महाराष्ट्र संतभूमी, ग्रामीण वास्तव आणि शेतकऱ्यांची वेदना
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर उमरगा ता.उमरगा, जिल्हा धाराशिव

महाराष्ट्र संतभूमी, ग्रामीण वास्तव आणि शेतकऱ्यांची वेदना
मी मु.पो. मळगी, ता. उमरगा, जिल्हा धाराशिव या मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यात राहतो. 1995 सालापासून ग्रामीण भागातील लेकरांना ज्ञानदानाचे कार्य करत आहे. शिक्षक म्हणून हे माझ्यासाठी केवळ काम नाही, तर समाज घडविण्याची एक पवित्र साधना आहे. महाराष्ट्र म्हटले की, मन अभिमानाने भरून येते. “महाराष्ट्र माझा” ही भावना प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात खोलवर रुजलेली आहे. हा केवळ एक प्रदेश नसून संतांची, संस्कृतीची आणि पराक्रमाची पवित्र भूमी आहे.
या भूमीत संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी मानवतेचा संदेश दिला. “जे का रंजले गांजिले त्यासी म्हणे आपुले, देव तेथेच ओळखावे”. या विचारांनी समाजात समता, प्रेम आणि करुणा रुजवली. “संत यारे यारे, लहान थोर” म्हणत त्यांनी सर्वांना एकत्र आणले. भारत हा विविधतेने नटलेला महान देश आहे, आणि त्या भारतात महाराष्ट्र हे राज्य विशेष स्थान राखते. कारण येथे संतांची शिकवण, शूरांचा इतिहास आणि कष्टकऱ्यांचे जीवन एकत्र नांदते.
ग्रामीण भाग हा महाराष्ट्राचा खरा आत्मा आहे. गावाकडच्या मातीचा सुगंध, साधेपणा आणि माणुसकी हेच इथले खरे वैभव आहे. या मातीत शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो. पांढरी ज्वारीसारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेतकरी उन्हात, पावसात, वाऱ्यात राब राब राबतो त्याच्या घामातून अन्न निर्माण होते. परंतु दुःखाची गोष्ट अशी की, या अन्नदात्यालाच आपल्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. बाजारातील चढउतार, वाढते खर्च आणि अपुरा हमीभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. “भारत शेतीप्रधान देश आहे” असे आपण अभिमानाने म्हणतो, पण त्या शेतीचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मात्र चिंताजनक आहे. हीच गोष्ट मनाला सर्वाधिक वेदना देते.
जो जगाला अन्न देतो, त्यालाच आपल्या श्रमाचे योग्य मोल मिळत नाही. “महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नाही, तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे”. संतांच्या शिकवणुकीप्रमाणे आपण जर माणुसकी, समता आणि सेवा या मूल्यांचा स्वीकार केला, तर समाज अधिक समृद्ध होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांना योग्य सन्मान आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अखेर एवढेच म्हणावेसे वाटते, “महाराष्ट्र ही केवळ भूमी नाही, ती संस्कारांची जननी आहे; आणि या मातीत जन्म घेतल्याचा मला सदैव अभिमान आहे”. जय महाराष्ट्र!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
उमरगा ता.उमरगा, जिल्हा धाराशिव
=======



