टंब्र्याल; पहिलं वहिलं ग्रामीण सोशल ऍप
संपादक टीम

टंब्र्याल
पहिलं वहिलं ग्रामीण सोशल ऍप.
टंब्र्याल, टमरेल, टंब्रेल.. उच्चार कसाही करा पण ही वस्तू आहे एकच ! ज्या काळी घरोघरी शौचालयं नव्हती, तेव्हा घराच्या बाहेर एका खिळ्याला अडकवलेली 3-4 डबडी दिसायची त्यांना ‘टंब्र्याल’ असं म्हणायचे. शेतात वापरलेल्या ग्लायसिलची बाटली वरून कापली आणि दोन्ही बाजूंनी छिद्र पाडून तार गुंफली की, तयार झालं टंब्र्याल. अशी तयार केलेली टंब्र्यालं गावाकडील सगळ्यात ‘फेमस’ टंब्र्यालं असायची. किफायतशीर आणि टिकाऊ ग्रामीण महाराष्ट्रात आधीच्या काळात वापरलं जाणारं एक सोशल टूल म्हणजे टंब्र्याल.. होय सोशल टूलच.
जेव्हा या ग्रामीण जगात व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक नव्हतं, तेव्हा होतं फक्त आणि फक्त टंब्र्याल. गावाबाहेर शौचासाठी एक जागा ठरलेली असायची त्याला पानदी पांद , किवा माळ म्हटलं जायचं. इथेच भरायचा गावातल्या सगळ्या ‘टंब्र्यालांचा’ मेळा. सगळे गावकरी सकाळ-संध्याकाळ, पोटाला वाटेल तेव्हा एका हातात पाण्याने भरलेले टंब्र्याल आणि दुसऱ्या हातात मिसरी घेऊन तर, कोणी गायछाप मळत पांदीकडे पळायची. येता जाता रामराम झाडले जायचे आणि ‘बसल्यावर’ गावातील राजकारण, गावातील लफडी अशा गहन प्रश्नांवर चर्चा केली जायची. तिथे व्हाट्सअप सारखे च्याटींग वगैरे असायचे. फेसबुकसारख्या नोटिफिकेशन मिळायच्या आणि पोस्ट शेअर आणि लाईक्स च्या ऐवजी हास्य आणि शिव्या. लोकांची नाती जुळायची, मैत्री होऊन ती घट्ट व्हायची ती या टंब्र्यालामुळेच!
जिगरी दोस्तांच्या येण्याजान्याच्या वेळा ठरलेल्या असायच्या. सामोरासमोर बसून बोलणं व्हायचं… अगदी आजच्या व्हिडिओ कॉलिंग सारखं. “इथून मी थेट पांदीकडे चालली” अशा डायलॉगखाली कित्येक प्रेमकथा गावात चालू झाल्या त्या या टंब्र्यालामुळेच. गावकऱ्यांच्या अंगात असणारा कलाकार बाहेर काढला तो याच टंब्र्यालानेच. ‘माझं टंब्र्याल चांगलं की तुझं’ अशी अव्यक्त स्पर्धा लागलेली असायची. “त्या काश्याचं टंब्र्याल बघितलं का? काय झ्याक हाय सांगू” अश्या कॉम्प्लिमेंट्स कानी पडायच्या. ‘पाणी वाचवा’ योजनेला मोलाचा हात लागला तो याच सुंदर डबड्यामुळे.
टंब्र्याल वापरलं की प्रतिव्यक्ती एक लिटरपेक्षाही कमी पाणी लागायचं. दुष्काळी भागात पाणी वाचवलं ते याच कल्पकतेने. शौचालय निधीतले गैरव्यवहार रोखले गेले ते फक्त आणि फक्त या टंब्र्यालाच्या वापरामुळेच. नंतर सरकारने ‘हागणदारी मुक्त’ गावाची योजना आणली आणि टंब्रेल संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला. गावातल्या लोकांच्या हातात फेसबुक आलं आणि टंब्र्यालाला उतरती कळा लागली. त्या चर्चा, त्या प्रेमकथा इतिहासजमा झाल्या. आजही गावाकडे काही लोक आहेत, ज्यांना चार भिंतींमध्ये बसण्याचा कंटाळा असतो. त्यांच्या हाती टंब्र्याल पाहिलं की डोळ्यांत चमक येते. अभिमान वाटतो ही ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या शिलेदारांचा! जय_टंब्र्याल.
संकलन
संपादक टीम
‘साप्ताहिक साहित्यगंध’
=========



