय घेतला तर त्याला “संपत्तीची हाव होती म्हणून घरजावई आला.” किंवा स्वतः घ्या घरात कष्ट करावे लागले असते सासरी तर फुकटात होईल असे आपल्याकडे सर्रास म्हटले जाते नाही तर कशाला घरजावई आला असता.?” मग येणाऱ्या जावयाचा हेतू एकट्या सासू सासऱ्यांना मूल्यं नाहीत मग त्यांना म्हातारपणात एकटं पाडण्यापेक्षा त्यांना सांभाळणं असा उदात्त असू शकतो हे कधी ग्राह्य धरत नाही आणि जरी असा विचार केला तरी संपत्ती मिळणारचं हे जोडलं जातंच म्हणजे घरजावई जाणारांना (जे खूप कमी प्रमाणात घडते)आपली मानसिकता लोकांच्या टिका टिपण्णीसाठी पक्की करावी लागत असेल.
एवढं जरी वाईट असलं तरी, घरजावयांना सुनांपेक्षा जास्त मानपान मिळतो. देखल्या देवाला दंडवत म्हणून का होईना पण होतो. जावयांकडून घरकामाची पण अपेक्षा नसते जशी सुनेकडून ठेवली जाते आणि मुलगी पण आईवडिलांची मन लावून सेवा करते आणि माहेर म्हणून ती आनंदात चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जाते. तेच जर ती सासरी असती तर कदाचित कठीण प्रसंगाचा बाऊ केला असता. घरजावई सुध्दा सुखी असतो असे नसते. त्यालाही कधी कधी मानसिक कुचंबना सहन करावी लागते. जसं सासरी असतांना आईवडिलांसाठी मुलींचा जीव तुटतो तसंच त्याचा पण मन हळवं होत असेल पण पुरूष हृदय कधी बायकोसमोर आपलं रडगाणं गाणार नाही. त्याचवेळी सासरी असलेली मुलगी हट्ट करून रूसून फुगून नाही का माहेरी जात. आणखी एक बाजू म्हणजे मुलगी सासरी असेल तर तिच्या माहेरकडील मंडळी आली की रात्रभर तरी मुक्काम करू शकतात कारण ते तिचे हक्काचे घर आहे हे ते जाणून असतात पण आपण त्याठिकाणी जर घरजावई असणाऱ्या मुलाकडे भेटायला गेलो तर आपल्याला ते घर त्याच्या हक्काचे वाटत नसल्यामुळे आपण मुक्कामाचे सहसा टाळतो.
अशावेळेस मुलाला कुठेतरी वाईट वाटत असेल. सासरी असलेली सून चांगली वागली तर ठीक नाहीतर वर्तमानात पटत नाही तर किती दिवस सहन करायचे म्हणून सरळ वेगळा संसार थाटतात तसं बोटावर मोजता येणारे घरजावई करतांना दिसत नाही.तरीही घरजावयांना समाज जे दोषारोपण करतो ते कुठेतरी चुकीचे वाटते. आता मी एकाच बाजूने बोलते असं वाचक म्हणू शकतात.सगळेच घरजावई चांगले आणि सगळ्याच सुना वाईट असे मी म्हणत नाही कारण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून वेळपरत्वे कोण कधी बदलेल हे सांगता येत नाही.तरीसुध्दा भारतातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हम दो हमारे दो या नियमानुसार खूप पालक असे आहेत ज्यांना दोन्ही मुलीच आहेत मग अशा वेळेस जावयाला मुलगा बनून राहणे आवश्यक असेल तर समाजाने सुध्दा त्याची बाजू जाणावी. मग तो त्याची कर्तव्य किती निभावतो हे त्याच्या समजदारी आणि जबाबदारी यांवर निर्भर आहे.
संगिता रामटेके/भोवते
साकोली, जि.भंडारा
=========



