“हस्तकलेचा जादूई स्पर्श, देई अचेतनास चैतन्यदायी हर्ष”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू' काव्यस्पर्धेचे काव्य परीक्षण

“हस्तकलेचा जादूई स्पर्श, देई अचेतनास चैतन्यदायी हर्ष”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू’ काव्यस्पर्धेचे काव्य परीक्षण
“ये दोस्ती हम नही तोडेंगे,
तोडेंगे दम मगर. तेरा साथ ना छोडेंगे..”
१९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ या अजरामर चित्रपटातील ‘वीरू जय’ची जोडी म्हणजे दोस्ती च्या दुनियेतील अमर कहाणी. वरील गिताच्या ओळी आजही सहज ओठावर येतात. जवळपास पन्नास वर्षे पसंतीच्या उच्च शिखरावर विराजमान आणि रसिकांच्या मनावर गारूड केलेली एक अजरामर कलाकृती म्हणजे शोले..!! या चित्रपटातील प्रत्येक पात्र, त्याच्या संवादासह सिनेरसिकांच्या काळजावर अवीट छाप सोडून गेले. मग तो सांबा असो, बसंती असो, गब्बर असो, ठाकूर असो की वीरू जय. यातील प्रत्येक फ्रेमची हस्तचित्रे आजवर इतकी रेखाटली गेली असतील की त्याची गिणती करणे अशक्य. कलेच्या प्रत्येक प्रांतातील कलाकाराला आजही भूरळ घालणारा शोले म्हणूनच रूपेरी पडद्यावरील एक दंतकथाच ठरली.
‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र पाहता वरील संदर्भ देण्याचा मोह टाळता आला नाही. मात्र याच चित्राकडे अजून वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्याचे विविध पैलू लक्षात येतात. ज्या वृक्षाची पाने ते फळे यातील एकही अवयव वाया जात नाही, कुठे ना कुठे वापरात येतो असा वृक्ष म्हणजे नारळ. म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हंटले जात असावे. आज सर्वाधिक शुद्ध नैसर्गिक काय असेल तर ते म्हणजे नारळपाणी. नारळाच्या भल्या मोठ्या झावळ्या, नारळावरील शेंडी, कवटी, यांचे वैविध्यपूर्ण कलाकुसरीत अनन्यसाधारण महत्व आहे. ओले खोबरे म्हणजे सुगरण आणि सैपाकघराची पहिली पसंती. सुक्या खोबऱ्याचे तेल प्रत्येक घरात अग्रस्थानी. आयुर्वेद शास्त्रात विशेष उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण.
नारळ हे, समुद्र किनारे, वालुकामय जमिनीत येणारे प्रमुख वृक्ष पिक आहे. आकाशाच्या पोटात घुसणारी एकफांदी उंचच उंच झाडे, आणि त्यावर माकडासारखे सरसर चढणारे स्थानिक व्यक्ती हे विशेष कौतुकास्पद. ही कला प्रत्येकाला शक्य नसते. काही विशेष प्रशिक्षित लोकच नारळ सुरक्षितपणे काढू शकतात. आणि हे प्रशिक्षण पारंपारिक पद्धतीने प्राप्त केलेले असते.
आजच्या चित्राचा दुसरा पैलू म्हणजे अमिताभ धर्मेंद्र यांची जोडी मोटरसायकलवर बसलेली दिसते. आणि ही प्रतिकृती नारळाच्या झावळ्यापासून बनवलेली आहे. इतर कोणतीही वस्तू यामध्ये समाविष्ट नाही हे विशेष. कोकण केरळ भागात गेल्यास याच भल्या मोठ्या नारळाच्या झावळ्या गोरगरीबांच्या घरावरचे छप्पर होतात. तर त्याच्या पानांना विशिष्ठ पद्धतीने एकमेकात गुंफुन त्याच्या भिंती, बनवल्या जातात. आणि याच पानापासून त्याच्या काड्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू, खैळणी, गाड्या, पिशव्या, टोप्या, टोपल्या ते व्यक्तींच्या प्रतिकृती सुद्धा बनवल्या जातात.
सृष्टीने नारळ नावाचा कल्पवृक्ष बनवला आणि त्यांच्या प्रत्येक अवयवांना चिरंतन अमरत्व देण्याची कला कांही विशेष मानवांना बहाल केली. ज्या कलेवर ते कलाकार आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. निसर्गाची हीच साखळी किती विधायक तितकीच अचंबित करणारी आहे पहा. म्हणून तर कला एक साधना असते. उपजिविकेचे साधन होते. जनमानस पूजक बनते, हे नैसर्गिक सृजनाचे दान विशेष व्यक्तींच्याच पदरात पडते.
आजचे हायकू लेखन याच संदर्भाने अपेक्षित होते. कल्पना, कलात्मकता आणि संदेश याचा योग्य समन्वय साधत चित्र सारांश हायकू लेखनात अंतर्भूत होणे आवश्यक असते. अनेकांनी उत्तम लेखन केले आहे. आ. राहुल दादांनी पुन्हा एक अप्रतिम विषय देऊन प्रतिभेला आवाहन केले. अनेकांनी त्याचे चीज केले. सर्वांना भावी लेखनास शुभेच्छा..!
विष्णू संकपाळ बजाजनगर
जिल्हा छ. संभाजीनगर
©सहप्रशासक परिक्षक मराठीचे शिलेदार समूह



