स्व.भय्याजी काणे यांनी ईशान्येला ईश्वरी कार्य उभे केले: सुरेश तथा भय्याजी जोशी
अमृता खाकुर्डीकर, पुणे.

स्व.भय्याजी काणे यांनी ईशान्येला ईश्वरी कार्य उभे केले: सुरेश तथा भय्याजी जोशी
दूरदृष्टी आणि प्रभावी व्यक्तीमत्त्व लाभलेले स्व.भय्याजी काणे
शंकर दिनकर काणे जन्मशताब्दी सांगता समारंभ भावपूर्ण वातावरणात संपन्न
अमृता खाकुर्डीकर, पुणे.
“अंतरिक जिव्हाळा आणि निखळ प्रेमाच्या बळावर स्व. भैय्याजी काणे यांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत शिक्षणाचे रोपटे लावले. विरोधकांना न जुमानता गरीब स्थानिकांना कुठलीही लालूच न दाखवता आत्मीतयतेने आपलेसे करून घेतले व ईशान्येच्या भूमीत आपले पाय घट्ट रोवले. दूरदृष्टी आणि प्रभावी व्यक्तीमत्त्व लाभलेले स्व. भय्याजी काणे यांनी शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचे मोठे ईश्वरी कार्य ऊभे केले आहे”.अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भय्याजी जोशी यांनी शंकर दिनकर काणे यांच्या कार्याचा गौरव केला. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान आयोजित ध्येयवादी शिक्षक व संघप्रचारक शंकर दिनकर तथा स्व. भय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
बी.एम. सी. सी. काॅलेजच्या टाटा सभागृहात साज-या झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रसिध्द उद्योजक, क्वीकहिल टेक्नाॅलाॅजीचे संस्थापक मा. कैलास काटकर, रा.स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक मा. रवींद्र वांजरवाडकर, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष ॲड. प्रदीपजी कदम तसेच भय्याजीचे परम शिष्य प्रतिष्ठानचे कार्यवाह श्री. जयवंत कोंडविलकर हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे बोलताना भय्याजी जोशी यांनी ईशान्य भारताच्या समस्येबद्दल आपले चिंतन प्रकट केले. ते म्हणाले, धर्मभेदाच्या पलीकडे राष्ट्रीयत्वाचा एकात्म भाव जागृत केल्याशिवाय भारतीय सीमा सुरक्षित राहणार नाहीत, यादृष्टीने शिक्षण हे माध्यम निवडताना भय्याजींची दूरदृष्टी जाणवते. कारण राष्ट्रभावनेचा संस्कार खोलवर रूजवण्यासठी शालेय वय हे सर्वात योग्य असते. नवी पिढीच नवा भारत घडवणार आहे; तसेच पूर्वांचलातील आत्ताची लहान मुलेच पुढे नवा ईशान्य भारत निर्माण करतील,असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दृष्टी, संकल्पना, आग्रह, व्हीजन आणि मिशन हे सर्व पैलू भैय्याजींच्या ठायी एकत्र आल्यामुळे “शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता” हे कार्य आज यशस्वी होताना दिसत आहे; पंरंतु कुठल्याही कामाला पूर्णत्वं यायला काही वेळ जावा लागतो, तसा हेही कार्य संपूर्ण व्हायला आणखी काही काळ लागेल, या कामाचा सध्या हा माध्याह्न काळ म्हणावा लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उर्वरीत भारतासोबत आसामच्या लोकांनाही नागालँड , मिझोराम, मणिपूरींबद्ल आपुलकी वाटली पाहिजे, स्थानिक आदिवासी जनजातींचे आपापसातील मतभेद मिटल्याशिवाय ईशान्येचा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेऊन या कामाला आणखी गती द्यावी लागेल, असे प्रतिपादन त्यांनी ईशान्येतील संघर्षाबाबत मांडले. पुण्यातून कार्यकर्त्यांचे बळ मिळत आहे, तसे देशभरातून अनेक हात या कामाला जोडले गेले तरच पूर्वांचलचा हा सीमाप्रदेश अधिक सुरक्षित होईल, असे मोलाचे मत नोंदवून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
कार्यक्रमात आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. टिळक रोडवरील पूर्वांचल मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थीनींनी स्वागत गीत गायन केले. प्रतिष्ठानच्या श्रुती मेहता यांनी प्रास्ताविकतून प्रतिष्ठानची थोडक्यात माहिती सांगितली. विशेषतः भैय्याजीच्या जन्मशताब्दी निमित्त माणिपूरमधील शैक्षणिक व राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य भारतभर पोहचवले असून समर्थ भारतचे अनेक कार्यकर्ते यात सामील झाल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. भविष्यातले संकल्प साध्य करण्यासाठी मदतीची मोठी गरज व्यक्त करून त्यांनी वेळ, कौशल्य, आर्थिक मदत अशा प्रकारे लोकांनी या कार्यात आमचे हात बळकट करावे, असे शेवटी आवाहन केले.
यानंतर ईशान्य भारताची सद्यस्थिती व भैय्याजींच्या प्रेरणेतून ऊभे राहिलेले शैक्षणिक कार्य यांचा मागोवा घेणारा लघुपट दाखवण्यात आला. बालवयापासून भय्याजींबरोबर राहून मणिपूरच्या शाळेत शिकून आजपर्यंत त्याच कार्याला वाहून घेतलेले प्रतिष्ठानचे प्रणेते व प्रमुख कार्यवाह मा. जयवंत कोंडविलकर यांनी ईशान्य भारतातील प्रतिष्ठानच्या कार्याची भूमिका व सद्यस्थिती मांडली. आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त करताना त्यांनी भय्याजींसोबत वयाच्या 12 व्या वर्षापासून सुरू केलेल्या विलक्षण कामाचा प्रवास रंगवून सांगितला आणि प्रतिष्ठानच्या भविष्यातील योजनांची थोडक्यात कल्पना मांडली. अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या सीमेवरची पहिली शाळा ते चीनच्या सीमेवरची तिसरी शाळा या संपूर्ण काळात जे शिक्षक इथे शिकवत होते, त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची विरोधकांची हिंमत झाली नाही, हेच या कार्याचे यश असून असाच विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिक व पवित्र शैक्षणिक कार्यात सर्वांचा सहभाग मोठ्या संख्येने मिळावा,अशी विनंती त्यांनी उपस्थितांना केली.
जन्मशताब्दी वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रतिष्ठानच्या आदिती मोगरे यांनी चित्रफितीद्वारे सादर केली. भैय्याजींचे जन्मस्थान असलेल्या नाशिक शहरातून उपक्रमांचा शुभारंभ होऊन पुणे , सांगलीसह मणिपूर येथे शिक्षण, मूल्यशिक्षण, विज्ञान, आरोग्य, निसर्ग यावर आधारीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यापैकी “साकव” हे बालनाट्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचले. मणिपूरमधल्या शाळांच्या अद्यावत ईमारती, भविष्यात आणखी शाळा, तिथे दूरशिक्षण, क्रीडा सुविधायुक्त मैदान ई. संकल्प प्रत्यक्षात साकार होण्यासाठी जनतेचे पाठबळ मिळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रमुख पाहुणे कैलासजी काटकर यांनी आपले प्रांजळ मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सहसा आपला गाव न सोडणारा महाराष्ट्रातला माणूस, पण भय्याजी काणेंसारखी ध्येयवादी व्यक्ती लहानग्या जयवंतला घेऊन 50 वर्षापूर्वी भारताचे थेट ईशान्य टोक गाठते, धगधगत्या मणिपूरला येते, तिथे छोट्याशा शाळेच्या माध्यमातून खूप मोठे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य घडवते, ही सर्व कहाणी अतिशय उदभूत आहे. मी हे सर्व पाहून भारावलो. ईशान्य भारतातील वंचित आदिवासींच्या जीवनात आलेले परिवर्तन अचंबित करणारे आहे. PSVP चे कार्य प्रशंसनीय असून यात काय योगदान देता येईल, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. शक्य ती मदत करून ईशान्य भारत सावरायला हवा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
मेहर परळीकर यांच्या पद्य गायनाने सभागृहाचे वातावरण ईशान्य भारताच्या आपुलकीने भारावून गेले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिरीष आपटे यांनी व ऋणनिर्देश चेतन कुलकर्णी या॔नी केला. पिंपरी चिंजवडच्या पूर्वांचल वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या भावपूर्ण कार्यक्रमास रा. स्व. संघाचे अनेक स्वयंसेवक, पूर्व सीमा विकासचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर चहापानाच्यावेळी अनौपचारिक गाठीभेटींचा कार्यक्रमही तितकाच हृद्य होता.
अमृता खाकुर्डीकर, पुणे.





