“अखिल विश्व कवेत घेती; असे तया अंगी मोठेपण”; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“अखिल विश्व कवेत घेती; असे तया अंगी मोठेपण”; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय, दगडाला देवपण येत नाही’, ही म्हण शब्दशः खरी आहे. शिल्पकार दगडावर छिन्नी हातोड्यांनी घाव घालतो, त्यातून बनलेली मूर्ती देवालयात पुजली जाते. हिऱ्याला चमकण्यासाठी पैलू पाडून घ्यावे लागतात. सोने मुशीत तापवल्यावरच ते बावन्नकशी होते. वेदनेतून सृजन होते. ‘तया अंगी मोठेपण’ या उक्तीचा विचार करता असे लक्षात येते, ज्यांच्या अंगी खरे मोठेपण असते, त्यांना आयुष्यात अनेक संकटांना, अडचणींना आणि वेदनांना सामोरे जावे लागते. मोठेपण म्हणजे केवळ पैसा, पद किंवा प्रसिद्धी नव्हे, तर मनाची उदारता, सहनशीलता, त्यागाची वृत्ती आणि इतरांसाठी जगण्याची तयारी हेच खरे मोठेपण होय.
इतिहासात आणि समाजातअशी अनेक उदाहरणे दिसतात. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य झोकून दिले. समाजाने तिरस्कृत केलेल्या लोकांसाठी त्यांनी आनंदवन उभे केले, पण त्यासाठी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी दुर्गम भागात जाऊन आरोग्यसेवा दिली, तेथे अनेक अडचणी असूनही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी लढा दिला. समाजाच्या विरोधाला, अपमानाला न जुमानता त्यांनी शिक्षणाचा दीप चेतवला. सिंधूताई सपकाळ यांनी अनाथ मुलांसाठी आईची भूमिका निभावली, स्वतःच्या कठीण आयुष्यावर मात करून त्यांनी हजारो मुलांना आधार दिला. या सर्व व्यक्तींमध्ये एक समान गुण दिसतो; त्याग, धैर्य आणि निस्वार्थी सेवा. त्यांच्या आयुष्यातील यातना कठीण होत्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. म्हणूनच ते आज खऱ्या अर्थाने “मोठे” ठरतात.
जे लोक स्वतः जळूनही इतरांना प्रकाश देतात,अपमान गिळूनही हसत राहतात,यश मिळाल्यावरही पाय जमिनीवर ठेवतात,अपयशाच्या राखेतून फिनिक्स सारखे पुन्हा उभं राहण्याची जिद्द ठेवतात, ते खऱ्या अर्थाने मोठे असतात. त्यांचे मन मोठे असल्यामुळे सारे जगही ते कवेत घेतात.अशा व्यक्तींच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवन जगणे असते. आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धे साठी आदरणीय राहुल सरांनी “तया अंगी मोठेपण” हा वैचारिक विषय दिला. वेगवेगळे अर्थपूर्ण विषय देणे ही राहुलसरांची खासियत आहे. शिलेदारांनी स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल मी राहुलसरांची मनापासून आभारी आहे.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



