ब्रह्मदेशातील शेवटचा ‘थिबा राजा’
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

ब्रह्मदेशातील शेवटचा ‘थिबा राजा’
ब्रम्हदेश म्यानमार येथील थिबा राजाचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व. त्याच्या विद्यार्थीदशेची सांगता ‘पाघामारक्या’ ही सर्वोच्च पाली पदवी मिळवून झाली. म्यानमारच्या इतिहासात पदवी मिळवणारा थिबा हा एकमेव राजा होता. त्याला बौद्ध धर्माबद्दल व भिक्षुबद्दल कमालीचे आदर व प्रेम होते. तथापि त्याचे धर्मप्रेम आंधळे नव्हते. आपली कारकिर्द प्रजाकल्याणहितदक्ष व्हावी यासाठी त्याचा सदैव प्रयत्न असे. राजाच्या तिजोरीतून पैसा खर्च करून अनेक गुलामाची मुक्तता करून त्याचे पुनर्वसन केलेत. राज्यकारभारात सुधारणा घडविण्यासाठी अधिकारी व नागरिकांकडून सुचना मागविल्यात. अशा घोडदौडीला ब्रिटिशाचे ग्रहन लागले. “थिबा हा त्याच ब्रम्हदेशचा शेवटचा राजा”. ब्रम्हदेशाचे राजे मिडाॅनच्या 46 पुत्रापैकी एक.
थिबा हा धार्मिक प्रवृत्तीचा बौध्द धर्मीय, सरळमार्गी राजा होता त्यामुळे त्यास आर्थिक व्यवहार कधीच जमला नाही. मिडाॅन राजाच्या अनेक राण्यापैकी अलनंदा ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी राणी होती. ब्रम्हदेशाची संपूर्ण सत्ता आपल्याच हाती असावी असे तिला वाटे. त्यासाठी आपल्या तालावर चालणारा राजा असावा यासाठी थिबा राजा होणे इष्ट वाटत होते, हेच उद्दिष्ट समोर ठेवून लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने कट रचून इतर राजकुमारांची हत्या करवली व जे राजकुमार वाचलेत त्यांना राज्याबाहेर पळवून लावले व थिबा राजास राज्याभिषेक करवून राज्यकारभार स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानंतर अलनंदा राणीने आपल्या दोन कन्या सुपायंग्वी व सुपायंलती म्हणजेच थिबाच्या सावत्र बहिणी यांच्याशीच त्यांचा विवाह लावून दिला.
ऐवढा आटापिटा करून ब्रम्हदेशची सत्ता आई अलनंदाला न देता तिची कन्या सुपायंलती हिने धुळीस मिळवली. तिने आपली आई अलनंदाला राज्याबाहेर हाकलून स्वतःला महाराणी म्हणून घोषित केले. थिबावर पकड पहिल्यापासून असल्यामुळे थिबाच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेऊ लागली. थिबाच्या राज्यकारभारात अति ढवळाढवळ केल्यामुळे तिला, थिबाला संपूर्ण ब्रम्हदेशालाच शिक्षा भोगावी लागली. सुपायंलतीच्या कुटील कार्यामुळे राजा थिबाला ब्रिटिशाच्या रोषास कारणीभूत ठरला. ब्रिटिशांनी ब्रम्हदेशांवर आक्रमण करून थिबाचा पराभ करून त्यास अटक केली. दि. 28 नोव्हेंबर 1885 ही ब्रम्हदेशाच्या इतिहासातील पारतंत्र्याची पहिली रात्र ठरली.
म्यानमारमध्ये ब्रिटिशांना मुक्तदार न दिल्यामुळे ब्रिटीशांनी युध्द करून थिबा राजाला 28 नोव्हेंबर 1885 रोजी अटक केली. थिबाला ब्रम्हदेशात ठेवल्यास उठाव होईल असे वाटल्याने ब्रिटिशांनी थिबा व त्याच्या कुंटुबाला काॅलिन बोटीतून प्रथम मद्रासला व नंतर 16 एप्रिल 1886 ला रत्नागिरीला आणले. रत्नागिरीत थिबा राजाच्या वास्तव्यासाठी प्रथम एक बंगला अकल्लकोटचे दिवान रावबहादुर सुर्वे व रावसाहेब विष्णू फडके यांचे बंगले भाड्याने घेऊन ठेवण्यात आले. परंतु ही जागा अपुरी पडू लागल्यामुळे थिबाच्या पसंतीने कोल्हापूर रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूस एक जागा पसंत करण्यात आली व त्या जागेवर 1906 साली राजवाडा बांधण्यास सुरुवात झाली. हा राजवाडा बांधण्यासाठी ब्रिटिशांनी त्या काळात 1 लाख 25 हजार रूपये मंजुर केले होते. याच काळात थिबाने धार्मिक प्रयोजनासाठी रत्नागिरीतील झाडगाव येथे एक बुध्द विहार बांधले. राजवाड्याच्या बांधकामात थिबा जातीने लक्ष घालू लागला व रोजच बांधकामाला भेटी देवू लागला.
ब्रिटीशांनी त्याबाबत कोणतीही हरकत घेतली नाही. पूर्ण बांधकाम थिबाच्या मर्जीने आणि त्यांच्या देखरेखीखाली झालेत. परिणामतः जांभा दगड, चुना, ब्राझी सागवान वापरून या राजवाड्यात ब्राझी स्थापतेचा प्रभाव दिसून येतो. दि.13 नोव्हेंबर 1910 रोजी थिबा या राजवाड्यात राहायला गेला. मी व माझे कुटुंबीय हा राजवाडा आता नुकतेच दि 21 एप्रिलला बघून आलोत. याच राजवाड्यात राणी सुपायंग्वी यांनी दि. 25 जानेवारी 1912 व थिबा राजाने याच ठिकाणी वयाच्या 58 व्या वर्षी 16 डिसेंबर 1916 रोजी आयुष्याचा अखेरचा श्वास घेतला. त्याच्या समाध्या रत्नागिरी शहरात शिवाजीनगर भागात आहेत. राजवाडा व समाधी पाहण्यास म्यानमारचे लोक आजही बघायला येतात.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
==========



