अँड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये ‘२१ वे आविष्कार संशोधन कन्व्हेन्शन’
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अँड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये ‘२१ वे आविष्कार संशोधन कन्व्हेन्शन’
जिल्हास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
“तज्ञांच्या कृतिशील मार्गदर्शनातून संशोधनाची दिशा”
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, (दि. १९ जुलै): जनता शिक्षण मंडळ संचलित अँड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने २१ व्या आविष्कार संशोधन कन्व्हेन्शन (रायगड विभाग – विभाग सातवा) अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शनच्या ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी डॉ. मीनाक्षी गुरव, हर्बल रिसर्च लॅब अँड ॲनिमल टेस्टिंग इन्चार्ज डॉ. सुनीता शैलजन, इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स ट्रेनिंग अँड रिसर्च इन इंटरडिसिप्लिनरी सायन्सेसचे संचालक डॉ. ससिकुमार मेनन, जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश भगत तसेच सहाय्यक समन्वयक डॉ. जगदीश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रायगड विभागातील कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट आणि अभियांत्रिकी शाखांतील २० महाविद्यालयांमधील सुमारे ६० प्राध्यापकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला.संपूर्ण कार्यशाळेचे सात सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते .
प्रास्ताविकात डॉ. सुनिल पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेची यशस्वी वाटचाल उलगडून सांगत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण, समाजाभिमुख आणि नाविन्यपूर्ण संशोधन करण्याचे आवाहन केले. संशोधन करताना शास्त्रीय दृष्टिकोन, गुणात्मक अभ्यासपद्धती आणिसमस्याकेंद्रित विचार आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आविष्कार स्पर्धेची पात्रता, नियमावली, विविध स्तर, पारितोषिके तसेच संशोधनासाठी विषय निवड, संशोधन समस्या निश्चिती, संशोधन पद्धती, माहिती संकलन, विश्लेषण आणि उपाययोजना याविषयी डॉ. मीनाक्षी गुरव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. सुनिता शैलजन आणि डॉ. ससिकुमार मेनन यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून प्रभावी संशोधन कसे करावे, संशोधनाची मांडणी, समस्या विश्लेषण आणि निष्कर्ष लेखन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी प्राध्यापकांचे विविध संघ तयार करून प्रत्यक्ष कृतीशील संशोधनाचे प्रशिक्षण दिले. संशोधन ही केवळ सैद्धांतिक प्रक्रिया नसून विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि सामूहिक सहभाग यांमधून दर्जेदार संशोधन घडते, असे सांगत त्यांनी प्राध्यापक–विद्यार्थी संवादाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित केले. सहभागी प्राध्यापकांनीही प्रत्यक्ष संशोधन आराखडे तयार करून प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदविला.
समारोप सत्रात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संशोधन प्रकल्पांचे पॉवर पॉईंट सादरीकरण केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. कार्यशाळेतील सातही सत्रांमध्ये डॉ. मीनाक्षी गुरव, डॉ. सुनीता शैलजन आणि डॉ. ससिकुमार मेनन यांनी प्रभावी मार्गदर्शन केल .
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, सचिव श्री. गौरव पाटील, प्रभारी प्राचार्या डॉ. नीलम हजारे तसेच IQAC समन्वयक प्रा. निलम म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी आविष्कार समन्वयक म्हणून नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच प्रा. पियुषा पाटील, प्रा. चिन्मय राणे, प्रा. कौशिक बोडस, प्रा. सुरज पुरी, प्रा. हर्षदा चेवले, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.



