मनाची भूक
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे
मनाची भूक
तुम्ही म्हणाल माणसाला जेवणाची भूक लागते, अन्न लागतं पोट भरण्यासाठी, जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा माहित आहे पण हे मनाची भूक काय आहे. ‘मनाची भूक’ याचा अर्थ विचारांचे आदान प्रदान होय. मनाची भूक शब्दांनी, भावनांनी समजून घेणारे प्रेम मागते. आपल्या मनात अनेक विचारांचे काहूर माजलेले असते. किंबहुना अनेक फुलपाखरं आपल्या मनात सुखदुःखाच्या विचारांचे पंख लावून रुंजी घालत असतात. ह्या विचारांचे करायचे काय? तो मनातून रिता कसा करायचा.
आपले विचार मुद्देसूद आपल्या वहीत लेखन करून ठेवले तर आपल्या मनाला शांतता मिळते. विचारांचे सेपरेशन होते. शब्दांची फुलपाखरे शांत होवून अंतरी एका भावनामय स्थळी चिडीचूप होतात. आपल्याच विचारांना प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते. या लेखनाला, विचारला कोणाची शाब्दिक थाप, आपुलकीचे शब्द मिळाले की आनंद, समाधान मिळते.आपल्या लेखनातून कोणालातरी प्रेरणा मिळू शकते.
एखादा वाद झाला किंवा दुःखाची काही घटना घडली तर आपले मन शांत करण्यासाठी आपण एकमेकांशी संवाद साधतो, अथवा आपल्या आवडीचे काम करतो, त्यामध्ये अनेक छंद आहेत. चित्र काढणे, कार्यानुभवाच्या वस्तू तयार करणे, जुन्या फिल्मची गाणी ऐकणे, नृत्य करणे अशा अनेक सवयी माणसाला जडलेल्या आहेत. त्यातून माणूस आपले मन शांत करतो.एखाद्याच मनापासून ऐकले तरी समोरच्या व्यक्तीला बरे वाटते. हीच ती मानसिक भूक.
पण मनातील दुःखाचा, विचारांचा जर का निचरा करायचा असेल, विरेचन करायचं असेल तर आपण आपल्या डायरीमध्ये त्याची नोंद करावी. जेणेकरून मनातले विचार डायरीवर लेखन केले जातात. मनातल्या विचारांना शांतता मिळते आणि आपले लेखन उत्तम होते. आपल्याला आलेल्या अनुभवांचा इतरांना फायदा होऊ शकतो.प्रेरणा मिळू शकते त्यातून काहीतरी चांगले घेण्याचा इतर लोकं नक्कीच प्रयत्न करतात.
म्हणूनच आपल्या पोटाबरोबर मनालाही शाब्दिक, भावनिक अन्न देऊया आणि मनालाही तृप्तीचा ढेकर द्यायला लावूया…..
अशांत मन शांत करूया
भावनांचा तोल सावरया
शब्दांची फुलपाखरे गगनी उंच नेऊया….
कारण सुखदुःखाचा हिंदोळा म्हणजेच जीवन होय. या जीवनाच्या घडीवरुन चालताना जीवनात बरेचदा अतिशय संघर्ष करावे लागतात. हे संघर्ष करताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यावेळी निसर्ग आपल्याला सर्व अंगाने बलवान करण्याचा प्रयत्न करत असतो अडचणींचा सामना करून यशाचे भागीदार व्हावे असे निसर्ग आणि जीवन आपल्याला शिकवत असतो.
मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है| पंख होने से कुछ नही मिलता हौसलोंकी उडान होती है!
म्हणून मित्रांनो मनाची उमेद वाढवावी. ध्येयाला फोकस करावे. अपयशाने खचून जाऊ नये. मनाची उभारी वाढवून ध्यान धरणा करावी. यश आपल्या हातात निश्चित मिळते. हे अनुभवाचे बोल आहेत.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे
=========



