“शिवराय म्हणजे शौर्याला दूरदृष्टीची जोड”; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“शिवराय म्हणजे शौर्याला दूरदृष्टीची जोड”; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
द्विधा मन झाले होते त्या अर्जुनाचे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार झालेला तो गर्भगळीत होऊन धनुष्य खाली पाडून खिन्न झाला होता. तेव्हा त्यास ‘गीता’बोध करणारा देव श्रीकृष्ण होता. अन्याय होत असेल तर स्वधर्म पाळायचा व अन्यायाविरूद्ध लढायचं, केवळ स्वराज्य नव्हे तर सुराज्य निर्माण करायचं याचं स्फुल्लिंग.. तो कृष्णविचार समस्त मावळ्यांच्या मनात व महाराष्ट्रभूमीतील रयतेच्या मनात पेरणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांची लढाई कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हे; तर अन्यायाविरुद्ध होती. कुठल्याही व्यक्तीविरुद्ध नव्हे तर वृत्तीविरूद्ध होती. अफजलखानाचा वध केल्यानंतर शत्रूच्या कलेवराचीही विटंबना होऊ न देता त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा राजा जगाच्या पाठीवर एकमेव असेल. विचारातून मनामनात जागा निर्माण करणे व आचरणातून ती अमर करणे. ही दैवी शक्ती लाभलेले हे दैवत ‘छत्रपती’.
परकीय आक्रमण झाले की स्त्रीला तिच्या अब्रूची, कृषकाला त्याच्या शेतीची, बहुजनांना जीवाची भिती वाटायची. एवढेच नव्हे, तर मंदिरे व प्रार्थना स्थळांच्या चिरांनाही उध्वस्त व्हायची धास्ती असायची. पण स्वराज्यात परस्त्री म्हणजे माता होती. कृषकाच्या शेतातील पीक म्हणजे त्याच्या कष्टाचे मोती होते. कारण हा विचार प्रत्येक मावळ्याच्या मनात रूजवणारा, आचरणातून सिद्ध करणारा तो मनुष्यरुपातील देव होता. रामराज्यात जशी प्रजा सुखी होती अगदी तशीच स्वराज्यात शिवरायांचे सुशासन रयत अनुभवत होती. त्यामुळेच हा राजा म्हणजे केवळ सिंहासनाधीश्वर नव्हता तर रयतेच्या हृदय सिंहासनी विराजमान झालेले दैवत होते. आई जिजाऊंनी सांगितलेल्या रामकृष्णाच्या गोष्टी शिवराय जणू जगत होते. राम-कृष्ण देव होते त्यांनी मनुष्य अवतार घेऊन सुराज्य निर्माण केले. पण मनुष्य जन्म घेऊन दैवताचा दर्जा मिळणारे एकमेव छत्रपती शिवराय होते. रामासारखे प्रजाहितदक्ष, कृष्णासारखे रणनिती तज्ञ.
शिवरायांसाठी कुणीही सरदार हसत हसत मरणाला सामोरा जायला तयार व्हायचा. कारण, त्याला माहित होतं माझा पोशिंदा माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी मेलो तरी चालेल लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हीच ती भावना शिवराय नावाच्या दैवतावरील अढळ श्रद्धेची. शिवराय म्हणजे विचारातील प्रेरणा.. कुठल्याही गडकिल्ल्यावर जा शिवविचारांचा हुंकार मनास साद घालतो. शिवराय म्हणजे शौर्याला दूरदृष्टीची जोड.. सागरी आरमार म्हणजे याचीच एक झलक.
मनामनात स्वाभिमान जागवणारे, सर्वधर्मसमभाव जपणारे, स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर नियम करणारे, निःपक्ष न्याय देणारे, शेती व्यवसायास चालना देणारे, महसूल नियंत्रण करणारे, भ्रष्टाचारास कठोर शासन करणारे, शिस्त लावणारे, गुणपारखी, स्वराज्यहित कायम नजरेसमोर ठेवणारे, उत्तम युद्धनितीचा अवलंब करणारा हा युगपुरुष.. एक असामान्य नेतृत्व.. कितीही बिरूदं लावली तरी कमीच वाटावीत.. आभाळाएवढं कर्तृत्व चार शब्दात कसं मावेल ? शिवजयंती निमित्त आलेला ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठीचा विषय ‘दैवत च पावले असेल. सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन व या महान राजास मानाचा मुजरा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह.



