“दुर्गुणांची वजाबाकी अन् सद्गुणांची …गोळा बेरीज”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय "आम्ही बालकवी" काव्यस्पर्धेचे काव्यपरीक्षण

“दुर्गुणांची वजाबाकी अन् सद्गुणांची …गोळा बेरीज”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय “आम्ही बालकवी” काव्यस्पर्धेचे काव्यपरीक्षण
“आजी आजोबा घरात जिथे
तिथे उपजती संस्काराचे मोती,
अनावश्यक लाड मुलांचा
तयां जीवनाची होते माती..”
बाळा, मोठ्यांशी प्रेमाने वागावे. आदराने बोलावे, भांडणे करू नयेत, सर्वांना मदत करावी, अभ्यास करावा, सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा ,सूर्यनमस्कार करावे, सायंकाळी शुभम् करोति म्हणावे. आज कालच्या धावपळीच्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ही वाक्ये आता ऐकायला मिळत नाहीत. ज्या घरांमध्ये आजी-आजोबा आहेत त्या घरामध्ये संस्काराचे मोती पिकवले जातात. लहान वयापासूनच अगदी सुसंस्कार जर लहान मुलांवर बिंबवले गेले, तर त्याचा परिणाम पुढील त्याच्या जीवनामध्ये सुसंस्कारित पिढी बनवण्यासाठी होतो. पण आज कालचे अति लाड मुलांसाठी घातक ठरत आहेत. मैदानी खेळांची कमतरता सतत मोबाईलचा वापर, व्हिडिओ गेम यामुळे आजकालची पिढी संस्काराने कुपोषित जन्मत आहे.
पर्यावरण, निसर्गाची जपणूक, निसर्ग नियमाने वागणे, गुरूजनांचा आदर करणे, घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, लहानांशी प्रेमाने बोलणे, मोठ्यांचा आदर या गोष्टींची जागा आता राग, वाढता चिडचिडेपणा, आदळा आपट, अतिशय चंचल वृत्ती, दुसऱ्याचे ऐकून न घेण्याची क्षमता, माझेच खरे हा हेकेखोरपणा, घटत चाललेली कामसू वृत्ती, एकलकोंडेपणा अशा कितीतरी दुर्गुणांनी घेतली आहे. ‘या दुर्गुणांची वजाबाकी करून सदगुणांची गोळाबेरीज करणे ही काळाची आवश्यकता झाली आहे’. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हीच भावना मुळात नष्ट झाली आहे. संकुचित भावनांमुळे समाज, कुटुंब विघटित होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वार्थी वृत्ती- प्रवृत्ती माणसाला माणसातून उठवते.
एक शिक्षक म्हणून या संस्कारांची गोळाबेरीज नेहमीच हातातून घडत असते. परंतु समाजाने कर्तव्य म्हणून सुसंस्कारांची गोळा बेरीज करावी व ही शिदोरी आपल्या पाल्याला द्यावी. आज ‘मराठीचे शिलेदार’ समूहामध्ये राहुल दादांनी ‘गोळाबेरीज’ हा बालकवीतेसाठी विषय दिला आणि सर्व बालकवी गणिताची गोळा बेरीज करण्यामध्ये जास्त मग्न झाले. बाल सुलभ कल्पनांना, शब्दांना वाव देणे बालकवितेमध्ये आवश्यक असते. कविता व बालकविता मधील फरक ओळखून काव्य लिहा. वनिता ताई, माधुरी ताई यांच्या रचनांचा थोडा आढावा घ्यावा. बालकवी समूहातील सर्व शिलेदार बंधू-भगिनींना बालकाव्य लेखनासाठी भरभरून शुभेच्छा. राहुल दादांनी मला परीक्षणाची संधी दिली त्याबद्दल शतशः ऋण! तूर्तास थांबते. धन्यवाद!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/ कवयित्री/ लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह



