“रंग लावू चला.. माणुसकीचा”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“रंग लावू चला.. माणुसकीचा”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“मोहक रंग निसर्गाचा
नसे दुसरा तोडीचा,
किती विविधता,किती प्रकार
अन् दरवळ तो मातीचा”
कोणीतरी विचारले पाणी तेरा रंग कैसा? किती समर्पक उत्तर.. जिसमें मिलाओगे वैसा! आहे त्या परिस्थितीत, स्थितीत स्वतःला पूर्णपणे उतरवता येणे म्हणजे खऱ्या जीवनाच्या रंगात रंगता येणेच नाही का? किती जणांना जमत हे? हा गंभीर प्रश्न आहे. जीवनाचा रंग जर आनंदाने भरला तर प्रत्येक सण उत्सव विविध रंगांची उधळण करत प्रेमाचा, स्वप्नांचा वर्षाव करत आपल्या जीवनात प्रवेश करतात. त्यातीलच एक रंग होळी ,धुलीवंदन रंगपंचमीचा. चैत्र कृष्ण पंचमीला साजरा होणारा हा भारतीय सणांपैकी प्रमुख सण.
रंगपंचमीचा होलिका दहनानंतर पाचव्या दिवशी सण येतो आणि होळीचा सांगता समारंभ होतो. हा सण म्हणजे वसंत ऋतुच्या आगमनाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. फुललेला पळस, नव-पालवीने भरलेली वृक्षवेली, मकरंद चाकणाऱ्या भवऱ्यांची गुंजारव ,फुलांचा मंद वेड लावणारा दरवळ, कोकिळेचे मधुर स्वर आणि हा बहरणारा वसंत. मन कसे प्रफुल्लित होते. मनोरंजनासाठी तुम्ही काहीही करा पण निसर्गाच्या सानिध्यातील प्रसन्नता कुठेही अनुभवायला मिळणार नाही.
रंगपंचमी ही पंचतत्वांना( पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ) संतुलित करण्याचा सण आहे. या दिवशी रंग उडवल्यामुळे वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते. हा सण भगवान कृष्ण व राधा यांच्या दिव्य प्रेमाशी व त्यांच्या लीलांशी संबंधित आहे. तामसी व राजसी प्रवृत्तींवर विजय मिळवून सात्विकतेचे प्रतिक म्हणजे रंगपंचमी. होळीमध्ये विविध रंगांचा वापर होत असला तरी रंगपंचमीला प्रामुख्याने गुलाल वापरून रंग खेळला जातो. या दिवशी रंगीत पाणी अंगावर टाकण्याची प्रथा आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात मध्ये हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. जुने मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून नाते दृढ करण्याचे हा सण म्हणजे एक माध्यम होय. या सणाला ऐतिहासिक परंपरा आहे. मराठा आणि पेशवा काळात हा सण शाही सण म्हणून साजरा करत. थोडक्यात सांगायचे तर रंगपंचमी हा जीवनात रंगाचा आनंद, उत्साह आणि आध्यात्मिक सकारात्मकता आणणारा सण आहे. असे जरी असले तरी आज या सणाचे बिभित्स स्वरूप पाहायला मिळते ,ही खेदाचीच बाब. सात्विकते ऐवजी क्रुरता बळवताना दिसते. धुलीवंदनासाठी कित्येक निष्पाप प्राण्यांचा आज बळी घेतला जातोय. दारू पिऊन धिंगाणा ,नालीत बरबटवणे ..शी!
असो, भारताच्या सुंदर, सुसंस्कृत परंपरांची नक्की जपणूक व्हावी हीच भारतीयांकडून अपेक्षा. आज समूहात आमचे बालमनाचे शिलेदार खूप रंगात रंगले आणि खूप छान छान संदेशही त्यांनी दिले. नैसर्गिक कोरड्या रंगांचा वापर करा, पानाफुलांपासून रंग बनवून प्रदूषण टाळा ,पाण्याचा अपव्यय टाळा. समतेचा , समानतेचा , मैत्रीचा, आपुलकीचा, देशभक्तीचा, राधा कृष्णाच्या प्रीतीचा, प्रेमाचा घास भरवण्याचा अशी कित्येक मनाला भावणारे रंग आज समूहात एकमेकांनी लावले. राहुलदादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण. चला तर मग जाऊया रंग खेळायला…माणुसकीचा..! धन्यवाद!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/लेखिका/ कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



