“पत्रकाराने प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहिले पाहिजे”; संघपाल गडलिंग
गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी नागपूर
“पत्रकाराने प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहिले पाहिजे”; संघपाल गडलिंग
कुही तालुक्यातील शेतमजूर नेते राजानंदजी कावळे यांच्याशी चर्चा
गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर : (दि १०) ‘पत्रकारितेचे मूलभूत तत्त्व म्हणजे सत्याचा शोध घेणे असून त्यासाठी पत्रकाराने प्रत्येक घडामोडीकडे संशयाच्या नजरेतून पाहिले पाहिजे’, असे मत राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘संघपाल गडलिंग’ यांनी व्यक्त केले.
आजच्या माहितीच्या वेगवान युगात अनेकदा अपूर्ण, अप्रमाणित किंवा दिशाभूल करणारी माहिती समाजात वेगाने पसरत असते. त्यामुळे कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची सखोल पडताळणी करणे, विविध स्रोतांकडून खात्री करून घेणे आणि तथ्यांच्या आधारेच बातमी मांडणे ही पत्रकाराची सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, समाजापर्यंत अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह माहिती पोहोचवणे ही पत्रकारितेची खरी ताकद आहे. पत्रकाराने कोणत्याही दबावाला न जुमानता धैर्याने आणि प्रामाणिकपणे काम केले तरच समाजातील वास्तव परिस्थिती लोकांसमोर येऊ शकते. पत्रकारांनी केवळ माहिती देण्याचे काम न करता समाजातील प्रश्न, अन्याय आणि विसंगती यांवर प्रकाश टाकत लोकशाही अधिक मजबूत करण्याची भूमिका बजावली पाहिजे. त्यामुळे पत्रकारांनी तथ्यांची खात्री करूनच बातमी मांडावी आणि समाजहिताला प्राधान्य देत जबाबदारीने पत्रकारिता करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
हे विचार त्यांनी कुही तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर नेते राजानंदजी कावळे यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केले. यावेळी बोलताना कावळे म्हणाले की, सरकारी धोरणे आणि पत्रकारिता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शासनाने आखलेल्या धोरणांचा परिणाम समाजावर होत असतो आणि त्या धोरणांचे योग्य-अयोग्य पैलू जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. चुकीच्या किंवा जनविरोधी धोरणांविरुद्ध पत्रकारांनी सखोल अभ्यास करून निर्भीडपणे प्रहार करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे.
कावळे पुढे म्हणाले की, पत्रकारितेची ताकद ही समाजातील दुर्लक्षित प्रश्न पुढे आणण्यात आहे. पत्रकारांनी निष्पक्षपणे, अभ्यासपूर्ण आणि जनहिताच्या दृष्टीने काम केले तरच पत्रकारितेची मूल्ये जपली जातील आणि लोकशाही अधिक सक्षम होईल. अशा प्रकारे पत्रकार आणि समाजातील विविध घटक यांच्यातील संवादातूनच समाजहिताच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.



