“बोली जेव्हा बोलते” मायबोली काव्य संमेलन संपन्न
जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार
“बोली जेव्हा बोलते” मायबोली काव्य संमेलन संपन्न
जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नंदुरबार ( दि १९): आदिवासी साहित्य अकादमी (चाळीसगाव), महाराष्ट्र व आदिवासी मौखिक साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बोली जेव्हा बोलते” मायबोली काव्य संमेलन रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी पंचायत समिती च्या कै. हेमलता वळवी सामाजिक सभागृहात उत्साहात संपन्न झाले.
नंदुरबार येथे नंदुरबार जिल्ह्यातील विविध बोलीभाषेतील कवींचे मायबोली काव्यसंमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ली, पावरी, डोेंगरी, देहबोली,मावची,नयरी ,अहिराणी, कोकणी, लाडशी , राठवी,अशा विविध आदिवासी भाषा तसेच खानदेशी नंदुरबारी अहिराणी, स्थानिक गुर्जर बोली आदी विविध बोलीभाषांमधून कवींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या आणि नंदुरबार जिल्हा व परिसरातील विविध बोलीभाषांचा सन्मान करण्यात आला.
बोलीभाषा काव्यसंमेलनाचे आरंभ उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते द्विपप्रज्वलनाने करण्यात आला उद्घाटक मा. श्री प्रभाकर भावसार ज्येष्ट साहित्यिक यांचे मनोगत व प्रास्ताविकाने झाले.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मा.श्री रमाकांत पाटील ज्येष्ट पत्रकार तथा साहित्यिक,मा श्री चंद्रकांत पवार आ.वि.प्रकल्प अधिकारी,नंदुरबार,मा श्री सुनिल गायकवाड ज्येष्ट साहित्यिक चाळिसगाव, मा श्री निंबाजीराव बागुल ज्येष्ट साहित्यिक नंदुरबार आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
कवीसंमेलनाचे अध्यक्षपद : मा. श्री वाहरु सोनवणे जेष्ट साहित्यिक यांनी भूषविले. माय बोली काव्यसंमेलनात गाव-वाड्यांच्या रोमांचक कहाण्या, निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, प्रेम-विरहाच्या कोमल भावना, दैनंदिन जीवनसंघर्ष आणि विद्रोहाची तीव्र जाणीव ,मायबोलींचे महत्व व जिव्हाळा, आदिवासी संस्कृती, जीवनमूल्ये, वेदना, आशा आणि संघर्ष यांचे दर्शन घडविणाऱ्या या संमेलनात बोलीभाषेच्या सामर्थ्याने शब्दांना नवे आयाम मिळाले. नंदुरबार जिल्ह्यातील विविध बोलीभाषांमधून नंदुरबार जिल्हयांची आदर्श संस्कृती व विचारधारा नंदुरबारचा सांस्कृतिक व साहित्यिक ठेवा मायबोली कविसंमेलनात उजळला.
उपस्थित रसिकांनी प्रत्येक कवितेला मनापासून दाद दिली. मायबोलीच्या माध्यमातून व्यक्त होणारी भावना, अस्मिता आणि संस्कृती यांचे जतन व संवर्धन करणारे हे काव्यसंमेलन स्मरणीय ठरले. . हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून, नंदुरबारच्या सांस्कृतिक ओळखीला बळ देणारा आणि स्थानिक बोलीभाषांना मुख्य प्रवाहात आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. जवळपास ३० ते ३५ कवींनी स्थानिक मायबोलीभाषेत आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.डाॅ.माधव कदम ,सुमित्रा वसावे, उमेश बाविस्कर ,गणेश नरोत्तम पाटील (स्नेहवलयकार) , मेघा बाविस्कर ,वैष्णवी चौधरी, हर्षा चौधरी , विशाल कुलकर्णी, पितांबर बिर्हाडे, जगन्नाथ भाऊभाई, योगेश मगरे, प्रदीप पाटील, धनराज पानपाटील, अरुण राठोड,प्रविण देसले, सुनिल पाटोळे, विश्वास वळवी, प्रतिभा वळवी, पुजा सोनार ,दादाभाई पिंगळे आदी कविंनी आपल्या बोलीभाषेतून कविता सादर केल्या.
कवीसंमेलनाचे अध्यक्ष मा. वहारु सोनवणे ज्येष्ट साहित्यिक यांनी येथे सादर झालेल्या बोलीतल्या कविता हेच खरे मनोगत आहे. बोली ह्या जपल्या पाहिजे व बोलीभाषेतले साहित्य हे संस्कार , संस्कृती , त्यात मूल्य आहेत, आदर्श आहे. ते जीवनाचे मार्गदर्शक आहे. ते पुढील पीढ्यांसाठी महत्वाचे आहे. अश्या आशयात कविंना संबोधित केले. कार्यक्रमाचे संयोजन श्री भीमसींग वळवी,डाॅ .मनोज शेवाळे,नागसेन पेंढारकर,दादाभाई पिंगळे यांनी केले. सहसंयोजन.शरद जाधव,डाॅ.माधव कदम सूत्रसंचलन,श्रीमती चेतना बिरारी, आभारप्रदर्शन श्री. विश्वास वळवी यांनी केले.



