तुझं असणं’ म्हणजे मनाच्या गाभाऱ्यातून उमटणारा एक निनाद आहे; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न स्पर्धे'चे काव्यपरीक्षण

तुझं असणं’ म्हणजे मनाच्या गाभाऱ्यातून उमटणारा एक निनाद आहे; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न स्पर्धे’चे काव्यपरीक्षण
तू…..होय,तूच… घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच तुझी ती शांत ऊब मनाला स्पर्श करते. ती कोणाच्या वस्तूंनी नाही तर , तुझ्या अस्तित्वाने निर्माण झालेली असते. तुझं घरात असणं म्हणजे जणू मंद वाऱ्यासारखं न दिसणारं, पण सतत जाणवत राहणारं..तू असते तेव्हा घर फक्त जागा राहत नाही, तर ते एक जिवंत विश्व बनतं. तुझ्या हास्यातून घरात आनंद उगवतो तर तुझ्या काळजीतून सुरक्षितता फुलते. ‘आणि..तुझ्या त्यागातून प्रत्येक नातं अधिक घट्ट होतं’. तू स्वतःला विसरून सगळ्यांसाठी जगते हाच तुझा खरा चमत्कार असतो.
म्हणूनच, तुझ्या अस्तित्वाची कदर करणे म्हणजे त्या घराच्या आत्म्याची कदर करणे होय. कारण तू आहे म्हणूनच घराला घरपण आहे..आणि तुझ्याशिवाय ते फक्त चार भिंतींचं एक रिकामं अस्तित्व उरतं..’तुझं असणं’ हा केवळ शब्दांचा अलंकार नाही तर तो मनाच्या गाभाऱ्यातून उमटणारा एक निनाद आहे…!! जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे तुझं असणं स्वतःच एक भाषा बनतं, निःशब्द. पण अत्यंत बोलकी.तुझं असणं म्हणजे शब्दांच्या काठावर विसावलेली एक शांत लाट. जिचा स्पर्श झाला की, मनातल्या गोंधळलेल्या वाळवंटात अचानक ओलाव्याची चाहूल लागते..तुझं असणं म्हणजे अंधाराच्या कुशीत अलगद उजळणारा चंद्रकिरण..न भडक, न दिखाऊ, पण तरीही सगळ्या काळोखाला अर्थ देणारा.कधी कधी वाटतं, तुझं असणं हे केवळ उपस्थिती नसून एक अनुभव आहे, जसा पहाटेच्या दवबिंदूवर थांबलेला सूर्यकिरण, क्षणभंगुर असला तरीही अनंत सौंदर्याची साक्ष देणारा.
तू असतेस तेव्हा वेळ जणू हळूच थांबून पाहत राहते, आणि तू नसतेस तेव्हा क्षणही शतकासारखे भासतात. तुझ्या असण्यात एक अदृश्य कवितेची लय आहे. शब्द नसले तरी अर्थ आहेत, आवाज नसला तरी संवाद आहे. तुझ्या शांततेतही एक सखोल गाणं दडलेलं आहे जे ऐकण्यासाठी कान नव्हे, तर मन लागावं लागतं. तुझं असणं म्हणजे नजरेतून व्यक्त होणारी प्रार्थना, आणि स्पर्शाविना जाणवणारी ऊब.जीवनाच्या या गर्द वाटेवर अनेक चेहरे भेटतात, अनेक नाती जुळतात पण काहींचं असणं असं असतं की ते नात्यांच्या परिभाषेपलीकडे जातं. तुझं असणं तसंच आहे. नात्यांच्या चौकटीत न मावणारं, पण तरीही प्रत्येक चौकटीला अर्थ देणारं.कधी तू वाऱ्यासारखी असतेस न दिसणारी, पण प्रत्येक पानाला हलवून जाणवणारी. आणि कधी तू आकाशासारखी अपरिमित, असीम, ज्यात हरवूनही माणूस स्वतःलाच सापडतो.
तुझं असणं म्हणजे एक निःशब्द आधार ज्यावर शब्दांची गरजच भासत नाही. एक अशी खात्री, जी सांगते की, काहीही झालं तरी ‘कोणीतरी आहे’ फक्त असण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि न सांगताही जाणून घेण्यासाठी. शेवटी, तुझं असणं हे एखाद्या उत्तरासारखं नाही…तर ते एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधत राहण्यातच कदाचित आयुष्याचं खऱ्या अर्थाने सौंदर्य दडलं आहे. आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘तुझं असणं’ हा विषय दिला. खरंतर विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. तरीही सर्व कवी, कवयित्रींनी विषयाला योग्य न्यात देत सुंदररित्या चौकटीत बसवला, तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन..
पण थोडे काही….!! कविता ही केवळ शब्दांची साखळी नसून, ती भावनांच्या अथांग सागरातून उसळणारी लहर आहे, ती मनाच्या सूक्ष्म स्पंदनांना शब्दरूप देणारी एक दिव्य कलाकृती आहे. म्हणूनच, ‘कवितेची व्याप्ती ही ओळींच्या मर्यादित चौकटीत बंदिस्त नसून, ती वाचकाच्या अंतःकरणाच्या असीम आकाशात मुक्तपणे विहरणारी असावी’. कविता ही केवळ वाचली जाणारी नसून, ती अनुभवली जाणारी, जगली जाणारी असावी. तिची व्याप्ती ही शब्दांच्या पलीकडे जाऊन, आत्म्याशी संवाद साधणारी असावी. जिथे विचारांची सीमा संपते, तिथून कवितेचे खरे विश्व प्रारंभ होते. अनंत, अद्वितीय आणि चिरंतन. हा विचार कायम डोळ्यासमोर ठेवून आपण लिहीत राहावे यासाठी अनंत कोटी शुभेच्छा….!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



