‘आम्ही निवडतो लोकप्रतिनिधी राजा, मग भोगतो पाच वर्ष सजा’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्य परीक्षण
‘आम्ही निवडतो लोकप्रतिनिधी राजा, मग भोगतो पाच वर्ष सजा’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्य परीक्षण
आदरणीय अब्राहम लिंकन साहेब…. सप्रेम नमस्कार.
“लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही “अशीच व्याख्या केली आहे ना तुम्ही? लोकशाहीची? अहो…आज माझ्या महाराष्ट्रात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव अर्थात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निमित्ताने मला तुमची प्रकर्षाने आठवण झाली. आमचा भारत देश म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही. प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निपक्षपाती पद्धतीने निवडणुकांद्वारे लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आपल्या देशाचा, राज्याचा कारभार चालवतात. साहेब… आम्ही आमच्या मतदाराला मोठं गोंडस नाव दिले आहे…. मतदार राजा… राजाच हो… पण आमचा राजा नावापुरताच. त्याची या सत्ताधिकाऱ्यांना ना काळजी आहे ना त्याचा कोणी वाली आहे.
एकदा का त्याचं मत पदरात पाडून घेतलं की, मग लोकप्रतिनिधी राजा होतो आणि मतदार पाच वर्ष सजा भोगतो. काय म्हणतात तुम्ही ? तुमच्याकडे मतदान होतं फक्त? मत विकले नाही जात?? आमच्याकडे तर पाचशे रुपयात इमान विकलं जातं. ‘विकत घेणारा पण तयार आणि स्वतःला विकणारा पण तयारच असतो’. बिन बोभाटपणे नाही हो राजरोसपणे होतात असे व्यवहार… मग दारूच्या पार्ट्या,जेवणावळी, कपडे, साड्या, सोनं, टीव्ही, फ्रीज ही सर्व आमिषे तर असतातच.
होय..प्रामाणिक राज्यकर्ते असले की देशाचा विकास होतो खरे आहे हे…. पण ऐका ना… यावेळी मी जरा बारकाईने अभ्यास केला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतले बरेच उमेदवार २०२४ मध्ये पण बाशिंग बांधून तयार आहेत. २०१९ ची त्यांनी जाहीर केलेली संपत्ती आणि आता जाहीर केलेली संपत्ती यात कमालीची तफावत आहे… अहो ५०० ते ६०० पट संपत्तीत वाढ झालेले ही लोक मी पाहिले..
काय म्हणता तुम्ही?? जादूची कांडी फिरवली असेल..कशी बरं फिरेल ? कोणता जादूचा दिवा पेटला की,पाच वर्षात काहीही न करता गर्भश्रीमंत होतात… मी मतदार म्हणून या सर्व गोष्टींचा जेव्हा शांतचित्ताने विचार करते तेव्हा मला असं वाटतं की न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीप्रमाणे मतदार पण दोनशे, पाचशे रुपयांच्या पट्टीने स्वतःचे डोळे झाकून घेतो आणि नको त्या माणसाला निवडून देतो. निवडून आल्यावर तो मारतो उड्या … या कुंपणावरून त्या कुंपणावर… त्या कुंपणावरून दुसऱ्या कुंपणावर..सरड्यालाही लाज वाटेल एवढे रंग बदलतात काही. ना तत्व आहे ना निष्ठा,जाणीव आहे ना दूरदृष्टी. पण आमच्या या महाराष्ट्रात काही प्रामाणिक लोक पण आहेत… मी अत्यंत आदराने नाव घेईल स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचे.तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले तरी प्रवास मात्र एसटी बसनेच करायचे म्हणूनच तर आमची लोकशाही जिवंत आहे.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘मी मतदार’ हा विषय दिला आणि मतदानाचाच दिवस असल्याने सुट्टीचा फायदा घेत सर्व शिलेदार खूप सुंदर पद्धतीने व्यक्त झालेत आणि प्रत्येकाने आपापल्या परीने लोकशाहीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा धन्यवाद.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह



