“एक झाड लावणं ही कृती आहे, पण जंगल वाचवणं ही संस्कृती आहे”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“एक झाड लावणं ही कृती आहे, पण जंगल वाचवणं ही संस्कृती आहे”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘जादव मोलाई पयांग’ हे आसाममधील पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी एका बेटावर एकट्याने वृक्षारोपण करून उजाड जमिनीचे हिरव्यागार जंगलात रूपांतर केले; त्यांच्या या कार्यासाठी त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ मिळाला. त्यांच्या संदर्भातले हे वाक्य मला खूप आवडते…”सर्व माणसांनी ठरवले तर अख्खे जंगल नष्ट करता येते, पण एक माणसाने ठरवले तर अख्खे जंगल निर्माण करता येते”. जंगल… हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते हिरवळ, शांतता, आणि जीवनाचा स्पंदनशील ठोका. परंतु, हा केवळ निसर्गाचा देखावा नाही, हे आपल्या अस्तित्वाचं मूळ आहे, आपल्या श्वासाचं अधिष्ठान आहे.
विज्ञान आपल्याला सांगते की, जंगल हे पृथ्वीचे “हरित फुफ्फुसे” आहेत. ती कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला जीवनदायी ऑक्सिजन देतात. पण मित्रांनो, जर आपण साहित्याच्या दृष्टीने पाहिलं, तर जंगल आपल्याला केवळ श्वास देत नाहीत. ते आपल्याला जगण्याचा अर्थ देतात, निसर्गाशी नातं जोडायला शिकवतात. आजच्या या प्रगतीच्या युगात, आपण विकासाच्या नावाखाली जंगलांची निर्दय तोड करत आहोत. मोठमोठे प्रकल्प, शहरी विस्तार, आणि भौतिक सुखांच्या हव्यासामुळे आपण निसर्गाच्या मुळांवरच घाव घालत आहोत. आणि त्याचे परिणाम? वाढतं तापमान, अनियमित पाऊस, पूर आणि दुष्काळ यांची तीव्रता आणि सर्वात भयंकर म्हणजे जैवविविधतेचा नाश.
मित्रांनो, एक झाड पडतं तेव्हा केवळ लाकूड तयार होत नाही. एक घरटं उद्ध्वस्त होतं. एक जीव बेघर होतो, आणि आपल्या भविष्यावर एक सावली पडते. मग प्रश्न असा आहे आपण काय करणार? ‘जंगल वाचवणं ही केवळ सरकारची जबाबदारी नाही’. ती प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. ‘एक झाड लावा, कागदाचा अपव्यय टाळा’. पर्यावरणपूरक सवयी अंगीकारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गावर प्रेम करा. कारण मित्रांनो, “एक झाड लावणं ही कृती आहे, पण जंगल वाचवणं ही संस्कृती आहे”. जर आज आपण जागे झालो नाही, तर उद्या उशीर होईल. “जंगल संपलं, तर पाणी संपेल… पाणी संपलं, तर जीवन संपेल” म्हणून चला, आपण आज इथून एक ठाम निर्धार करूया…!!
“जंगल वाचवूया, जीवन वाचवूया” झाडं वाचवा, कारण ती बोलत नाहीत. पण तीच आपल्या भविष्यासाठी श्वास घेतात…” आज पर्यावरणाचा विचार करून ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “जंगल वाचवू या” हा पर्यावरण स्नेही विषय दिला. आणि पुन्हा एकदा स्व कल्पकतेने सर्व कवी कवयित्रींनी या विषयाला योग्य न्याय देत रचनांचा सर्व समूहांमध्ये जणू पाऊसच पडला.. तेव्हा तुम्हा सर्व कवी कवयित्रींचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणासाठी अनंत कोटी शुभेच्छा मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!!
प्रशांत दत्तात्रेय ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक/लेखक/ समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



