हरी गुरुजींसोबत अखेरच्या श्वासापर्यंत संतसेवा घडू द्या..!!!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर बेडगा उमरगा, जि. धाराशिव

हरी गुरुजींसोबत अखेरच्या श्वासापर्यंत संतसेवा घडू द्या..!!!
ईश्वररुपी भाविक भक्तांना…. साष्टांग दंडवत. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची… जोडी रामकृष्ण आवडी सर्वकाळ… ही ओवी केवळ म्हणण्याची नाही, तर आयुष्यात उतरवण्याची आहे. आणि नम्रतेने सांगतो, ‘ही ओवी माझ्या जीवनात साकार झाली आहे’ मी डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर. नावात “ज्ञानदेव”, पण त्या नावाला खरी गोडी दिली ती, ‘आमचे पूज्य हरी गुरुजी लवटे’ यांनी. हरी गुरुजी वयाने माझ्यापेक्षा सात-आठ वर्षांनी लहान…!! पण माझ्यासाठी तेच माझे गुरू आहेत! जसे संत ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती दादांनी दिशा दिली, तसेच माझ्या जीवनाला दिशा देणारे हरी गुरुजी! त्यांनी मला हरिनामाची गोडी लावली, नामसंकीर्तनाची ओढ निर्माण केली, आणि मला प्रवचन सेवेसाठी उभं केलं! म्हणूनच माझ्या अंतःकरणातून नेहमी एकच ओळ उमटते, “काय सांगो मी त्यांचे उपकार, मज निरंतर जागविती…”
आज ज्या ठिकाणी हरी गुरुजींची कीर्तन सेवा होते, त्याच ठिकाणी माझी प्रवचन सेवा घडते. ही आमची जोडी नाही, ही तर नाम आणि ज्ञानाचा सुंदर संगम आहे! आता एक गोष्ट मी अत्यंत भावनेने सांगतो. कीर्तन आणि प्रवचनातून जे काही दक्षिणा मिळते, नारळासहित… ती आम्ही पूर्णपणे ‘श्री क्षेत्र अचलबेट’ देवस्थानाला अर्पण करतो! एक पैसाही आम्ही स्वतःसाठी ठेवत नाही! कारण आम्हाला शासनाची नोकरी आहे. हरी गुरुजी आश्रम शाळेत सेवा करतात आणि मी नामांकित ‘भारत विद्यालय बेडगा’ येथे शिक्षक म्हणून सेवा करतो. हे आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे
पण ही सेवा, ही आमची साधना आहे! ही विकत घेण्याची गोष्ट नाही… ही तर समर्पणाची वाट आहे! आज गावोगावी, परिसरात… जवळपास शे-दोनशे गावातील भाविक ओळखतात, तर अनेक भाविक भक्त आम्हाला ओळखतात. पण ही ओळख आमची नाही… ही ओळख आहे हरिनामाची, भक्तीची आणि सद्गुरूंच्या कृपेची! लोक म्हणतात, “गुरुजी, तुम्ही खूप मोठं काम करता…” पण मी नम्रतेने सांगतो, “आम्ही काहीच करत नाही… सगळं काही सद्गुरू करवून घेतात!”. सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या कृपेनेच आम्हाला शिक्षकाची नोकरी मिळाली. जीवनाला स्थैर्य मिळालं… आणि त्याचबरोबर ही संतसेवा करण्याची संधी मिळाली! म्हणूनच आम्ही एक ठाम संकल्प केला आहे. “मरेपर्यंत या सेवेतून कसलीही अपेक्षा ठेवायची नाही… ना पैसा, ना मान, ना प्रसिद्धी… फक्त सेवा… फक्त नाम… फक्त संतांची कृपा!”
आज जर काही लोक आम्हाला ओळखत असतील, तर ती आमची मोठेपणाची गोष्ट नाही… ती आमच्यावरची जबाबदारी आणि कर्तव्य आहे! जास्त लोक ओळखतात, म्हणजे अधिक नम्र व्हायला हवं… अधिक सेवा करायला हवी… अधिक नामात राहायला हवं! शेवटी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना, हे सद्गुरू उज्वलानंद महाराज, आमच्या अंतःकरणात ही निस्वार्थ सेवा कायम ठेवा. हरी गुरुजींसोबत अखेरच्या श्वासापर्यंत संतसेवा घडू द्या… लोभ, अहंकार, अपेक्षा यांचा स्पर्शही होऊ देऊ नका आणि तुमच्या चरणाशी आम्हाला सदैव जोडून ठेवा! मी काहीच नाही… मी फक्त त्यांच्या कृपेचा एक कण आहे… मानतो मी हरी गुरुजी लवटे यांचा दास आहे…! ॥ हरि विठ्ठल ॥
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा उमरगा, जि. धाराशिव
=======



