सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन
जे. एस. एम. महाविद्यालयात अभिवादन व मार्गदर्शनपर व्याख्यान
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन
जे. एस. एम. महाविद्यालयात अभिवादन व मार्गदर्शनपर व्याख्यान
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा ध्वज त्यांच्या पश्चातही अखंड फडकवत ठेवणाऱ्या दर्यासारंग सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जे. एस. एम. महाविद्यालयात गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४ रोजी अभिवादन व मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन सकाळी १०.०० वा. कै. जयवंतराव केळुसकर सभागृहात करण्यात आले होते. त्यापूर्वी सकाळी ९.०० वाजता आंग्रे समाधी परिसर येथे कमोडर मा. कोहली यांच्या द्वारे भारतीय नौसेनेच्या वतीने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कमोडर मा. रिशी राज कोहली, कमांडिंग ऑफिसर, आयएनएस आंग्रे हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मा. श्री. सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. श्री. अतुल झेंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, मा. अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, मा. अॅड. गौतम पाटील, अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ, मा. श्री. रघुजीराजे आंग्रे, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्राचार्य अॅड. नीलम हजारे, कॅप्टन डॉ. मोहसीन खान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सतर्फे कमोडर कोहली यांना मानवंदना देण्यात आली. महाविद्यालयातर्फे कमोडर कोहली यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.
कमोडर मा. कोहली यांनी आपल्या भाषणात सागरी सुरक्षेतील नौदलाचे महत्त्व, नौदलातील करिअरच्या विविध संधी व त्यांचे स्वतःचे नौदल क्षेत्रातील अनुभव याबद्दल मार्गदर्शन केले. ‘जो इतिहासाकडे दुर्लक्ष करतो, तो आपले भविष्य धोक्यात टाकतो असे म्हणत त्यांनी इतिहासापासून धडा घेत भविष्यातील संकटांची चाहूल घेत देशाच्या संरक्षणासाठी तरुणांनी पुढे यायला हवे असे प्रतिपादन केले. ‘राष्ट्र प्रथम’ ही जाणीव सर्वांनी आपल्या मनात रुजवायला हवी असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज मा. श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. अॅड. गौतम पाटील यांनी कमोडर मा. कोहली यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन विविध आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये करिअर घडवायला हवे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयेश म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक व अलिबागमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



