नागपुरात “सुदीप जैस्वाल ॲडव्होकेट्स फाउंडेशन” स्थापनेची घोषणा
गजानन ढाकुलकर प्रतिनिधी

नागपुरात “सुदीप जैस्वाल ॲडव्होकेट्स फाउंडेशन” स्थापनेची घोषणा
गजानन ढाकुलकर
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर : (दि २४) धंतोली येथील पत्रकार भवन येथे बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत स्वर्गीय ॲडव्होकेट सुदीप जैस्वाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “सुदीप जैस्वाल ॲडव्होकेट्स फाउंडेशन” या संस्थेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या परिषदेला वकीलमित्र, चाहते व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय ॲडव्होकेट सुदीप जैस्वाल हे वकिलांच्या हक्कासाठी लढणारे, अन्याया विरुद्ध ठामपणे उभे राहणारे धाडसी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा मोठा भाग वकिलांच्या चळवळी व कल्याणासाठी खर्च केला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना त्यांनी वैयक्तिक नुकसानही सोसले, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले.
मात्र त्यांनी वकिलांमध्ये अन्याया विरुद्ध लढण्याची जिद्द, आत्मविश्वास आणि एकजूट निर्माण केली. त्यांच्या या कार्यामुळे ते कायम स्मरणात राहतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या फाउंडेशनचा मुख्य उद्देश नागपूर व विदर्भातील वकिलांचे कल्याण, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि न्यायव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवणे हा आहे.
संस्थेच्या माध्यमातून “टाइम बँक” ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असून, आजारी किंवा बाहेरगावी असलेल्या वकिलांच्या कामासाठी इतर वकील सदस्य मदत करतील. तसेच वकिलांसाठी स्वतंत्र वकील भवन, जिमखाना, रिक्रिएशन क्लब व ग्राहक सहकारी संस्था उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, सुदीप जैस्वाल यांच्या पत्नींकडून नागपूर ग्रामीण भागात सुमारे ७ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्या ठिकाणी क्रिकेट मैदान, जिमखाना व इतर सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. “ॲडव्होकेट्स ११” ही टीम पुन्हा सक्रिय करण्याचाही संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. याशिवाय भ्रष्ट, अकार्यक्षम व निष्क्रिय अधिकाऱ्यांचा माहिती संच (डेटाबेस) तयार करणे, इतर जिल्ह्यांतील वकिलांना मदत करणे, वकिलांच्या कुटुंबांना मोफत कायदेशीर सहाय्य देणे, तसेच वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कठोर कायद्याची मागणी करणे अशी अनेक उद्दिष्टे या संस्थेने निश्चित केली आहेत.
न्यायालयीन कामकाजात वकिलांना दीर्घकाळ उभे राहण्याची प्रथा बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांकडे निवेदनाद्वारे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला ॲड. कमल सतुजा, ॲड. सतीश उके, ॲड. तरुण परमार, ॲड. वैभव जगताप, ॲड. लुबेश मेश्राम, ॲड. कौशल त्रिवेदी, ॲड. रमेश राठोड, ॲड. नकुल परमार, ॲड. अरुण बलपांडे, ॲड. ओ. आर. यादव, ॲड. दरयानी, श्री. सुनील चोखरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही संस्था विना नफा तत्त्वावर कार्य करणार असून, सदस्यांच्या देणगी, सहकार्य व श्रमदानातून वकिलांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. वकिलांच्या हक्कासाठी एकत्र येण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न असून, विदर्भातील न्याय क्षेत्रात यामुळे सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



